अनुवाद-बिनुवाद वगैरे
'बळी तो कान पिळी'चा थेट विस्तार म्हणजे इतिहास. हाणामारी, वादावादी, रणधुमाळी म्हणजेच इतिहास. इतिहासातून आपण काहीच शिकलो नाही. शिकत नाही, हाही एक इतिहास. पण अलीकडे का कोण जाणे, संवाद सौहार्द, संयम, संवेदनशीलता, सुजनतादीचे मर्म नि महत्त्व आपल्याला पटू लागले आहे. सध्या यामुळे अनुवादाला चांगले दिवस आले आहेत. अनुवाद-फिनुवाद- असे म्हणून हिणवला जाणारा हा वाङ्मय प्रकार आताशा शीर्षस्थानी आला आहे. विविध भाषा शिकवणारे वर्ग छोट्या शहरांमध्येही जोरात सुरू आहेत. ही भाषिक जाणीव जागृती तशी लक्षणीय म्हणायची. अनुवादकांना, दुभाषांना सर्व क्षेत्रांत सध्या मोठी मागणी आहे. अनुवादित साहित्याचा खपही खूप वाढला आहे. वादापेक्षा संवाद, संवादातून अनुवाद हा भाषिक प्रवास नक्कीच प्रसन्न करणारा आहे.
अनुवादकाला भाषांतर, लिप्यंतर, रूपांतर वगैरे अनेक पर्यायी शब्द असले तरी ती एकूण प्रक्रिया त्यातून पुरेशी स्पष्ट होत नाही. होणारही नाही. अनुवादकाला किती नि काय-काय सायास करावे लागतात, हे जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे! हे तसे पुरतेपणी समोर आलेले नाही. अनुवादक अनुवादविषयक आपले अनुभव साक्षेपाने नोंदवत नाहीत, हे वास्तव आहे.
स्वतंत्र व सृजनशील लेखनासाठी जेवढी प्रातिभ ऊर्जा खर्ची पडते, त्याहून कितीतरी अधिक दमछाक अनुवाद करताना होते. एखादी अभिजात कविता लिहिताना जितकी भावनिक, मानसिक व बौद्धिक दमणूक होते, तितकीच अनुवाद करतानाही होते. तरीही अनुवादाला दुय्यम स्थान दिले जाते. त्यामागची भूमिका काय आणि ती का, यावरही मौनच आहे.
मुन्शी प्रेमचंदांनी अनेक कथा-कादंबऱ्या, ज्या त्यांनी आधी उर्दूत लिहिल्या, त्या स्वत: हिंदीत आणल्या. डॉ. हरिवंशराय बच्चन, डॉ. रांगेय राघव अशा दिग्गजांनी शेक्सपिअरची बहुतेक सर्व नाटके हिंदीत आणली. गुलजारांनी तर भाषा व बोली मिळून तब्बल छत्तीसेक स्त्रोत शोधून बरेच भांडार हिंदी-उर्दूत आणले. आगरकर, चिपळूणकर, वरेरकर, गुर्जर, ना. ग. गोरे, करंदीकर, पाडगावकर, बांदिवडेकर, खडसे, नरसिंह राव, 'पुल', अशोक जैन, भातंब्रेकर, गजानन चव्हाण, बलवंत जेऊरकर आणि मास्ती व्यंकटेश अयंगार, आदींनी केलेल्या अनुवादांनी भाषांतील अंतर कमी करत भाषाभगिनींचे साहित्यिक व सांस्कृतिक प्रांगण आणि परिघ केवढा तरी श्रीमंत केला आहे.
डॉ. सुमतिंद्र नाडिग यांच्या 'दाम्पत्य-गीता' या कन्नड काव्याचा डॉ. केशव मेश्रामांनी केलेल्या मराठी अनुवादाचे प्रकाशन अस्मादिकांनी केले तो आनंद आजही ताजा आहे. या काव्याचा संस्कृत व हिंदीतील अनुवादही किती सुंदर व सरस आहे हे वाचल्याशिवाय कळणे नाही.
डॉ. बच्चन यांच्या आत्मकथेच्या चौथ्या खंडाच्या माझ्या अनुवादाला साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभला. त्यावेळचे अनुभव अंतर्मुख करून गेले. त्यातील ही वानगी. डॉ. बच्चन व ज्ञानपीठप्राप्त डॉ. गोकाक दोनेक महिने परदेशी दौऱ्यात सोबत होते. तरीही डॉ. बच्चन यांनी त्यांचा उल्लेख डॉ. विजय कृष्ण गोकाक (खरे तर विनायक) असा केला आहे. छोटीशी, पण मजेशीर गोष्ट आहे ही. डॉ. राजेंद्रबाबू राष्ट्रपती असताना त्यांच्या निवासस्थानी डॉ. बच्चन यांनी आपल्या जनगीतेचे वाचन केले. तिथे जनगीता 'रेहल' (ग्रंथ ठेवण्याची लाकडी घोडी) वरती ठेवली, असा उल्लेख आहे. 'रेहल' हा शब्द अरबी. आपण त्याला अतिव्याप्त असा 'व्यासपीठ' शब्द वापरतो. आपले संतसाहित्य व परंपरा समृद्ध असताना आपण योग्य व नेमका शब्द अजून तरी तयार करू शकलो नाही. याचे कोडेच वाटते.
आत्मप्रौढीचा दोष पत्करूनही मी म्हणेन, माझ्या इतके तेलुगू साहित्य मराठीत कुणीही आणलेले नाही. डॉ. केशव रेड्डींच्या तीन कादंबरिका. डॉ. रेड्डी आशिया खंडातील प्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञ. या लेखकाला नोबेल मिळाले असते तरी, त्यांचा उचित गौरव झाला, असे मी म्हणणार नाही. दुसरे कालीपटनम रामाराव सध्या वयाच्या शतकापर्यंत. अवघ्या नऊ कथांच्या संग्रहाला १९८४ चा साहित्य अकादमी पुरस्कार. एकेक कथा-कादंबरीच काय, महाकादंबरी म्हणावी एवढ्या गुणवत्तेची. 'त्याने जंगल जिंकले' (अतडु अडविती जयिंचाडु) डॉ. रेड्डींची ही कादंबरिका. 'Old Man and The Sea'लाही सरपास करणारी, असे समीक्षक म्हणतात. त्या कादंबरिकेत 'तोट्टि'हा तेलुगू शब्द हिंदी-इंग्रजी अनुवादात आला आहे. 'तोट्टि' हे फार महत्त्वाचे कॅरॅक्टर आहे. मला स्थानिक शब्दच हवा होता. सहाएक महिन्यांच्या धडपडीतून मला तो भेटला-राखी वटवट्या - wren warbler मी सुटलो. अनुवाद यात्रेतील असे अनेक अध्याय आहेत.
शेवटी ही लघू लेखनकामाठी संपवताना 'अनुवाद' या शब्दाचा एक मजेशीर अर्थही सांगून टाकतो- मागावून निर्माण होणारा वाद.
- वसंत केशव पाटील