साहेबराव ठाणगे
रामायण म्हटले, की भारतीयांचा ऊर भरून येतो. रामायण आपल्या संस्कृतीचा ठेवा असून रोजच्या जगण्यात, पावलोपावली त्याचे दाखले दिले जातात. 'पुत्र असावा, तर प्रभुरामासारखा', 'पती असावा तर मर्यादापुरुषोत्तम रामासारखा', 'भाऊ असावा तर लक्ष्मणासारखा', 'पत्नी असावी तर सीतेसारखी', असे म्हणताना, 'बायको असावी तर वाल्याकोळ्याच्या बायकोसारखी,' असा दाखलाही आवर्जून द्यायला हवा; कारण तीच खरी रामायणकर्त्याची कर्ती आहे, हे सत्य दुर्लक्षितच राहिले. वाल्मिकीच्या जडणघडणीसंबंधी अगदी जुजबी इतिहास सांगितला जातो. वाल्या कोळी वाटसरूंना जंगलात अडवून, प्रसंगी त्यांचे मुडदे पाडून, त्यांची लूट करून चरितार्थ चालवायचा. एकदा नारदमुनींना वाल्याने अडवले. नारदमुनींनी त्याचे तिथल्या तिथे बौद्धिक घेतले. ' हे पापकर्म कशासाठी करतोस,' असे विचारल्यावर, 'माझ्या बायको-पोरांसाठी,' असे त्याने उत्तर दिले. यावर नारदमुनी म्हणतात, 'जा, तुझ्या बायकोला विचारून ये. ते तुझ्या पापात सहभागी आहेत का?' 'तू इथेच थांब, मी विचारून येतो,' म्हणत वाल्या पळतच घरी येतो. घरात घुसतो. बायको-मुले घाबरतात. तो बायकोला विचारतो, 'बोल, तू माझ्या पापात सहभागी आहेस की नाही?' आता विचार करा, शेकडो माणसांचे मुडदे पाडलेला दरोडेखोर नवरा असा संतापल्यावर, एक परावलंबी स्त्री दुसरे काय उत्तर देणार? पण नाही. त्या तडफदार स्त्रीने क्षणाचाही विचार न करता, 'नाही. मी तुमच्या पापात सहभागी नाही,' असे सडेतोडपणे सांगितले आणि तोच वाल्या कोळ्याच्या जडणघडणीतला 'टर्निंग पॉइंट' ठरला.
गरीब बापड्या बायकोच्या अनपेक्षित तडफदार उत्तराने त्याचे डोळे खाडकन उघडतात. तो नारदमुनींची क्षमायाचना करतो. नारदमुनी त्याला दीक्षा देतात. तो तप करतो आणि दरोडेखोर वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी होऊन रामायण हे महाकाव्य रचतो. ही सरळ साधी गोष्ट आपण वाचून सहज सोडून देतो; पण एक साधी शंका कुणाच्या मनात का येत नाही? की समजा, वाल्या कोळ्याच्या बायकोने, 'व्हय, आम्ही आहोतच की तुमच्यासंगं,' असे सर्वसाधारण, सोयीचे उत्तर दिले असते तर? नारदाचे काही खरे नव्हतेच; पण वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी होऊन, त्यांनी रामायण तरी कसे रचले असते? पापाचा पैसा कमावणाऱ्या पतीपरमेश्वराला, उंबऱ्यातच अडवून ते पाप घरात घ्यायला, त्या पापात सहभागी व्हायला, गृहिणी नकार देतील, तर भ्रष्टाचार नक्कीच कमी होईल. फक्त त्यांनी वाल्याच्या बायकोचा आदर्श घेतला पाहिजे.