देशातील वाढत्या झुंडशाहीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून अपर्णा सेन, आशिष नंदी, अदूर गोपाळकृष्णन, रामचंद्र गुहा यांसारख्या विविध मान्यवरांनी झुंडीतील गुंडांच्या विरोधात आवाज उठविला आहे. कथित गोरक्षणापासून 'जय श्रीराम'चा नारा देण्याची सक्ती करण्यापर्यंतच्या विविध कारणांवरून मुस्लिमांसह अन्य अल्पसंख्याकांवर आणि दलितांवर झुंडींद्वारे होणारे हल्ले चिंताजनक तर आहेतच; परंतु त्याचबरोबर देशातील सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक एकोप्याला धक्का देणाऱ्या आहेत. हे हल्ले थांबविण्यासाठी कठोर कारवाईची आवश्यकता आहे; परंतु ती होत नसल्याने झुंडींचे धारिष्ट वाढले आहे. त्यामुळेच झुंडशाही फोफावत आहे. त्याचा केवळ निषेध न करता, अशा घटनांमधील गुन्हेगारांना जामीन न देण्याची भूमिका घेऊन घ्यावी, अशी मागणी या मान्यवरांनी केली आहे. भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यापासून हिंदुत्ववादी शक्तींनी जोर पकडला आहे. गोरक्षण, 'जय श्रीराम', आंतरधर्मीय विवाहांना विरोध आदी कारणांवरून या शक्ती आक्रमक होत आहेत. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या अहवालानुसार २०१६मध्ये दलितविरोधी अत्याचाराच्या ८४०हून अधिक घटना घडल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. साहित्य, संस्कृती. कला, शिक्षण आदी क्षेत्रांतील अग्रणी मंडळी अशी ठाम भूमिका घेऊन उभे राहणे हे सुदृढ समाजासाठी आवश्यक असते. मुळात अशा प्रसंगी बुद्धिजीवी भूमिका घेत नाहीत, असा अनुभव आहे; आणि जे घेतात त्यांच्यावर शिक्के मारले जातात. झुंडशाहीच्या घटनांच्या विरोधात मध्यंतरी काही साहित्यिकांनी आणि कलाकारांनी सरकारकडून मिळालेले मान-सन्मान परत केले. त्यावेळी त्यांची भूमिका समजून न घेता सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर 'पुरस्कारवापसी गँग' अशा शेलक्या विशेषणाने टीकास्त्र सोडले. आताही अशीच टीका होत असून, काँग्रेसच्या राजवटीत ते गप्प का होते, असा उलटा प्रश्न केला जात आहे. झुंडशाही रोखण्याऐवजी केवळ राजकारण करीत राहिल्यास झुंडीतील गुंडांचे बळ वाढतच जाणार आहे. झुंडींना चेहरा नसतो आणि विवेक तर अजिबातच नसतो. कोणत्याही मुद्द्यावर प्रक्षुब्ध होऊन लक्ष्यावर त्या हल्ला करीत असतात. त्यांना पोसणाऱ्यांवरही झुंडी उलटू शकतात. त्यामुळे त्यांना रोखण्यातच शहाणपणा आहे.
झुंडींच्या विरोधातील आवाज
देशातील वाढत्या झुंडशाहीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून अपर्णा सेन, आशिष नंदी, अदूर गोपाळकृष्णन, रामचंद्र गुहा यांसारख्या विविध मान्यवरांनी झुंडीतील गुंडांच्या विरोधात आवाज उठविला आहे.
महाराष्ट्र टाइम्स 26 Jul 2019, 9:20 am