ठेविले अनंते...
..
प्रा. हर्षवर्धन कडेपूरकर
..
पंचवीस एक वर्षांपूर्वीची गोष्ट. खरे पाहता एक घटनाच, पण नाव-गाव नसल्याने गोष्टच. जागतिक बँकेकडून विकास प्रकल्पासाठी आर्थिक साह्य मिळालेल्या एका गावाला भेट द्यायला एकदा बँकेचे प्रतिनिधी सरकारी अधिकाऱ्यांसह येऊन दाखल झाले. यात विविध देशांचे विविध भाषिक सदस्य होते आणि त्यांच्या सोयीसाठी दुभाषीही.
मुंबईहून निघालेला हा ताफा गावी पोहोचेपर्यंत दुपार झाली. उन्हाचा कडाका. गावात सर्वदूर सामसूम. घरोघर निरोप पाठवून माणसे जमवली आणि मग सुरू झाला गावकरी आणि बँकेचे प्रतिनिधी यांचा संवाद. दिवस मावळतीला आलेला नसूनही सगळीकडे शांतता का, या प्रश्नाने सुरुवात झाली. पहाटे लवकर कामाला लागायचे व दुपारच्या तळपत्या उन्हात सावलीच्या आधाराने राह्यचे हे स्पष्टीकरण पटण्यासारखे होते. मग गावातील विविध प्रश्नांवर चर्चा सुरू झाली आणि हवेतला उष्मा बोलण्यातही डोकावू लागला. स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, सांडपाण्याची व्यवस्था, संतुलित आहार आदी प्रश्नांची सरबत्ती झाल्यावर एका ग्रामस्थाला काही राहवले नाही.
तो म्हणाला, 'आता एवढ्या सगळ्या गोष्टी करायला तुम्ही सांगताय. पण हा सारा खटाटोप कशासाठी?'
'हे सारे तुम्ही केलेत तर तुमचे जीवन सुखी व समाधानी होईल,' बँकेचे प्रतिनिधी म्हणाले.
'पण आमचे जीवन समाधानी नाही हे तुम्हाला कोणी सांगितले?' तो ग्रामस्थ म्हणाला.
या गोष्टीचे तात्पर्य काय? सुखी व समाधानी जीवनाच्या कल्पना ज्याच्या-त्याच्या वेगळ्या असू शकतात. तसेच, तुमचे सुख कशात आहे हे दुसऱ्याने सांगितलेले आवडत नाही. आणखी एक शक्यता म्हणजे ज्या शहरी व्यवस्थेची भलावण यातून डोकावते तिथे तरी या सर्व बाबतीत काय मोठा उजेड पडला आहे असेही त्या ग्रामस्थाच्या मनात असू शकते.
या गोष्टीतलेच दृष्य आपल्या शहरात, बहुतांश शासकीय-निमशासकीय कार्यालयात, सार्वजनिक उपक्रमात, न्यायालयीन व्यवस्थेत, शिक्षणसंस्थातही दिसते. याला अपवाद आहेतच, पण बहुतांश ठिकाणी काहीच घडत नाही किंवा घडल्यासारखे वाटत नाही हेही खरेच आहे.
\I\B'ठेविले अनंते तैसेचि रहावे
चित्ती असू द्यावे समाधान.'\I\B
हे तत्त्वज्ञान यामागे आहे का? आहे त्या परिस्थितीत माणसाने समाधानाने रहावे हा यामागचा विचार नक्कीच चांगला आहे. पळत्याच्या पाठीमागे लागून आहे तेही गमावणे योग्य नाही हा विचारही ठीक. पण परिवर्तन हा तर जीवनाचा अविभाज्य भाग आहे.
लहान मूल शाळेत जायला लागते तेव्हा त्याला परिवर्तनाच्या दिव्यातून जावेच लागते. साधारणपणे घरी लहान मूल केंद्रस्थानी असते. कुतूहलापोटी सर्वांना प्रश्न विचारण्याचा त्याचा अधिकार घराबाहेर पडल्यावर हिसकावून घेतला जातो. प्रश्नांची उत्तरे माहीत असूनही त्याच्याकडून ती काढून घेण्याच्या 'शिक्षणाच्या' थोर पद्धतीमुळे तो भांबावतो आणि गप्प होतो. पण थोड्याच कालावधीत बहुतांश मुलांना समजते की पोपटपंची करणे म्हणजेच शिक्षण.
नवविवाहितेलाही याच दिव्यातून जावे लागते. पतीच्या घरी ती रिकाम्या हाताने येत नाही तशीच रिकाम्या डोक्यानेही येत नाही. गृहव्यवस्थापनाचे आई-वडिलांकडून कळत-नकळत घेतलेले धडे व सासरच्या घरचे आदर्श यांचा संघर्ष अटळ असतो. तिला परिवर्तनाच्या चक्रातून जावेच लागते. परिवर्तन सोपे नसते. दृष्टिकोनामधील बदल अवघड असतात. परंपरेचा पगडा असतो. पण ज्याप्रमाणे खुल्या अर्थव्यवस्थेपाठोपाठ खुली समाजव्यवस्था अपरिहार्य असते, तसेच परिवर्तन हे जीवनाचे कठोर व्यावहारिक वास्तव म्हणून स्वीकारावेच लागते आणि संतश्रेष्ठ तुकोबारायांची क्षमा मागून म्हणावे लागते...
\I\B"ठेविले अनंते तैसेचि 'न' रहावे
चित्ती असू द्यावे 'अ'समाधान."\I\B