अ‍ॅपशहर

कृत्रिमतेमुळे पक्षी जगतात असमतोल

पक्ष्यांना धान्य आणि अन्न खाऊ घातल्यामुळे त्यांचे उपजत ज्ञान नष्ट होऊन त्यांचा जीवनक्रम बदलण्याचा धोका आहे. त्या निमित्त...

Maharashtra Times 13 Oct 2017, 11:50 am
>> नंदू कुलकर्णी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम feeding the birds is harmful for nature
कृत्रिमतेमुळे पक्षी जगतात असमतोल


पक्ष्यांना धान्य आणि अन्न खाऊ घातल्यामुळे त्यांचे उपजत ज्ञान नष्ट होऊन त्यांचा जीवनक्रम बदलण्याचा धोका आहे. त्या निमित्त...

...................

शहरीकरण वेगाने वाढल्यामुळे आसपासच्या निसर्गावर आक्रमण झाले आहे. वृक्ष कमी झाल्यामुळे अनेक पक्षी सैरभैर झाले आहेत आणि ते शहरात सर्रास दिसू लागले आहेत. उदा. जंगली किंवा डोमकावळा. जंगल मैना, कोतवाल, तांबट, धनेश आदी पक्ष्यांची अन्न-पाण्यासाठी भटकंती वाढली आहे. प्रसंगी मिळेल त्या अन्नावर गुजराण करण्याचे दुर्भाग्य त्यांच्या नशिबी आले.

अनेक निसर्गप्रेमी, पक्षीप्रेमी आणि धार्मिक विचारांचे श्रद्धाळू (पुण्य पदरी पडते यासाठी) या पक्ष्यांना धान्य खाऊ घालत असतात. पक्ष्यांचा थवा जमला की त्यांना आत्मिक समाधान मिळते. याविषयी अनेक पत्रकेही प्रसिद्ध केली जात आहेत. अमुक एक गोष्ट केली, की पुण्य मिळेल किंवा असे करणे तुमचे कर्तव्यच आहे अशा अर्थाचा मजकूर त्यामध्ये असतो. अनेक पापभीरू दयावान नागरिक खिडकीत, बाल्कनीत, गच्चीमध्ये, कंपाउंडच्या भिंतीवर आदी ठिकाणी पोळी, भाकरी, भात असे अन्नपदार्थ पक्ष्यांसाठी रोज खायला ठेवतात. आधुनिक जमान्यात बर्ड-फिडर्सची (धान्याच्या बरण्या) संकल्पना रुजू लागली आहे. या उपक्रमातील सर्वांना आपण खूप मोठे परोपकारी आणि पर्यावरणपूरक कार्य करीत आहोत, अशी भावना झालेली असते.

या सर्वांचा उद्देश जरी चांगला असला तरी अशा कृतींमधून पर्यावरणाला हातभार लागण्याऐवजी पर्यावरणाची हानी होते आहे किंवा असमतोल निर्माण होतो आहे, याची थोडीही कल्पना नाही. याचे कारण म्हणजे पर्यावरणाचे अज्ञान आणि काही श्रद्धांचा पगडा.

काही दिवसांपूर्वी धनेश पक्षी शिळा भात खाताना बघून खूप वाईट वाटले. वास्तविक, आपल्या आसपास दिसणाऱ्या पक्ष्यांचे नै‌सर्गिक अन्न वेगवेगळे आहे. त्यामध्ये धान्य खाणारे पक्षी फक्त चिमणी आणि कबूतर हे आहेत.

उदा. चिमणी - कीटक, धान्य,

कावळ - पाली, सरडे, उंदीर, मेलेल्या प्राण्यांचे मांस

साळुंकी - जंगली मैना, कीटक, फळे

कबुतर / पारवा - धान्य, फळे

घार - पाली, सरडे, उंदीर

दयाळ - कीटक, सरपटणारे प्राणी

बुलबुल - कीटक, फळे

कोकिळा - कीटक, फळे

धनेश - पाली, सरडे, फळे

डोमकावळ - मेलेले प्राणी, छोटे पक्षी-अंडी

टोपीवाला (ग्रेट टीट)- कीटक, फळे

भारद्वाज - पाली, सरडे, छोटे पक्षी व त्यांची अंडी

शिंजीर- पुष्परस (Nector), कीटक

मुनिया - बिया, फळे

तांबट - कीटक, फळे

शहरामधून चिमणी हद्दपार झाली आहे. केवळ कृत्रिम घरटी ठेवून ती परत येणार नाही, कावळे, घारी आणि कबुतरे यांची संख्या अतोनात वाढत आहे. त्यामुळे पक्षी जगतात मोठा असमतोल निर्माण झाला आहे. याबद्दल अनेक तज्ज्ञांनी वेळोवेळी चिंता व्यक्त केली आहे. पण उपाययोजना काहीच नाही. कावळे आणि घारी शहराच्या अस्वच्छतेचे मापदंड आहेत हे वेगळे सांगायला नको. यांच्या संख्येत या दयावानांमुळे आणखी भर पडते आहे. पक्ष्यांना धान्य आणि अन्न खाऊ घातल्यामुळे त्यांची नैसर्गिक / उपजत ज्ञान नष्ट होऊन त्यांचा जीवनक्रम बदलण्याचा धोका आहे. त्यामुळे निसर्गचक्राला सुद्धा काही प्रमाणात बाधा निर्माण होत आहे. हे पक्षी इतर पाळीव प्राण्यांमध्ये होण्याचा धोका आहे.

हे टाळण्यासाठी अन्न-धान्य पक्ष्यांसाठी ठेवण्याऐवजी ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी जशी जागा उपलब्ध असेल त्या प्रमाणात थोडी फुलझाडे व फळझाडे लावावीत. त्यावरील फुले-फळे पक्ष्यांसाठी असावीत. बागेमध्ये रासायनिक खते वापरू नयेत व विषारी औषधांची फवारणी करू नये. कीड-नियंत्रण पक्षी करतील.

अन्नधान्य पक्ष्यांसाठी ठेवणाऱ्या नागरिकांचे प्रबोधन पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, सामाजिक पुढारी आणि धार्मिक नेत्यांनी केल्यास या प्रथेला आळा बसेल.

मी गेली १०-१२ वर्षे विषारी औषध फवारणी (कीटक नाशके) अजिबात करीत नाही. चिक्कू पक्षी खातात. डाळिंब खारी खातात. इतर अनेक पक्षी पुष्परसाचा (Nectar) आस्वाद घेतात, झाडावरील कीटक शोधून खात असतात. काही पक्षी छोट्या बियाफळे खात असतात, गवतातील किडे शोधत असतात. त्यामुळे बाग आपोआप कीडमुक्त राहाते. फक्त रोज त्यांच्यासाठी पाणी भरून ठेवतो कारण त्यांच्यासाठीचे नैसर्गिक जलस्रोत आपणच नष्ट केले आहेत किंवा प्र‌दूषित केले आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज