अ‍ॅपशहर

आणखी एक पक्ष

अनसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) या समाजघटकांच्या हक्कांसाठी स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्याची पन्नास उच्च शिक्षित अभियंत्यांची कृती लोकशाहीला अनुसरून आहे आणि त्यामुळेच ती स्वागतार्ह आहे.

Maharashtra Times 24 Apr 2018, 5:06 am
अनसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) या समाजघटकांच्या हक्कांसाठी स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्याची पन्नास उच्च शिक्षित अभियंत्यांची कृती लोकशाहीला अनुसरून आहे आणि त्यामुळेच ती स्वागतार्ह आहे. या पक्षासाठी पुढाकार घेतलेले सर्व पन्नास जण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे (आयआयटी) माजी विद्यार्थी असून, आपापल्या नोकऱ्यांचा त्याग करून 'बहुजन आझाद पार्टी' या राजकीय पक्षाच्या स्थापनेसाठी एकत्र आले आहेत. पुढील वर्षी लोकसभेची निवडणूक होणार असल्याने देशातील राजकीय घडामोडींना वेग येत आहे आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडत आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रस्थापित युती फुटणे, नव्या आघाड्या निर्माण होणे, या पक्षातून त्या पक्षात उडी मारणे, नव्या पक्षाची स्थापना होणे आदी प्रकार घडत असतातच. त्यामुळे या नव्या पक्षाकडेही याच दृष्टिकोनातून पाहिले जाण्याची शक्यता आहे; परंतु लोकसभेची निवडणूक लढविणार नसल्याचे, या पक्षाच्या स्थापनेसाठी पुढाकार घेतलेल्या नवीन कुमार यांनी म्हटले आहे. बिहारमध्ये २०२०मध्ये होणारी विधानसभा निवडणूक लढविण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे. मागासवर्गीयांचे हक्क आणि त्यांचे कल्याण याबाबत पक्ष कार्यरत राहणार असून, अन्य राजकीय पक्ष आणि विचारधारा यांना प्रतिस्पर्धी मानत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. गेल्या काही वर्षांत दलित, वंचित आणि उपेक्षित समाजावरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही मागासवर्गीयांना लक्ष्य करण्याचे प्रकार घडत आहेत. अॅट्रॉसिटी कायद्यावरूनही सध्या आक्रोश सुरू आहे आणि यावरून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्नही काही मंडळी करीत आहेत. या पार्श्वभूमीवर दलितांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करावा, असे वाटणे गैर नाही. मात्र, स्वत:ला दलितांचे कैवारी म्हणवून घेणारे अनेक राजकीय पक्ष सध्या अस्तित्वात आहेत. त्यामुळे या पक्षांहून आपण कसे वेगळे आहोत, हे 'बहुजन आझाद पार्टी'च्या नेत्यांना सिद्ध करावे लागेल. त्याचबरोबर समाजाच्या तळागाळात जाऊन आपली भूमिका मांडून कार्यकर्ते निर्माण करावे लागेल आणि त्यांचे जाळेही विणावे लागेल. हे आव्हान त्यांना पेलता आले तरच 'बहुजन आझाद पार्टी'ची राजकीय कारकीर्द सुरू होऊ शकेल.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम party

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज