एक असते चिमणी.… एक असतो कावळा. कावळ्याचं घर असतं शेणाचं. चिमणीचं घर मेणाचं. धो-धो पाऊस पडतो. कावळ्याचं शेणाचं घर वाहून जातं. कावळा येतो चिमणीच्या घरी.
''चिमणे, चिमणे दार उघड''.
चिमणी म्हणते, ''थांब मेल्या, माझ्या लेकराला न्हाऊ घालू दे''.
ही गोष्ट पायात पैंजणं घालायच्या वयातच कानावर पडते. या गोष्टीतल्या चिऊ-काऊचे पायठसे मनाच्या मुलायम मातीवर उमटलेले असतात. या गोष्टीशी आपण सारे परिचित असतो. या गोष्टीच्या लेखकाबद्दल मात्र आपण अनभिज्ञ असतो. 'लीळाचरित्रा'त या गोष्टीचा संदर्भ येतो. म्हणजे किमान हजार-बाराशे वर्षे जुनी ही गोष्ट आहे. या गोष्टीचा रचयिता माहीत नाही म्हणल्यापेक्षा या गोष्टीला रचियताच नाही, म्हणजे ही पिढ्यान्पिढ्या चालत आलेली लोककथा आहे. जातं फिरत रहातं आणि पीठ पडत रहातं त्याप्रमाणे माणसांचं जगणं पुढं सरकताना गोष्टी निर्माण होत रहातात. माणसाच्या जगण्याबरोबरच गोष्ट निर्माण झाली. भाषा नव्हती तेव्हाही गोष्ट होती. आपण फोटो काढतो म्हणून फुलपाखरू फुलावर बसत नाही. भोवताली घटना घडत रहातात. त्याबद्दल माणसाला बोलावं वाटतं. त्यातून गोष्ट निर्माण होते.
अनेक शब्द एकत्र येतात. त्यांची गोष्ट होते. प्रत्येक शब्दात एक अनुभव ठेवलेला असतो. 'नदी' शब्दात वहाणे असते. 'झाड' शब्दात हिरवाई असते. 'विंचू' शब्दात दंश असतो. 'रस्ता' शब्दात प्रवास असतो. अशा पिटुकल्या गोष्टी शब्दांमध्ये सुरक्षित ठेवलेल्या असतात. 'अबोली' असा एक शब्द आहे. अबोली म्हणजे 'न बोलणारी', असू शकते एखादी मूक. पण 'अबोली' हे नाव चक्क एका फुलझाडाचं नाव आहे. हे नामकरण 'फॅशन' म्हणून झालेलं नाही. तर या शब्दातही एक छोटुशी गोष्ट आहे. प्रत्येक फुलाला बरा-वाईट गंध असतो. दुर्गंध, सुगंध, दर्प हे माणसाचे चोचले आहेत. प्रजननाच्या प्रक्रियेत हा गंध झाडासाठी उपयुक्त असतो. झाड गंधाच्या भाषेत बोलतं. अबोलीच्या फुलांना गंधच नसतो. त्यामुळं अबोली मुकी आहे. 'अबोली' शब्दातली हीच छोटीशी गोष्ट आहे.
दुधात अमुकतमुक टाकून लेकराला प्यायला दिलं की त्याची वाढ चांगली होते, अशी जाहिरात आपण टीव्हीवर पहातो. पण लेकरांच्या वाढीसाठी दुधात टाकलेल्या त्या अमुकतमुकबरोबरच गोष्टीही महत्त्वाच्या आहेत. विनोबा भावेंना लहानपणी त्यांचे वडील खाऊ म्हणून गोष्टीची पुस्तकं आणायचे. मुलांच्या संपूर्ण वाढीसाठी गोष्टीचं महत्त्व इथे अधोरेखित होतं. पूर्वी घरोघर नातवांना गोष्टी सांगणारे आजी-आजोबा होते. आता घरोघर टीव्ही आहेत. सांगितल्या जाणाऱ्या गोष्टींपेक्षा टीव्हीपेक्षा दृकश्राव्य गोष्टी नक्कीच प्रभावी आहेत. पण या अतिप्रभावाचा दुष्परिणाम जास्त होताना दिसतो. कल्पना वाढण्याऐवजी मुलं कल्पनेच्या जगातच जगू लागली आहेत.
भारतीय संस्कृतीत गोष्टीला फार महत्त्व आहे. बरेचदा या गोष्टीला धार्मिक विधीशी जोडल्या गेलं आहे. आजही काही समाजात घरात मृत्यू झाल्यानंतर दहा दिवसाच्या सुतकात गोष्टी वाचल्या जातात. शुक्रवारची कहाणी, सत्यनारायणाच्या कथा, संतोषीमातेची कथा, भागवत कथा, कीर्तनातलं आख्यान, तमाशातला वग, इसापनीती, परीकथा, जातककथा, जैनचुर्णी, अरेबियन नाईटस्, वेताळ कथा ही सर्व गोष्टीवेल्हाळ माणसांनी निर्मिती आहे. अर्थात, या गोष्टी निर्माण करण्यामागे वेगवेगळे हेतू आहेत. नाटकालाही कथानक असतं. चित्रपटाला स्टोरी असते. आजकाल मराठी चित्रपटाचा सर्वत्र बोलबाला आहे. त्याचं कारण म्हणजे मराठी चित्रपटांतून निघून गेलेली गोष्ट पुन्हा एकदा नांदायला परत आली आहे.
गोष्ट भाषेत बांधली जात असली तरी या गोष्टीला भाषेचं बंधन नाही. मॅक्झिम गॉर्कीची 'मदर' मराठीत स्थिरस्थावर होते. तर साने गुरुजींची 'आई' जपानी भाषेत तुळशीची पूजा करीत असते. माणसाच्या जगण्याला पुरणारी गोष्ट म्हणजे महाभारत आणि रामायण. या महाकथा भारतीय माणसांच्या जगण्यात झिरपल्या. एखादी पिटुकली कथा माणसाला अस्वस्थही करते. पिटुकली म्हणजे फक्त सहा शब्दांची अर्नेस्ट हमिंग्वे यांची दु:ख सांगणारी गोष्ट आहे. 'न वापरलेले तान्हुल्याचे बूट विक्रीस आहेत!' गोष्ट छोटी असो की मोठी, तिचा आवाका आणि प्रभाव मोठा असतो. एकूण गोष्टीची गोष्ट सांगणं सोपं नाही...
-दासू वैद्य