इंग्रजी ग्रंथ परिचय
...
अपर्णा पाटील
..............................
'कॅन्सर' या शब्दाभोवताली बरंच काही जखडलेलं असतं. एका व्यक्तीला होणारा आजार, एवढीच ती मर्यादीत गोष्ट नसते. तर त्यासोबत त्या व्यक्तीचं कुटुंब, मित्रपरिवार, सहकारी आणि एकूणच समाज या सगळ्यांसाठी तो मोठा धक्का असतो. प्रत्येकाच्या मानसिकतेवर त्याचा होणारा परिणाम हा दीर्घकाळ ठसठसणारा असतो. अनन्या मुखर्जी या ब्रेस्ट कॅन्सरशी झुंजत होत्या. १८ नोव्हेंबर, २०१८ रोजी अनन्या यांनी या जगाचा निरोप घेतला. उपचारांच्या काळात त्यांनी लिहिलेलं टीपण म्हणजेच 'टेल्स फ्रॉम द टेल एंड' हे पुस्तक.
कॅन्सर झालाय म्हटल्यावर समाजाचा त्या व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. विशेषतः किमोथेरपीच्या काळात. स्त्रियांचं बाह्यरूप बदलतं. त्यामुळे त्यांच्या वाट्याला येणारे अनुभव अधिक भयावह असतात. दीर्घ उपचाराच्या काळात हॉस्पिटलमधल्या अत्यंत कोंदट, उदास वातावरणात माणसं मृत्यू येण्याआधीच मनाने मरण पावलेली असतात. आपल्या प्रत्येक कृतीला शोकात्म बनवण्याचा प्रयत्न करत असतात. अनन्या मात्र वेगळ्या होत्या. त्या जगाकडे खूप आनंदी आणि आशावादी नजरेने पाहतात. त्यामुळेच त्यांनी मांडलेले अनुभव वाचनीय ठरतात. छोट्या-छोट्या प्रसंगांकडे तिरकस नजरेने पाहण्याची त्यांची वृत्ती होती. त्यामुळे साधेसे वाटणारे प्रसंग बोलके ठरतात. त्यांच्या अखेरच्या प्रवासात त्यांनी आशादायी लुकलुकणारी स्वप्नं पाहिली. ती स्वप्नं आणि प्रत्यक्षात वाट्याला आलेले प्रसंग या पुस्तकात मांडले आहेत.
हॉस्पिटलच्या खिडकीतून दिसणारा कावळा, त्याचा 'का' असा ओरडा, आपल्यासारखं त्याचं बोडकं डोकं, असा संबंध लावत त्याच्यात स्वतःला शोधणं, हे 'की आणि का' या पहिल्याच प्रकरणातून येतं. कॅन्सर झाल्यावर आप्त, मित्रमैत्रिणी त्या व्यक्तीला खूष करण्याचा प्रयत्न करतात. हळूहळू तेही कामात गुंततात. हे सगळं स्वानुभवाने समजलेल्या अनन्या आपल्या इच्छांना मारत नाही. मित्रमैत्रिणींनी कणव बाळगण्यापेक्षा 'माछेर झोल' बनवून आणावा, अशी अपेक्षा ठेवतात. पाऊस आवडतो, म्हणून इगतपुरीला जाण्याचा प्लॅन आखतात. तिथे सगळे अनेक तक्रारी करतात, पण त्या पावसाचा मनमुराद आनंद लुटतात. हिंदी गाण्यांचं प्रेम वारंवार डोकावत राहतं. 'जिंदगी की ना टूटे लडी...' हे गाणं एरव्ही आपण अनेकदा ऐकलेलं असतं. पण अनन्या त्या ओळींचा जो अर्थ लावतात, ते वाचून त्यांच्या मनात नेमकी कोणती उलाघाल सुरू आहे, याची जाणीव होते.
'चरित्रहीन' नावाचं एक टिपण आहे. त्यात उपचार करताना केस गळाल्यामुळे विग खरेदी केल्याचा प्रसंग आहे. खरंतर बोडकं डोकं ठेवून फिरण्यात त्यांना संकोच वाटत नाही. पण लोकांच्या नजरांमध्ये सहानुभूती आणि मुलांना भीती वाटू नये, म्हणून त्या विग वापरायचं ठरवतात. हा प्रसंग खरंतर एका वेगळ्या अर्थाने खरंच खूप चटका लावणारा पण तो मांडताना, विग आणि स्त्रीचं चारित्र्य या गोष्टींचा शेवटच्या ओळीत लावलेला संबंध त्यांच्या आगळ्या वैचारिकतेचा परिचय देतात.
या छोट्याशा डायरीत बरंच काही हृदयस्पर्शी आहे. मूळच्या दिल्लीकर अनन्या, पुण्यात शिकल्या, त्यानंतर ऑस्ट्रेलियाला गेल्या. परतल्यावर सहा आकडी पगार आणि आवडतं शहर सोडून त्या लग्नानंतर जयपूरला स्थायिक झाल्या. प्रचंड बुद्धिमत्ता आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वाबरोबर मिश्किल शैलीमुळे त्यांचं लिखाणही लोकप्रिय झालं. कॅन्सरने गाठल्यावर अनेकजण गारठतात. पण अनन्या यांनी शेवटच्या क्षणापर्यंत हा मिश्किलपणा टिकवून ठेवला. याचा अनुभव हे पुस्तक वाचताना येतोच.
अभिनेत्री मनीषा कोईराला आणि क्रिकेटपटू युवराज सिंग यांच्या छोट्याशा प्रस्तावना आहेत. कॅन्सरमुक्त होण्याची स्वप्न पाहताना आयुष्य उगाच खंतावत घालवणं अनन्यांना मंजूर नव्हतं. त्यामुळे त्यांची ही कहाणी छोटी असली तरी वाचनीय आहे. पुस्तकांतली चित्र आणि विशेषतः मुखपृष्ठ वेधक आहे.
..............
टेल्स फ्रॉम द टेल एंड- माय कॅन्सर डायरी
लेखिका -अनन्या मुखर्जी
प्रकाशन - स्पीकिंग टायगर
किंमत - ३९९. पाने - १०२
......................................