माणूस मरू लागतो कणाकणानं...
रवींद्र शोभणे
आपण कुणा एखाद्याला विचारलं, की तुला मरायला आवडेल का? तर तो काय उत्तर देईल हे पुन्हा सांगायला नकोच. कारण कोणत्याही माणसाची किंवा कोणत्याही जिवंत प्राण्याची जगण्याची जिद्द किंवा आसक्ती किती मूलभूत असते, हे आपण सगळेच जाणतो. आणि ही आसक्तीच जगण्याचे सौंदर्य वाढवीत असते. त्याच्या मनातील आसक्तीमुळेच तो आपलं आणि आपल्या अवतीभवतीचं जगणं सुंदर करण्यासाठी अहोरात्र धडपडत असतो. माणूस तसाही सौंदर्याचा चाहता, भोक्ता असतो. जीवनातील जे जे अमंगल, कुरूप आहे ते ते सगळं अव्हेरून, झुगारून त्याजागी सुंदर, मनमोहक अशा गोष्टींसाठी सतत आसुसलेलो असतो. असं असतानाही माणसाचा मृत्यू अटळ आहे. जीवन हा अपघात आहे तर मृत्यू हा नियम आहे, असे डार्विन या शास्त्रज्ञानेही सांगून ठेवले आहे.
जन्म-मृत्यूच्या या दोन टोकांमध्ये माणसाला आपल्या जगण्याचे सगळे अन्वयार्थ तपासून पहावे लागतात. हे अन्वयार्थ तपासून पाहताना त्याला जीवन म्हणजे काय हे कळू लागतं. या जीवनाच्या सातत्यशील प्रवासाला आणि त्या प्रवासाच्या अन्वयार्थाच्या आधारावरच तर जगातला सगळं साहित्य, कला, संगीत, नृत्य-नाट्य एकूणच सगळ्या कला जन्माला आलेल्या आहेत. माणसाच्या प्रगतीच्या कुठल्यातरी टप्प्यावर त्याला बुद्धीच्या बळावर भाषेचा शोध लागला. भाषेच्या शोधापाठेपाठ लिपीचा शोध लागला. आणि तो पृथ्वीच्या पाठीवरील सर्वश्रेष्ठ असा जीव म्हणून ओळखला जाऊ लागला. पाहता पाहता तो या विश्वातल्या घटकांशी, शक्तींशी संघर्षाच्या पवित्र्यात उभा राहिला. कधी या पवित्र्यात तो हरला तर कधी जिंकला. पण या लढाईत त्यानं कधी हार मानली नाही. शेवटापर्यंत तो हारही मानणार नाही हे आपल्याला ठाऊक आहे.
पाहता पाहता माणसाच्या या प्रगतीनं आकाशाला कवेत घेण्याची जिद्द मनात बाळगली आहे. आज आपलं जीवन म्हणजे एक समृद्ध असा कोष आपण तयार करून ठेवला आहे. या कोषाला आपणच आखून ठेवलेल्या एका अभेद्य कुंपणाचं सुरक्षित कवच तयार करून ठेवलं आहे. या कुंपणाच्या आतबाहेर काही ठरीव नियम, काही ठरीव संकेत आपणच निर्माण करून ठेवलेले आहेत. त्यात आपण सुरक्षित अशा भावनेनं समृद्धीची ढेकर देत जगण्याचे सगळे सोहळे साजरे करू लागतो.
आधी आपला भवताल बदलतो की माणूस? भवताल माणसाला बदलवतो की माणूस भवतालाला बदलवतो? याचं उत्तर काहीसं गोंधळात टाकणारं आहे. पण या बदलात आपल्या जीवनेच्छांचं, आपल्या आसक्तीचं काय? त्या आतून जेव्हा उफाळून येतात तेव्हा त्यांच्या रेट्यांनी माणूस सगळ्याच नैतिकतेच्या-अनैतिकतेच्या बंधनांना तुडवीत बेफामपणे उधाणून उठतो.
-आणि इथूनच त्याचा कणाकणाने मृत्यू घडू लागतो. त्याच्या नकळत. हे त्याला ठाऊक असतं आणि नसतंही. कुठल्याही अमली पदार्थाच्या पॅकिंगवर जसा वैधानिक इशारा लिहिलेला असतो, तसाच इशारा त्याला याही प्रवासात मिळत जातो. नाही असं नाही; पण तो इशारा समजून घ्यायला तो पुरता भानावर असणंही गरजेचं असतं.
सुप्रसिद्ध कन्नड लेखक डॉ. एस. एल. भैरप्पा यांची 'तंतू' ही कादंबरी मला या ठिकाणी आवर्जून आठवू लागते. एक नैष्ठिक पत्रकार आणि भौतिक सुखासाठी नात्याची, भावबंधाची होळी करणारी त्याची पत्नी यांच्या माध्यमातून भैरप्पांनी मानवी नात्याच्या याच अध:पतनावर नेमकेपणाने बोट ठेवले आहे. इथे भैरप्पाही माणसाचा कणाकणाने होणारा मृत्यू अधिक प्रभावीपणे अधोरेखित करतात.
गुरुदत्तचा 'प्यासा' पाहताना; विशेषतः 'प्यासा'चा शेवट पाहताना ही जाणीव अधिक प्रभावीपणे आत खोलवर उतरत जाते.
हरेक जिस्म घायल, हरेक रूह प्यासी
निगाहों मे उलझन, दिलो मे उदासी
ये दुनियाँ है या आलमे हवासी
ये दुनियाँ अगर मिल भी जाये तो क्या है...
साहिरसारखा शायर एकापाठोपाठ एक असे सवाल आतड्यांना पिळवटून विचारू लागतो तेव्हा तोही आणखी काय मांडू इच्छितो? तोसुद्धा हेच सांगू पाहतो नं... माणूस मरू लागला आहे कणाकणानं...