अ‍ॅपशहर

चिंतेचे ढग

मराठवाड्यासहित महाराष्ट्रावर केवळ एका वर्षाच्या दिलाशानंतर पुन्हा दुष्काळी संकट येते की काय, ही भीती दूर करणे आता केवळ निसर्गाच्याच हाती आहे.

Maharashtra Times 11 Jul 2017, 4:00 am
मराठवाड्यात पाऊस गायब झाला आहे. तब्बल तीन आठवडे पावसाने उघडीप दिल्याने चिंताजनक परिस्थिती आहे. गेला पावसाळा वगळता गेली पाच वर्षे मराठवाडा दुष्काळाच्या खाईत होता. पैठणचे जायकवाडी धरण हे मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांना जीवन देणारे आहे. या प्रकल्पात आज साडेसतरा टक्के पाणीसाठा आहे. जायकवाडीच्या वरच्या भागात पाऊस नसल्याने पाण्याची आवकही बंद झाली आहे. जायकवाडी वगळता विभागातील आठही जिल्ह्यांतील मोठे, मध्यम आणि लघुप्रकल्प कोरडे पडत आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम danger of famine looming
चिंतेचे ढग


आज मराठवाड्यातील ७६ पैकी ४७ तालुक्यांमध्ये कमी पावसाच्या नोंदी झाल्या आहेत. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात पडलेल्या पावसामुळे ६४ तालुक्यांत पावसाने सरासरी ओलांडली. पण जूनमध्ये १३ आणि जुलै महिन्यात आठ दिवस पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. यंदा पाऊस सरासरीपेक्षा चांगला होईल, असा हवामान खात्याचा अंदाज होता. मृगातली पेरणी फावते, असा समज आहे आणि तो खोटा ठरतो की काय, असे चित्र आहे. भुईवर निघालेली कोवळी पिके उन्हाच्या काहिलीने करपत आहेत. खरिपाची पिके अंकुरली आणि शिवारे नुकतीच डोलू लागली होती. वीस दिवसांत पावसाने दडी मारल्याने कोवळ्या पिकांना पावसाचा ताण वाढतो आहे. पावसाच्या ताणामुळे उत्पादनावरही विपरीत परिणाम होऊ शकतो. मूग, उडीद, सोयाबीन आणि मका या पिकांची स्थिती धोकादायक आहे.

पेरणी करताना शेतकऱ्यांनी कर्ज घेतली. आधीच त्याच्या डोक्यावर कर्जाचे डोंगर आहेत. राज्य सरकारने कर्जमाफीच्या आधी दहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील, असे सांगितले. परंतु तो लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला नाही. पावसाची अशी परिस्थिती पंधरवडाभर राहिली तर शेतकऱ्याच्या कर्जात भर पडेल. दुबार पेरणीचे संकटही कायम आहे. हलक्या जमिनीत पेरणी करून उगवून आलेली पिके पिवळी पडू लागली आहेत. तांब्या-तांब्याने पाणी घालून रोपे जगवणारा शेतकरी असे चित्र शिवारा-शिवारात दिसते आहे. मराठवाड्यात झालेला पाऊस सार्वत्रिक नव्हता. ज्या भागात पाऊस पडला ती पिके सोडून इतर भागात पिकांना धोका आहे. येत्या काही दिवसांत पाऊस न आल्यास लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील पिकेही संकटात सापडतील. दुपारी तापमानात वाढ होत असल्याने पिके कोमेजत आहेत. इवल्याशा पिकांना पाण्याची नितान्त गरज आहे. जायकवाडी धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचा उपयोग जायकवाडीखाली येणाऱ्या जालना, परभणी, नांदेड जिल्ह्यांना द्यायला हवा होता; परंतु पाटबंधारे विभागाने पाणी न सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला. आजही सरकारने निर्णय घेतला तर पिण्याच्या पाण्यासाठी साठा राखीव ठेवून अन्य पाणीसाठ्याचा उपयोग खरीप पिकांसाठी केला पाहिजे. दिवसेंदिवस पाण्याचा प्रश्नही गंभीर होत आहे. आता पुन्हा टँकर सुरू करण्याची नामुष्की प्रशासनावर येणार, असे दिसते आहे. आता मोठा पाऊस नाही झाला तर खरीप पीक वाया जाण्याची भीती आहे. पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचे उगवून आलेले कोवळे मोड वाळून जाणार आणि दुसरीकडे पेरणी न करू शकलेले शेतकरी पेरणी कधी होणार, या कोंडीत अडकले आहेत. मराठवाड्यासहित महाराष्ट्रावर केवळ एका वर्षाच्या दिलाशानंतर पुन्हा दुष्काळी संकट येते की काय, ही भीती दूर करणे आता केवळ निसर्गाच्याच हाती आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज