करोनाच्या आक्रमणाने जगाच्या अर्थव्यवस्थेला लगाम घातला. पर्यटकांचे प्रवास रोखले. शाळांच्या परीक्षा अडचणीत आणल्या. राजकीय मेळाव्यांना बांध घातला. मॉल आणि दुकाने ओस पाडली. क्रीडास्पर्धांवर कुशंकांचे काळे ढग पसरवले. पण हे आक्रमण आता सगळ्या सांस्कृतिक व्यवहारांनाही ग्रासून टाकते आहे. मराठी नाट्य संमेलनाचे यंदा शताब्दीचे वर्ष आहे. त्या निमित्ताने केवळ एकच नव्हे तर २५ मार्च ते १४ जून या काळात १३ ठिकाणी हे संमेलन आणि नाट्यजागर होणार होता. राज्य सरकारने नुकतीच अर्थसंकल्पात उदारपणे या संमेलनांसाठी दहा कोटी रुपयांची भरीव तरतूद केली. आता हा नाट्यजागर बेमुदत पुढे ढकलावा लागला आहे.
करोनाची चर्चा सुरू झाल्यापासून चित्रपटगृहे, नाट्यगृहे आणि सभागृहांमधील सांस्कृतिक कार्यक्रम किंवा भाषणे-परिसंवाद यांची उपस्थिती रोडावत चाललीच होती. हल्ली तशीच गंभीर भाषणे आणि परिसंवादांना श्रोते जमेपर्यंत संयोजकांच्या मनात (चहापाणी ठेवले तरी) धाकधूक चालू असते. सताड रिकाम्या खुर्च्या पाहून वक्ते तोंड पाडत असतात. पण करोनाने एका आठवड्यात या सगळ्या भल्याबुऱ्या कार्यक्रमांची बेसुमार कत्तल केली आहे. वृत्तपत्रांकडे ज्या वेगाने नवनव्या कार्यक्रमांची माहिती येत असते, त्याहीपेक्षा वेगाने आता हे सगळे कार्यक्रम रद्द झाल्याची निवेदने येऊन आदळत आहेत. त्यात मुलाखती आहेत, तसेच संगीताचे कार्यक्रम आहेत. गायनस्पर्धा आहेत, तसेच परिसंवाद आहेत. मुक्तचर्चा आहेत, तशी वैचारिक अभ्यास शिबिरेही आहेत. महाराष्ट्राला अशा चौफेर सांस्कृतिक ओहोटीचा सामना याआधी कधी करावा लागला नसेल. आता तर राज्य सरकारने करोनाचे संशयित रुग्ण सापडलेल्या मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड, नागपूर येथील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे बंद ठेवण्याचा फतवाच काढला आहे. पडेल नाटके आणि चित्रपटांना ही इष्टापत्ती वाटली तरी अनेक उत्तम चित्रपट, नाटके तसेच वाद्यवृंदांना, गाण्याच्या कार्यक्रमांना याचा जबर फटका बसणार आहे. याशिवाय, मुंबई, पुणे, नागपूर या महानगरांमध्ये नवे चित्रपट आणि नवी नाटके रसिकांसमोर सादरच होऊ शकली नाहीत तर त्यांची झळाळी करोनाने निरोप घेईपर्यंत टिकवून धरणे, हे आव्हानही सोपे नाही. ही सांस्कृतिक टाळेबंदी सरकारने अधिकृतपणे जाहीर केली असली-नसली तरी इतरही जिल्ह्यांमध्ये आणि शहरांमध्ये ती पसरत जाणार, हे दिसतेच आहे.
सध्या सणांचे दिवस नाहीत. तरीही, गुढी पाडवा जवळ येतो आहे. त्यानंतर नऊ दिवसांनी रामनवमी येईल. अनेक गावांच्या जत्रा तोंडावर आल्या आहेत. गावोगावी फिरणाऱ्या पवित्र 'काठ्या' तीर्थक्षेत्री जाण्याचा काळही जवळ येतो आहे. गेल्या काही वर्षांमध्ये गुढी पाडव्याचे स्वागत मराठी नववर्षदिन म्हणून जोरदार उत्सवीपणे करण्याची प्रथा चांगली रुजली आहे. यंदाच्या पाडव्याला भव्य मिरवणुका आणि नववर्षाचे दिमाखदार स्वागत होण्याची शक्यता कमी दिसते. शेकडो-हजारो नागरिकांनी एकत्र येऊन जल्लोष करावा, इतके नि:शंक व निर्भय वातावरण पुढच्या दहा-बारा दिवसांत निर्माण होणार नाही. छोट्या किंवा मोठ्या पडद्यावर लोकप्रियता मिळवलेले कलावंत अशा जाहीर सोहळ्यांमध्ये यावेत, यासाठी संयोजकांची धडपड चालू असते. या 'स्टार्स'नाही चाहत्यांची अशी भेट, त्यांच्यासोबतची छायाचित्रे हे सुखावत असते. आता एकतर असे सांस्कृतिक कार्यक्रम होणे कठीण, तिथे असे स्टार जाणे त्याहून कठीण आणि अपवादाने गेलेच तर आपल्याला कुणी स्पर्श तर करीत नाहीना, शेकहँडसाठी हात तर पुढे करत नाहीना, या भीतीने त्यांची गाळण उडून जाईल. थोडक्यात, आता येते काही दिवस महाराष्ट्राचे सांस्कृतिक भरणपोषण करण्याची सारी जबाबदारी इडियट बॉक्स, इंटरनेट, मोबाईल फोन आणि या साऱ्यांमधून अवतरणाऱ्या कार्यक्रमांवर असणार.
तसाही शहरी महाराष्ट्र अलीकडे घरातच सांस्कृतिक भूक कशी भागेल, असाच विचार आणि आचार करू लागला होता. प्रवासाची दगदग, खिशाला बसणारी चाट आणि 'गंभीर विषय असेल तर' डोक्याला लागणारा शॉट यापेक्षा छोट्या पडद्यावर दिसणारी, बदलता येणारी नाच-गाणी किंवा प्रहसनांमध्ये बाप्यांच्या होणाऱ्या बाया किंवा मालिकेच्या भागागणिक कुटील होणारी कौटुंबिक कारस्थाने हे सारे कितीतरी बरे. हे पाहताना 'करोना'बद्दलची काव्यमय काळजी अनुभवायची असेल तर 'गो.. करोना.. करोना.. गो' असा गंभीर मंत्रोच्चार करणारे मंत्री घरी बसून न्याहाळायचे. महाराष्ट्रात अशी आणीबाणी व संचारबंदी लादणारा 'करोना' लवकरच गाशा गुंडाळेल आणि तो गेल्याचा जल्लोष म्हणून पाडव्याला न वाजणारा ताशा पुन्हा कडाडेल, हीच अपेक्षा!
करोनाची चर्चा सुरू झाल्यापासून चित्रपटगृहे, नाट्यगृहे आणि सभागृहांमधील सांस्कृतिक कार्यक्रम किंवा भाषणे-परिसंवाद यांची उपस्थिती रोडावत चाललीच होती. हल्ली तशीच गंभीर भाषणे आणि परिसंवादांना श्रोते जमेपर्यंत संयोजकांच्या मनात (चहापाणी ठेवले तरी) धाकधूक चालू असते. सताड रिकाम्या खुर्च्या पाहून वक्ते तोंड पाडत असतात. पण करोनाने एका आठवड्यात या सगळ्या भल्याबुऱ्या कार्यक्रमांची बेसुमार कत्तल केली आहे. वृत्तपत्रांकडे ज्या वेगाने नवनव्या कार्यक्रमांची माहिती येत असते, त्याहीपेक्षा वेगाने आता हे सगळे कार्यक्रम रद्द झाल्याची निवेदने येऊन आदळत आहेत. त्यात मुलाखती आहेत, तसेच संगीताचे कार्यक्रम आहेत. गायनस्पर्धा आहेत, तसेच परिसंवाद आहेत. मुक्तचर्चा आहेत, तशी वैचारिक अभ्यास शिबिरेही आहेत. महाराष्ट्राला अशा चौफेर सांस्कृतिक ओहोटीचा सामना याआधी कधी करावा लागला नसेल. आता तर राज्य सरकारने करोनाचे संशयित रुग्ण सापडलेल्या मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड, नागपूर येथील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे बंद ठेवण्याचा फतवाच काढला आहे. पडेल नाटके आणि चित्रपटांना ही इष्टापत्ती वाटली तरी अनेक उत्तम चित्रपट, नाटके तसेच वाद्यवृंदांना, गाण्याच्या कार्यक्रमांना याचा जबर फटका बसणार आहे. याशिवाय, मुंबई, पुणे, नागपूर या महानगरांमध्ये नवे चित्रपट आणि नवी नाटके रसिकांसमोर सादरच होऊ शकली नाहीत तर त्यांची झळाळी करोनाने निरोप घेईपर्यंत टिकवून धरणे, हे आव्हानही सोपे नाही. ही सांस्कृतिक टाळेबंदी सरकारने अधिकृतपणे जाहीर केली असली-नसली तरी इतरही जिल्ह्यांमध्ये आणि शहरांमध्ये ती पसरत जाणार, हे दिसतेच आहे.
सध्या सणांचे दिवस नाहीत. तरीही, गुढी पाडवा जवळ येतो आहे. त्यानंतर नऊ दिवसांनी रामनवमी येईल. अनेक गावांच्या जत्रा तोंडावर आल्या आहेत. गावोगावी फिरणाऱ्या पवित्र 'काठ्या' तीर्थक्षेत्री जाण्याचा काळही जवळ येतो आहे. गेल्या काही वर्षांमध्ये गुढी पाडव्याचे स्वागत मराठी नववर्षदिन म्हणून जोरदार उत्सवीपणे करण्याची प्रथा चांगली रुजली आहे. यंदाच्या पाडव्याला भव्य मिरवणुका आणि नववर्षाचे दिमाखदार स्वागत होण्याची शक्यता कमी दिसते. शेकडो-हजारो नागरिकांनी एकत्र येऊन जल्लोष करावा, इतके नि:शंक व निर्भय वातावरण पुढच्या दहा-बारा दिवसांत निर्माण होणार नाही. छोट्या किंवा मोठ्या पडद्यावर लोकप्रियता मिळवलेले कलावंत अशा जाहीर सोहळ्यांमध्ये यावेत, यासाठी संयोजकांची धडपड चालू असते. या 'स्टार्स'नाही चाहत्यांची अशी भेट, त्यांच्यासोबतची छायाचित्रे हे सुखावत असते. आता एकतर असे सांस्कृतिक कार्यक्रम होणे कठीण, तिथे असे स्टार जाणे त्याहून कठीण आणि अपवादाने गेलेच तर आपल्याला कुणी स्पर्श तर करीत नाहीना, शेकहँडसाठी हात तर पुढे करत नाहीना, या भीतीने त्यांची गाळण उडून जाईल. थोडक्यात, आता येते काही दिवस महाराष्ट्राचे सांस्कृतिक भरणपोषण करण्याची सारी जबाबदारी इडियट बॉक्स, इंटरनेट, मोबाईल फोन आणि या साऱ्यांमधून अवतरणाऱ्या कार्यक्रमांवर असणार.
तसाही शहरी महाराष्ट्र अलीकडे घरातच सांस्कृतिक भूक कशी भागेल, असाच विचार आणि आचार करू लागला होता. प्रवासाची दगदग, खिशाला बसणारी चाट आणि 'गंभीर विषय असेल तर' डोक्याला लागणारा शॉट यापेक्षा छोट्या पडद्यावर दिसणारी, बदलता येणारी नाच-गाणी किंवा प्रहसनांमध्ये बाप्यांच्या होणाऱ्या बाया किंवा मालिकेच्या भागागणिक कुटील होणारी कौटुंबिक कारस्थाने हे सारे कितीतरी बरे. हे पाहताना 'करोना'बद्दलची काव्यमय काळजी अनुभवायची असेल तर 'गो.. करोना.. करोना.. गो' असा गंभीर मंत्रोच्चार करणारे मंत्री घरी बसून न्याहाळायचे. महाराष्ट्रात अशी आणीबाणी व संचारबंदी लादणारा 'करोना' लवकरच गाशा गुंडाळेल आणि तो गेल्याचा जल्लोष म्हणून पाडव्याला न वाजणारा ताशा पुन्हा कडाडेल, हीच अपेक्षा!