सतारीआडचा माणूस
विसाव्या शतकात सतार हे वाद्य एकल वादनाचे वाद्य म्हणून खऱ्या अर्थाने उदयाला आले सतारीच्या उत्थानाला काही दिग्गज वादक कारणीभूत होते...
विसाव्या शतकात सतार हे वाद्य एकल वादनाचे वाद्य म्हणून खऱ्या अर्थाने उदयाला आले. सतारीच्या उत्थानाला काही दिग्गज वादक कारणीभूत होते. त्यातील त्रिमूर्ती म्हणून तिघांना गौरविण्यात येते. विलायत खान, रविशंकर आणि अब्दुल हलीम जाफर खान. विलायत खान हे वयाने रविशंकरांपेक्षा लहान असले तरी त्यांची कारकीर्द रविशंकरांच्या अगोदर सुरू झाली. १९४४ साली मुंबई विद्यापीठाच्या दीक्षान्त सभागृहात भरलेल्या 'विक्रमादित्य' संगीत समारोहात बडे गुलाम अली खान आणि विलायत खान हे तारे पहिल्यांदा संगीताच्या अवकाशात खऱ्या अर्थाने अवतरले. या तीनही सतारियांनी १९५० पासून पुढील तीन-चार दशके असंख्य मैफली गाजवल्या. रविशंकरांनी तर त्रिखंडात कीर्ती मिळविली. त्या मानाने इतर दोघांची कीर्ती मर्यादित वर्तुळांत राहिली.
दिवंगत संपादक व लेखक खुशवंतसिंहांनी एका आत्मचरित्रपर पुस्तकाला 'नॉट ए नाइस मॅन टु नो' असे शीर्षक दिले. विलायत खान यांच्या चरित्राबाबत असेच म्हणावे लागते. आत्मरत, द्रव्यलोभी, मत्सरी, विषयासक्त, काहीसे कृतघ्न असे त्यांचे चित्रण यातून एकीकडे उभे राहते. १९५२ साली दिल्लीत 'कॉन्स्टिट्युशन क्लब'च्या सभागृहात रविशंकर व सरोदवादक अली अकबर खान यांची जुगलबंदी सुरू होणार असतानाच विलायत खान युयुत्सू वृत्तीने तिथे अनाहूत प्रकटले व रविशंकर यांच्यावर कुरघोडी करून नामोहरम करण्याच्या ईर्ष्येने त्या कार्यक्रमात घुसले. ती मैफल इरेला पेटून त्यांनी काबीज केली. रविशंकरांना सगळे मानमरातब मिळाले म्हणून आयुष्यभर ते मत्सराग्नीत जळत राहिले. इतके की लंडन विमानतळावर एका कर्मचाऱ्याने त्यांची सतार पाहून रविशंकरांचा सन्मानपूर्वक उल्लेख करताच 'रविशंकर आत्ताच मेले' असे तुच्छतेने म्हणणे हे अत्यंत क्षुद्र मनोवृत्तीचे द्योतक होते.
आपला भाऊ इम्रत हा बकिंमहॅम राजवाड्यात राणीला भेटायला जाताना वाटेत रस्त्यावर मोटार थांबवून त्याला उतरून जायला भाग पाडणारे विलायत खान निष्ठुरच वाटतात. एका प्रकल्पात त्यांनी इतर कलाकारांना मानधनाबाबत फसविले, अशी काहींची तक्रार होती. त्यात तबलानवाज़ झाकीर हुसेन हेही होते. त्यानंतर एकदा झाकीर तबल्यावर संगत करीत असताना 'डॉलर मोजण्याऐवजी जरा मात्रा नीट मोज' असे भर रंगमंचावर ऐकवून पाणउतारा करणारे विलायत खान विक्षिप्त वाटतात! हलीम जाफर खान हे प्रतिस्पर्धी समकालीनांविषयी बोलताना दर्यादिली दाखवत. रविशंकरही तसे अनुदार नव्हते. इथे विलायत खान कलाकार म्हणून मोठे असले तरी माणूस म्हणून खुजे वाटतात.
अर्थात, त्यांच्या शैलीचा वेध नमिताने आपल्या परीने जरूर घेतला आहे. सतारीच्या रचनेत त्यांनी केलेले बदल समजावून सांगितले आहेत. अब्दुल करीम खान, फैयाझ खान, झोहराबाई आग्रेवाली, केशरबाई यांच्या गायकीचे ते चाहते होते. अमीर खान खाँसाहेब तर त्यांचे मार्गदर्शकच होते. आपले दफन अमीर खान खाँसाहेबांच्या शेजारी व्हावे, असे त्यांनी लिहून ठेवले. ध्रुवतारा जोशी, महम्मद खान (रईस खान यांचे वडील) यांच्याकडे विलायत खान शिकले होते, असा प्रवाद आहे. त्याचा उल्लेख पुस्तकात दिसत नाही. संगीत दिग्दर्शक मदनमोहन विलायत खान यांच्याकडून चाली चोरत, असत हा उल्लेख अन्याय करणारा वाटतो. लहानपणी ऐकलेल्या एका भाटियाली गीताबद्दल त्यांना उतारवयात ओढ निर्माण झाली आणि निर्मलेन्दू चौधरी या लोकगीत गायकासमोर ते विद्यार्थी होऊन बसतात, ही गोष्ट विलक्षण वाटते. जवाहरलाल नेहरूंना झोप येण्यासाठी खाँसाहेबांचे प्रत्यक्ष सतारवादन ऐकावेसे वाटत असे, ही गोष्ट विश्वसनीय वाटत नाही. कारण 'वुई नेहरूज् आर टोन डेफ' असे विजयालक्ष्मी पंडित मधू लिमये यांना सांगत असत. सरंजामी वातावरणात वाढलेल्या बहुतेक कलाकारांची वृत्तीही अंतर्बाह्य सरंजामी कशी होत जाते, याचा प्रत्यय पुस्तकात येतो.
- अमरेन्द्र धनेश्वर
.................................................................................................
…द सिक्स्थ स्ट्रिंग ऑफ विलायत खान, ले: नमिता देवीदयाळ, वेस्टलँड बुक्स, पाने: २५०, किंमत: ६९९ रु.