पुष्पा भावे
सामाजिक न्यायासाठी सत्ता राबवणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांच्या नावाचा पुरस्कार हा प्रा. पुष्पा भावे यांच्या व्रतस्थ कार्याचा यथार्थ गौरव आहे. रूढार्थाने कोणतेही संघटन पाठीशी नसताना सत्तेशी संघर्ष करणे खूप आव्हानात्मक असते आणि त्यासाठी वाघाचे काळीज असावे लागते. महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेवर असताना विशेषत: किणी प्रकरणाच्यावेळी पुष्पाबाईंनी सत्ताधारी शिवसेनेशी केलेल्या संघर्षाची महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद झाली आहे. मराठी माणसांना मुंबईबाहेर घालवण्यास मराठी माणसांचे कैवारी म्हणवून घेणारेच जबाबदार असल्याचे पुष्पाबाई पंचवीस वर्षांपूर्वी ठणकावून सांगत होत्या. धमक्या आणि प्रचंड हेटाळणी वाट्याला येऊनही बाई डगमगल्या नाहीत. आजसुद्धा एखाद्या प्रश्नावर भूमिका घ्यायला भलेभले घाबरतात तेव्हा पुष्पाबाई पुढे होऊन वाट करून देतात. तमाम प्रगतीशील चळवळींशी जोडून घेऊन काम करणारी महाराष्ट्रात मोजकीच माणसं आहेत, त्यात पुष्पाबाईंचा समावेश होतो. त्यांचा पेशा प्राध्यापकाचा आणि कार्यक्षेत्र साहित्यिक-सांस्कृतिक, परंतु तेवढ्या मर्यादेत त्यांनी स्वत:ला बांधून घेतले नाही. संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन, दलित पँथरची चळवळ, एक गाव एक पाणवठा चळवळ, हमाल पंचायत, देवदासी मुक्ती अशा विविध चळवळींमध्ये योगदान देतानाच शेतकरी, कामगार, अदिवासी, दलित आदी घटकांच्या लढ्यामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग दिला. साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक निधी, भारत-पाकिस्तान पीपल्स फोरम फॉर पीस अँड डेमॉक्रसी, मृणाल गोरे साऊथ एशियन सेंटर, केशव गोरे स्मारक ट्रस्ट अशा संस्थांचे काम करतानाही त्यांच्या वैचारिक दृष्टीचे दर्शन घडले. प्राध्यापक म्हणून काम करताना त्यांनी समाजशिक्षकाची भूमिका आत्मीयतेने निभावली. त्यांचा सन्मान हा महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीतील तमाम कार्यकर्त्यांना आपलाच सन्मान वाटतो, एवढे प्रेम त्यांनी संपादन केले आहे.