अ‍ॅपशहर

अणे यांची केकबुद्धी

केकवर सुरी ठेवून 'जय विदर्भ' म्हणण्याची घाई केल्यास विश्वासार्हता धोक्यात येईल, ही मेख बुद्धीवादी अणे यांच्या लक्षात यायला हवी होती.

Maharashtra Times 15 Apr 2016, 8:49 am
विदर्भाच्या चळवळीचे सध्याचे नायक माजी महाधिवक्ते श्रीहरी अणे यांच्या केक प्रकरणाने नवा वाद ओढवून घेतला आहे. महाराष्ट्रावर 'सुरी चालवून' आपण राज्यातील जनतेची मने दुखवित आहोत, याचे भान त्यांना राहिलेले नाही, हे नागपुरातील घटनेने सिद्ध झाले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ane
अणे यांची केकबुद्धी


"विदर्भाचा महाराष्ट्रावरील विश्वास उडाला आहे. विदर्भाच्या दृष्टीने महाराष्ट्र हे अपयशी राज्य आहे त्यामुळे गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेला हा संघर्ष विदर्भाचे वेगळे राज्य झाल्यावरच शमणार आहे," असे मत अणे यांनी त्यांच्या 'विदर्भ गाथा' पुस्तकात व्यक्त केले आहे. महाराष्ट्राला अपयशी राज्य ठरविणाऱ्या अणे यांनी वेगळ्या विदर्भाच्या चळवळीचे नेतेपद आपल्याकडे यावे यासाठी मात्र बऱ्यापैकी यशस्वी खेळी केली. नेतेपणाची अनेक वर्षांपासूनची हुरहूर त्यांच्या राजीनाम्याने संपुष्टात आणली. सध्या काही काम नसलेल्या वैदर्भीय नेत्यांना किंवा भविष्यातील छोट्यामोठ्या नेते उपनेतेपदाकडे डोळे लावून बसलेल्या कार्यकर्त्यांना अणे यांच्या राजीनाम्याने दिलासा दिला. पद गेल्यावर अणे यांना विदर्भाच्या अकराही जिल्ह्यांमधून निमंत्रणे येत आहेत. भाजप, बसपा आणि आपने विदर्भाची मागणी जाणून घेतली असली तरी विदर्भ राज्य निर्मितीबाबात या तीनही पक्षांकडे ठोस इच्छाशक्ती नाही, असा आरोप अणे यांनी आधीही केला होता. केजरीवाल यांच्या भेटीने विदर्भवाद्यांची उमेद वाढविली.

राज ठाकरे यांनी मुंबईत गुढीपाडवा सभेत विदर्भाच्या चळवळीची खिल्ली उडविल्यानंतर मा. गो. वैद्य त्यांना प्रत्युत्तर देऊन मोकळे झाले. अणे यांच्या प्रतिक्रियेची मात्र प्रतीक्षा होती. महाराष्ट्राचे तुकडे करायला तो तुमच्या वाढदिवसाचा केक आहे का, असे संतप्त वक्तव्य राज यांनी केले. परवा मध्यरात्री नागपुरात रवीभवनात कार्यकर्त्यांच्या गराड्यात अणे यांनी नेमका महाराष्ट्राच्या आकाराच्या केकमधून 'विदर्भ' कापून वेगळा केला. राज ठाकरेंशी या केकचा संबंध नाही, अशी सारवासारव त्यांनी दिली असली तरी महाराष्ट्राचे हे केकमधील चार तुकडे अनेकांना खटकले. अणे यांच्या राजीनाम्याची वेळ चुकली, असे अनेकांचे मत होते. कार्यकर्त्यांना वर्ष-दीड वर्षानंतर त्यांचा राजीनामा हवा होता. आंदोलनाचा तोल जात चालल्याची प्रतिक्रियाही आता ऐकू येत आहे. केकवर सुरी ठेवून 'जय विदर्भ' म्हणण्याची घाई केल्यास विश्वासार्हता धोक्यात येईल, ही मेख बुद्धीवादी अणे यांच्या लक्षात यायला हवी होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज