राजा भोयर
................
अमेरिकेच्या भ्रमंतीत नायगारा धबधब्याच्या जवळच टूच ऑपरेटरनं 'नायगारा फोर्ट'ची जुजबी माहिती देत तो बघून यायची सूचना केली. मी आश्चर्यचकित झालो, कारण बाहेर किल्ल्याचं काहीच लक्षण दिसत नव्हतं. शिवरायांचे दुर्गम भागातले गडकिल्ले पाहलेल्या डोळ्यांना असल्या समतल भूभागावरचा किल्ला पाहायची सवयच नव्हती आणि अमेरिकेत किल्ला हे समीकरणही मनाशी जुळतं नव्हतं. जमिनीवर पालखट मांडून बसलेला नायगारा गड 'नावाला गड, पण दिसेना धड' असं डोळ्याचं मनाशी झालेले एकमत.
किल्ला कम टूमदार रिसॉर्ट असंच त्याचं बाह्यस्वरूप वाटलं. पण छोटेखानी दगडी कमानीच्या मुख्य दारातून आत शिरल्यावर मात्र मी पुरता अचंभित झालो. ठिकठिकाणी व्यवस्थित मांडून ठेवलेल्या पुरातन तोफा, हिरव्याकंच गवतातून चहूकडं गेलेल्या सुंदर रमणीय पायवाटा, शिवाय तिथली स्वच्छता डोळ्यात अंजन घालणारी. किल्ल्याच्या तीनमजली वास्तूतील सैनिकांचा लाकडी टेबल-बेंचचा भोजनकक्ष, स्वच्छ गाद्यांनी अंथरलेला पलंगपोसाचा शयनकक्ष, हत्यारं, दारूगोळ्यानं भरलेलं युद्धसाहित्याचं भांडार. साऱ्या गोष्टी इतक्या नीटनेटक्या जपून ठेवल्या होत्या, की जणू त्या काळाचाच भास व्हावा. किल्ल्यासमोरील मैदानातील त्या काळाच्या सैनिकी वेशभूषेतील सैनिकांची धावपळ, युद्धसदृश परिस्थितीच वातावरण. तोफेला शत्रूच्या दिशेनं सज्ज करून त्याला बत्ती देण्याची त्यांची अॅक्शन आणि आरडाओरड हा सर्व प्रकार लक्षवेधी होता. हा किल्ला म्हणजे बेटसी डोयले या अमेरिकन स्त्रीची शौर्यकथा सांगणारी वास्तू. अठराशे बारा साली ब्रिटिशांविरुद्धच्या युद्धातील पराभवानंतर स्वत:च्या चार पोरांसह तीनशे दहा मैलाच्या बर्फाळ प्रदेशातून पलायन केल्याची तिची थरारक कहाणी. इथं अमेरिकेतील किल्ले आणि त्याचा इतिहास विषय संपतो. या एकमेव किल्ल्याचं त्यांनी केलेलं जतन आणि त्या मर्दानीचं आपुलकीनं ठेवलेलं स्मरण आपल्या सर्वांना चपराक मारणारं.
भारत ही वीरांची भूमी आहे. त्यांच्या कहाण्या आम्ही ऐकतो. वाचतो. एकट्या छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण घेऊया. महाराजांच्या नावावर डोंगरी, भुईकोट आणि सागरी असे एकूण तीनशे सत्तर किल्ले. महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक आणि तामिळनाडूपावेतो पसलेले. महाराज पराक्रमी योद्धे आणि कुशल प्रशासक. आजच्या भाषेत त्यांना 'मॅनेजमेंट गुरू' ही उपाधीही लावली जाते. दुर्दैवानं आपण कमी, पण जगानं त्यांची गांभीर्यानं दखल घेतली. महाराजांच्या 'गनिमी कावा' या युद्धनीतीनं जगाला भुरळ घातली आहे. प्रतापगडाच्या पायथ्याची मारलेला अफझलखान, पुण्याच्या लाल महालातून बोटं छाटून सोडलेला शाहिस्तेखान, औरंगजेब बादशहाच्या हातावर तुरी देऊन आग्रा येथील तुरुंगातून केलेलं पलायन, विविध आक्रमण मोहिमा आणि मोघल, इंग्रज, पोर्तुगीज, सिद्दी, कुतुबशाही, आदिलशाही यांना धडकी भरवणारी शिवरायांची जरब. सारंकाही शब्दांपलीकडलं. पण आज शिवरायांची विचारधारा तर सोडा पण त्यांचा अमूल्य असा किल्ल्यांचा ठेवाही आपण जतन करू शकलो नाही. आपण स्वत:ला लायक कसे म्हणावे?
एखाद-दोन किल्ल्यांचा अपवाद सोडला तर इतर किल्ल्यांची पार दुरवस्था झाली आहे. नावाला काही किल्ल्यावर गाइड आहे, पण त्यांची माहिती फारच त्रोटक. आडातच नाही तेव्हा पोहऱ्यात येणार कुठून? शिवरायांविषयीची तळमळ फक्त घोषणेपुरतीच. एका ऐतिहासिक घटनेचं अमेरिका सोनं करून जगापुढं मांडतं आणि इथं पराक्रम, नीतिमत्ता, दूरदृष्टी, कार्यकुशलता, बुद्धिमत्तेनं परिपूर्ण असलेल्या शिवाजी महाराजांना मात्र वाऱ्यावर सोडून देतात. अशानं भविष्यातली पिढी कशी घडणार? विनाशकाले विपरीत बुद्धी, असंच म्हणावं लागेल. अजूनही वेळ गेलेली नाही. समर्थांच्या शब्दात 'शिवरायाचे आठवावे रूप। शिवरायाचा आठवावा प्रताप।।' आता मात्र शिवरायांच्या कर्मभूमीत 'शिवरायांचा दाखवावा प्रताप' असं आवर्जून म्हणावंस वाटतं.