अ‍ॅपशहर

टाळेबंदीतले ज्ञानकण

'मधुमक्षिकेची वृत्ती अंगी बाणवली, की कोणाही व्यक्तीकडून ज्ञानकण वेचता येतात. तुम्हाला मेलं कुणाचंच कौतुक नाही...,' सौभाग्यवतींचा 'राष्ट्र के नाम' (म्हणजे अस्मादिकांनाच) संदेशाचा कार्यक्रम सुरू झाला होता.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स 30 Apr 2021, 1:19 pm
'मधुमक्षिकेची वृत्ती अंगी बाणवली, की कोणाही व्यक्तीकडून ज्ञानकण वेचता येतात. तुम्हाला मेलं कुणाचंच कौतुक नाही...,' सौभाग्यवतींचा 'राष्ट्र के नाम' (म्हणजे अस्मादिकांनाच) संदेशाचा कार्यक्रम सुरू झाला होता. आतापर्यंत अनेकदा असे संदेश ऐकल्याने, आपल्याला कोणाचेच कौतुक नाही, कोणत्याही कामाचा कंटाळा कसा अंगी भरला आहे, नुसते लोळत पडण्याची सवय लागली आहे, एक काम धड करता येत नाही, याबाबत आम्हाला पुरेपूर खात्री पटली होती; त्यामुळे एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देण्याचा हा विषय आहे, अशा थाटात आम्ही हे प्रवचन ऐकू लागलो. काही वेळापूर्वीच फोनवर कोणाशी तरी कडाक्याचे भांडण झाल्यामुळे सौभाग्यवतींचा नूर वेगळाच होता आणि गुदरलेला प्रसंग बाका आहे, याची जाणीव झाल्याने मात्र हा संदेश गांभीर्याने घेण्याचा निश्चय केला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jata jata by chakor narendra modi and covid situation
टाळेबंदीतले ज्ञानकण


त्याचे झाले असे, की अनेक भल्या थोरल्या सेलिब्रेटींप्रमाणे आम्हालाही करोनाने गाठले होते; पण त्यांच्या रांगेत गेल्याचे कौतुक न करता, 'सतत नकारात्मक असलेले आमचे 'हे' पॉझिटिव्ह कसे झाले,' असा शेरा सौभाग्यवतींनी मारला. सांगण्याचे तात्पर्य असे, की आम्हाला १४ दिवस घरी राहण्याची वेळ आली होती. सौभाग्यवतींचा संदेश ध्यानी घेऊन घरीही ज्ञानकण वेचायचे, असा पण आम्ही केला आणि ज्ञानाची अनेक दालने आमच्यापुढे खुली होऊ लागली. आतापर्यंत न पाहिलेल्या मालिकांमधून घरगुती नातेसंबंधांचे नवनवे पैलू पाहण्याची संधी मिळाली. बहुसंख्य घरांमध्ये सासू आणि सुनांमध्ये वरवर मैत्रीपूर्ण चर्चा; परंतु प्रत्यक्षात कटकारस्थाने अशा रूपक कथांद्वारे दिग्दर्शकाने भारत-पाकिस्तान संबंधांवर प्रतिकात्मक प्रकाश टाकल्याची जाणीव झाली आणि त्यांच्याविषयी मनी मोठा आदर उत्पन झाला. हळूहळू आमचाही अभ्यास इतका झाला, की 'रात्रीस खेळ चाले'मधली कावेरी केसांच्या बटांशी खेळू लागली, की तिच्या अंगी 'शेवंता' आली, हे आम्ही पाहताक्षणी ओळखू लागलो. 'आई माझी काळूबाई,' मध्ये प्राजक्ता गायकवाड, वीणा जगताप आणि रश्मी अनपट यांच्यापैकी कोणी चांगला अभिनय केला, यावर आम्ही बहुमूल्य मतप्रदर्शन करू लागलो. 'सुंदरा मनामध्ये भरली,'मधली 'लतुडी' ही कशी क्रांतिकारी नायिका आहे, यावरही आम्ही तासन् तास चर्चा करू लागलो. एकदा तर 'लतुडी'च्या सुरात आम्ही सौभाग्यवतींना हाकही मारली, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे कौतुकमिश्रित भाव पाहून, अंमळ चूकच झाल्याचे आमच्या लक्षात आले.

या सर्वांमध्ये 'भारत-चीन संघर्षामध्ये मोदींचे नेमके काय चुकले' आणि 'जो बायडेन यांची भारत भेट कशी महत्त्वाची आहे' यापासून ते 'कोव्हिडच्या रुग्णांना रेमडेसिव्हिर देणे योग्य की अयोग्य,' अशा विषयांवर विविध पक्षांच्या प्रदेश प्रवक्त्यांची अभ्यासपूर्ण मांडणी ऐकण्याची संधी मिळाली, त्याला तोड नाही. या चौदा दिवसांत झालेल्या नवनव्या साक्षात्कारांनी आमच्याही मागे तेजोवलय निर्माण झाले असावे, असा भास होऊ लागला. त्यामुळेच हा मार्ग दाखविल्याबद्दल सौं.चे (पुन्हा एकदा) आभार!

- चकोर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज