देशातल्या प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि त्याअंतर्गत आपले मत मांडण्याचा अधिकारसुद्धा आहे. मग तो सामान्य नोकरदार-कष्टकरी असो किंवा नामवंत कलावंत. फरक एवढाच असतो की जेव्हा नामांकित कलावंत बोलतो तेव्हा त्याच्या वक्तव्याचा प्रभाव व्यापक असतो. कलावंताला सगळ्याच क्षेत्रातले ज्ञान असते, अशी एक भाबडी समजूत असते. त्यातूनच अनेक घोळ होतात. मोठ्या समजल्या जाणाऱ्या माणसांचे अनेक प्रश्नांचे आकलन अनेकदा थिटे असते . हिंदी चित्रपटसृष्टीतले अभिनेते आणि भाजप खासदार परेश रावल आणि मराठीतले ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची ताजी विधाने उदाहरणादाखल घेता येतील. काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांत दगडफेकीच्या घटना वाढल्या असून तेथील शाळकरी मुलांपासून महाविद्यालयीन तरुणींपर्यंत अनेकांना चिथावणी देऊन लष्कराविरुद्ध दगडफेकीसाठी प्रवृत्त केले जात आहे. अशा वातावरणात तेथे काही आठवड्यापूर्वी लष्कराने एका तरुणाला जीपच्या बॉनेटला बांधून स्वतःचे संरक्षण करीत मार्ग काढला होता. माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी हे छायाचित्र ट्विट करून काही प्रश्न उपस्थित केले होते. सर परेश रावल (त्यांचे ट्विटर खाते याच नावाने आहे) यांनी त्या घटनेचा उल्लेख करून अरुंधती रॉय यांना अशा जीपला बांधले पाहिजे, अशा आशयाचे ट्विट नुकतेच केले आहे. ते आताच त्यांनी का केले कळत नाही. रॉय या नामवंत लेखिका असून नर्मदा आंदोलनापासून काश्मिरींच्या हक्कांपर्यंत अनेक प्रश्नांवर त्या लढत बोलत असतात. विद्यमान सरकारच्या भूमिकेवर त्या हल्ले करत असतात. त्याचा राग असा व्यक्त झाला असावा. हे एकीकडे सुरू असताना पुण्यात ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी ‘सैनिक आणि देशाच्या सुरक्षेविरोधात वक्तव्य करणाऱ्या कन्हैयाकुमारसारख्यांना फाशी दिली पाहिजे,’ असे वक्तव्य करून राष्ट्रवादाच्या धगधगत्या अग्निकुंडात उडी घेतली. विशेष म्हणजे, गोखले यांनी हे वक्तव्य केले तो समारंभ बलराज सहानी-साहिर लुधियानवी फाऊंडेशनने आयोजित केलेला आणि तिथे गोखले यांना बलराज सहानी यांच्या नावाचा पुरस्कार देण्यात आला. संस्था चालवणारांनाही आपण कोणाला पुरस्कार देतो आहोत, याचे भान उरले नसावे. आता पुण्यातील फिल्म इन्सिट्यूटच्या नव्या अध्यक्षांच्या नियुक्तीच्या हालचाली सुरू झाल्या असतील. त्यासाठी तर ही लक्षवेधी विधाने नसतील ना?
मोठ्यांचे थिटे आकलन
देशातल्या प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि त्याअंतर्गत आपले मत मांडण्याचा अधिकारसुद्धा आहे. मग तो सामान्य नोकरदार-कष्टकरी असो किंवा नामवंत कलावंत. फरक एवढाच असतो की जेव्हा नामांकित कलावंत बोलतो तेव्हा त्याच्या वक्तव्याचा प्रभाव व्यापक असतो.
Maharashtra Times 24 May 2017, 1:33 am