अ‍ॅपशहर

पेढा घ्या... गोड गोड बोला!

रोज रात्री रोजनिशी लिहिण्याची आम्हाला सवय होती. एके दिवशी, आंब्याच्या तीन पेट्या कोकणातून मिळाल्या... संत्र्याच्या दोन पेट्या नागपुरातून मिळाल्या... द्राक्षाच्या दोन पेट्या नाशकातून प्राप्त झाल्या... असे लिहिले होते.

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 11 Oct 2021, 5:54 am
रोज रात्री रोजनिशी लिहिण्याची आम्हाला सवय होती. एके दिवशी, आंब्याच्या तीन पेट्या कोकणातून मिळाल्या... संत्र्याच्या दोन पेट्या नागपुरातून मिळाल्या... द्राक्षाच्या दोन पेट्या नाशकातून प्राप्त झाल्या... असे लिहिले होते. ते आमच्या वरिष्ठांनी वाचले. त्यांना प्रचंड धक्का बसला. ईडीच्या हाती तुमची डायरी पडली तर काही खरे नाही... बंद करा ते डायरी लिखाण, असे त्यांनी आम्हाला सांगितले. ताबडतोब बंद केले लिखाण! मात्र नंतर काही दिवसांनी, मनात खूपच काही कल्लोळ झाला तर आम्ही लिहू लागलो. आज अगदी तसाच कल्लोळ आमच्या मनात उडाला आहे. समोर डायरीचे फडफडते पान आहे आणि शेजारच्या चांदीच्या वाटीत आहे एक पेढा.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम take the pedha speak sweet
पेढा घ्या... गोड गोड बोला!


कालची... अगदी कालचीच गोष्ट.

नव्याकोऱ्या विमानतळावरचा मंगलमय प्रसंग. आम्ही विमानतळावर पोहोचलो. वातावरण खेळीमेळीचे वाटत होते. कुणीकुणी कुणाच्या कानात काहीबाही कुजबुजत होते. अधूनमधून प्रिंटिंग टाइप... किंबहुना... कार्यक्रमपत्रिका... भांडाफोड... आजी... माजी... भावी... असे काही शब्द कधी लघूरीत्या, तर कधी सूक्ष्मरीत्या कानावर पडत होते. नंतर व्यासपीठावर पोहोचलो मात्र आणि बघतो तो काय... त्या दोन खुर्च्या आजूबाजूला नि आमची त्यांच्या मागच्या रांगेत, पण त्यांच्या अगदी मधोमध. खुर्च्यांची व्यवस्था करणाऱ्यांपैकी एकाला बोलावून, सुरक्षेचा उपाय म्हणून त्या दोन खुर्च्यांतील अंतर जरा वाढवता येईल का, अशी पृच्छा केली. त्याने टेचात, नाही म्हणजे नाहीच, असे उत्तर दिले. आमच्या मनावर जरा दडपण आले. तेवढ्यात सगळी मंडळी व्यासपीठावर स्थानापन्न झाली. कुणीतरी अनोळखी माणूस हातात कसलासा बॉक्स घेऊन व्यासपीठावर आला. एक एक करीत आमच्यापर्यंत पोहोचला. पेढा घ्या... गोड बोला... असे म्हणाला नि आमच्याहाती एक पेढा देऊन पुढे गेला. तो पेढा आम्ही तोंडात टाकणार तोच...

पुढे बसलेल्या दोघांनीही एकदमच आमच्याकडे वळून पाहिले. त्यांची जळजळीत नजर आमच्या हातातील पेढ्याकडे होती. 'हा पेढा तुम्ही खाणार?' अशी विचारणा जरबेच्या आवाजात दोघांनीही एकदमच केली आणि मान सरळ करून पुन्हा ते पुढे पाहू लागले. माझ्या हातातील पेढा हातातच राहिला. तो खाऊन टाकावा अशी एकदा जबर इच्छा झाली तेव्हा एक भाषण सुरू झाले... ते संपले तेव्हा पेढा खाण्याची अर्धी इच्छा अंतर्धान पावली... नि दुसरे भाषण संपले तेव्हा उरलेली अर्धी इच्छा अंतर्धान पावली. बाहेर तीर्थप्रसादाला गेल्यावर प्रसादाची पुरचुंडी करून घरी आणायची सवय आहेच आम्हाला. त्याच सवयीनुसार आम्ही पेढा घरी आणला.

नि तेव्हापासून चांदीच्या वाटीतील त्या पेढ्याकडे आम्ही अगदी टक लावून पाहात आहोत. हा पेढा नक्की आहे कुणाचा? त्या दोघांनी विचारलेल्या प्रश्नाचा नेमका अर्थ काय? त्याबाबत वरिष्ठांना थेट विचारावे तरी कसे?

मनात इतके प्रश्न उभे आहेत... इतका विचारांचा कल्लोळ झाला आहे की आज रोजनिशी लिहिण्याखेरीज गत्यंतर नाही. आता लिहितोच रोजनिशी. त्यात नेमके काय लिहू आम्ही सांगता येत नाही. पण लिखाणाचं शीर्षक आमच्या डोक्यात आधीचे पक्के आहे...

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज