अ‍ॅपशहर

अलौकिक शिक्षणाधिकारी!

राज्याचे माजी शिक्षण संचालक विद्याधर विष्णू चिपळूणकर यांच्या निधनाने, शिक्षणाबद्दल कमालीची आस्था असणारा आणि समाजाच्या सर्व घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी पावले उचलणारा द्रष्टा तज्ज्ञ काळाच्या पडद्याआड गेला. तीन दशकांपूर्वी निवृत्त होऊनही शिक्षण संचालक आणि चिपळणूकर हे समीकरण आजवर कायम आहे.

Maharashtra Times 19 Sep 2018, 4:00 am
राज्याचे माजी शिक्षण संचालक विद्याधर विष्णू चिपळूणकर यांच्या निधनाने, शिक्षणाबद्दल कमालीची आस्था असणारा आणि समाजाच्या सर्व घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी पावले उचलणारा द्रष्टा तज्ज्ञ काळाच्या पडद्याआड गेला. तीन दशकांपूर्वी निवृत्त होऊनही शिक्षण संचालक आणि चिपळणूकर हे समीकरण आजवर कायम आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम a great education officer
अलौकिक शिक्षणाधिकारी!



१९७६ ते ८६ या काळात संचालक असताना चिपळूणकर यांनी दाखविलेली दृष्टी, राबविलेले धोरण, शिक्षणाचा परीघ रुंदावण्यासाठी टाकलेली पावले, परीक्षेचे अवडंबर कमी करण्यासाठी घेतलेला निर्णय या साऱ्याच बाबी आजही दिशादर्शक आहेत. त्यांनी विद्यार्थी तर घडविलेच; पण शिक्षक व अधिकारीही घडविले. त्यांचा शिष्यपरिवार राज्यभर पसरलेला आहे. नव्वदीच्या उंबरठ्यावर असतानाही ते शिष्यांशी संपर्क साधून होते. नवे उपक्रम, नवे प्रवाह जाणून घेत होते. प्रयोगांना, उपक्रमांना त्यांची कधी 'ना' नसे. माध्यमिक शिक्षक, प्राचार्य, शिक्षणाधिकारी, संचालक अशा विविध पदांवर काम करताना ते स्वत: प्रयोग करीत. शिक्षण हे विद्यार्थिकेंद्री नव्हे, तर व्यवस्थाकेंद्री असते. पण चिपळूणकरांनी विद्यार्थिकेंद्री शिक्षणासाठी पावले टाकली. विद्यार्थ्यांबद्दल त्यांना ममत्व होते. कोणाही मुलाचे शिक्षण अडू नये याची काळजी ते घेत. स्थलांतरितांच्या मुलांना दाखला नसल्याने नव्या ठिकाणी प्रवेश मिळत नसे. हे लक्षात येताच त्यांनी दाखल्याशिवाय प्रवेश देण्याचा आदेश काढला. रात्रशाळांतील उत्तीर्णांचे प्रमाण वाढत नसल्याने त्या बंद करण्याचा विचार सुरू होता, तेव्हा त्यांनी विरोध केला. मग रात्रशाळा सुरू राहिल्या. परीक्षा व गुणांबद्दलचा मध्यमवर्गीय दृष्टिकोन बदलण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. पहिली, दुसरीच्या परीक्षा बंद केल्या. लैंगिक शिक्षण शाळांमध्ये द्यायला हवे, असे त्यांना वाटत असे. वाड्या-पाड्यावर जाऊन शिक्षणाची व्यवस्था पाहणारा चिपळूणकरांसारखा अधिकारी विरळाच. त्यांनी दाखविलेल्या दिशेने जात, गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे सार्वत्रीकरण करणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज