पंजाबमधील अमृतसरनजीक अडलीवाल गावातील निरंकारी भवनावर झालेला ग्रेनेड हल्ला चिंताजनक तर आहेच; परंतु त्याचबरोबर केंद्र आणि राज्य सरकारांना इशारा देणारा आहे. दहशतवाद्यांच्या कारवायांनी एकेकाळी होरपळलेल्या पंजाबमध्ये गेल्या तीन दशकांत तुलनेने शांतता नांदत असली, तरी खलिस्तानींचे भूत अधूनमधून डोके वर काढत असते. खलिस्तानवाद्यांना बळ देऊन त्यांच्याद्वारे पंजाबमध्ये अस्थिरता निर्माण करण्याचे डावपेच पाकिस्तान खेळत आलेला आहे. त्यासाठी पाकमधील आयएसआय ही गुप्तचर यंत्रणा, तसेच 'अल कायदा' ही दहशतवादी संघटना खलिस्तानवाद्यांना फूस देत आहे. शिवाय खलिस्तानवादी आंतरराष्ट्रीय पातळीवर सक्रिय झाले असून, विशेषत: कॅनडामधून ते कार्यरत झाले आहेत. त्यामुळेच निरंकारी भवनावरील रविवारचा हल्ला अतिशय गांभीर्याने घेण्याची गरज आहे. त्याचबरोबर संरक्षण आणि पोलिस दलांनी; तसेच गुप्तचर यंत्रणांनी अधिक दक्ष राहण्याची आवश्यकता आणि परस्परांतील सहकार्य वाढविण्याची आवश्यकताही आहे. अडीच वर्षांपूर्वी पठाणकोट येथील हवाई तळावर झालेल्या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांना अतिदक्षतेचे आदेश देण्यात आले असले, तरी मधल्या काळात दहशतवाद्यांनी दोन ठिकाणी हल्ले केले आहेत. याचाच अर्थ त्यांना मिळणाऱ्या मदतीची साखळी मजबूत होत आहे. ती तोडून दहशतवाद्यांचा शक्तिपात करण्यासाठी केंद्र आणि राज्यातील संबंधित यंत्रणांना संयुक्तपणे काम करावे लागणार आहे. कोणताही हल्ला झाला, की आपल्याकडे त्याचे राजकारण केले जाते. अमृतसर हल्ल्यानंतरही काँग्रेस, भाजप आणि आप यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. हे राजकारण टाळून पंजाबमधील आव्हानांना सामोरे जाण्याची गरज आहे.
पंजाबमधील आव्हान
पंजाबमधील आव्हानपंजाबमधील अमृतसरनजीक अडलीवाल गावातील निरंकारी भवनावर झालेला ग्रेनेड हल्ला चिंताजनक तर आहेच; परंतु त्याचबरोबर केंद्र आणि राज्य ...
Maharashtra Times 20 Nov 2018, 4:00 am