माणसं, जनावरं, पक्षी आणि प्राणी असे समस्त जीव दुष्काळाच्या तडाख्यात सापडले आहेत. यंदा निम्म्याहून अधिक महाराष्ट्रात दुष्काळाचा प्रकोप झाला असून, या परिस्थितीत दुष्काळग्रस्तांना तात्काळ मदतीचा दिलासा देण्याची गरज आहे. राज्य सरकारने त्यासाठी अपेक्षित पुढाकार घेतला, हे बरे झाले. दहा लाख जनावरांची सोय करणाऱ्या हजारो छावण्यांना टँकरद्वारे पाणी पुरविण्याचा तसेच, प्रथमच शेळ्या व मेंढ्यांसाठीही छावणी सुरू करण्याचा अतिशय रास्त असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. चारा छावण्यांची बिले विनाविलंब द्यावीत, तात्पुरती स्वच्छतागृहे सुरू करावी आणि ज्यांना गरज असेल त्यांना बैल कामासाठी घेऊन जाण्याची परवानगी द्यावी, असे निर्णयही घेऊन माणुसकीचा झरा अद्याप आटलेला नाही हे दाखवून दिले. शेळ्या मेंढ्यांचीही छावणीत सोय करून शासनाने मदतीच्या कक्षेत इतर उपयुक्त जनावरांनाही आणले हे योग्य झाले. छावणीच्या ठिकाणी देखभालीसाठी येणाऱ्या महिलांसाठी स्वच्छतागृहे सुरू करण्याचा आदेशदेखील नोकरशाहीच्या बदलत्या मानसिकतेचा प्रत्यय देणारा आहे. शासन नावाच्या बथ्थड व्यवस्थेत उपेक्षितांसह जनावरांबाबतही असा मानवी विचार करणारे शाबूत आहेत ही समाधानाची बाब झाली. दुष्काळग्रस्तांसाठी यापूर्वीच शासनाने अनेक निर्णय घेतले असले तरी आता पावसाळ्याच्या पूर्वसंध्येला पर्जन्यवाढीसाठी कृत्रिमरीत्या पाऊस पाडण्याचा निर्णय मात्र भल्याभल्यांना कोड्यात टाकणारा आहे. यापूर्वी असे प्रयोग सपशेल फसलेले असताना, त्यावर कोट्यवधीचा खर्च करण्यास परवानगी देणे टीका ओढवून घेणारे ठरेल. या प्रयोगाबाबत तज्ज्ञांमध्येही अद्याप एकमत नाही. तरीही सध्या हा उपाय करून पाहण्यास हरकत नसावी. अलिकडे परदेशात या प्रयोगाची अचूकता बरीच वाढल्याचे सांगितले जाते. त्यात यश मिळाल्यास ठीकच. पण मुळात दुष्काळाला तोंड देण्यासाठी शाश्वत उपायांची गरज आहे आणि त्यासाठी 'पाणी वाचवा, पाणी जिरवा' याला पर्याय नाही.
दुष्काळग्रस्तांना दिलासा
माणसं, जनावरं, पक्षी आणि प्राणी असे समस्त जीव दुष्काळाच्या तडाख्यात सापडले आहेत. यंदा निम्म्याहून अधिक महाराष्ट्रात दुष्काळाचा प्रकोप झाला असून, या परिस्थितीत दुष्काळग्रस्तांना तात्काळ मदतीचा दिलासा देण्याची गरज आहे. राज्य सरकारने त्यासाठी अपेक्षित पुढाकार घेतला, हे बरे झाले.
महाराष्ट्र टाइम्स 30 May 2019, 4:00 am