प्रा. शीला निपुणगे
मराठी कवितेतील 'घरा'विषयीच्या रचना हा एक अमोल ठेवा आहे. हृदयातील अकृत्रिम आणि अलवार भावनांचा तो अंत:स्फूर्त आविष्कार आहे. अनेक कवींनी, अनेक परींनी, अनेक अंगांनी या घराला वेगवेगळे आयाम दिले आहेत. पत्नीविषयीच्या मृदु भावना व्यक्त करणाऱ्या या कवितांमधून या नात्यातील माधुर्य अधिकच गहिरे झाले आहे.
कविवर्य केशवसुतांच्या कवितेत गावाकडच्या घरी स्वप्ननिद्रेत असलेल्या कान्तेचे मनोज्ञ चित्रण आहे, तर ग. ह. पाटील यांनी 'सहधर्मिणी' या कवितेत- 'आता आमुचिया घरात कमला प्रत्यक्ष आली असे,' असे गौरवोद्गार काढले आहेत. भावकवी ना. घ. देशपांडे यांनी, पत्नीला, 'उन्मनी' या कवितेत, 'पुनवेची शशिकला', 'सुंदर चाफेकळी' अशा मोहक उपमांनी सजवून म्हटले आहे-
'भलतीच गडे तू भरविलीस उन्मनी
हे अनंत धागे गुंतले तुझ्या लोचनीं...'
राम गणेश गडकरी यांनी- 'तूं सीता ती, राम तोच मी, त्याच आज माता। परि जे गेले दिन ते आता येतिल कां हाता?' असे भावजागरण केले आहे.
'जन म्हणती सांवळी तुज सगळे। करुणार्ह बिचारे ते आंधळे' असे पत्नीच्या श्यामल वर्णाचे भावमधुर वर्णन भा. रा. तांबे करतात, तर 'स्वत:च्या हातचा गोड अल्पाहार, श्रमपरिहार बोलतां - बोलतां' अशी सुखद अनुभूती कवी 'अनिल' यांना येते. दिवस-रात्र कामामध्ये निमग्न असलेल्या सहचारिणीला विंदा करंदीकर यांनी- 'सुहासिनी,' 'यक्षिणी,' 'पक्षिणी,' संहिता,' 'स्वप्नसती' अशी अर्थगर्भ विशेषणे बहाल केली आहेत. 'संसाराच्या दहा फुटी खोलीत दिवसाच्या चोवीस मात्रा चपखल बसविणारी तुझी किमया मला अजूनही समजलेली नाही,' असे 'झपताल' कवितेतील त्यांचे शब्द फार बोलके आहेत.
लोकविलक्षण कविता लिहिणारे बंडखोर कवी म्हणजे लोककवी 'मनमोहन'. १९५४ साली पत्नीच्या निधनानंतर त्यांना अतिशय विरक्ती आली. 'प्रिय शोभास' या कवितेत तिच्या आठवणींनी व्याकूळ होऊन ते म्हणतात-
'हाल किती तूं सखे काढिले
कधीं चुलीला नव्हता विस्तव,
कधीं जुनेरें अंगावरलें
चिंध्यांचेंही होतें वैभव'
त्या त्या काळातील शब्दांचा पोत, त्यातील भावगर्भता यातून मनातील आंदोलने उत्कटतेने प्रत्ययाला येतात.
आधुनिक काळातील कवी हेमंत गोविंद जोगळेकर यांच्या कवितेत एकूणच घराला आगळे स्थान आहे- 'संध्याकाळी कामावरून दमून, भागून आल्यानंतर 'चुलीसमोर बसलेल्या तिच्या चेहऱ्यावरचे धगधगीत, अपरिचित रंग' पाहून कवीची सकाळची मधुर स्वप्ने भंग पावतात.' सुधीर मोघे यांचे 'घर दोघांचे' अतूट विश्वासावरच भक्कम उभे राहते, तर नारायण सुर्वे यांच्या 'सत्य' कवितेत, हलाखीत कुचंबून जगणाऱ्या पत्नीची घुसमट कवीला अस्वस्थ करीत राहते. संदीप खरे यांना- 'ती घरी नसते, तेव्हा संसार फाटका झाल्यासारखे' वैफल्य घेरून टाकते. सदानंद देशमुख यांना- 'कुऱ्हाडीच्या दांड्यापासून दूर असलेल्या विहिरीवरच्या सुगरणीच्या खोप्यासारखे घर दोघांसाठी बांधता येईल का?' असे पत्नीला विचारावेसे वाटते. प्रल्हाद चेंदवणकर हे मनस्वी कवी- 'जुनेराला जुनेर जोडत, तूच दिलास उसळत्या कवितांना आधार...' असे पत्नीचे ऋण मानतात. कृ. ब. निकुम्ब यांनी तर 'माझा कणी कोण्डा' या कवितेत सहचारिणीची थोरवी वर्णन करताना तिच्या अंत:करणातील ओलावा आणि दातृत्व यांच्या सीमा वेशीपर्यंत भिडविल्या आहेत.
सुखदु:खात साथ देणाऱ्या पत्नीच्या कष्टांची जाण ठेवून तिच्याविषयी विशुद्ध आत्मभाव, आस्था आणि आदर बाळगणाऱ्या प्रज्ञावंतांची ही 'अक्षरे' मराठी काव्याचे भूषण ठरावीत.