सध्या देशातील काही शहरे अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर आहेत. पोलिसांच्या गुप्त अहवालात या गोष्टी प्रकर्षाने आल्या आहेत. उपराजधानी नागपुरात रा. स्व. संघाचे मुख्यालय, दीक्षाभूमी ही संवेदनशील केंद्र आहेत. संघ मुख्यालयावर तीन अतिरेक्यांनी हल्ला केला होता. तो परतवून लावण्यात पोलिसांना यश आले, मात्र त्या घटनेने दक्षता यादीत नागपूरचा समावेश झाला. मध्यंतरी महालातील बडकस चौकात पाइप बॉम्ब आढळला होता. सिमीच्या अतिरेक्यांनी तो बॉम्ब ठेवला होता आणि त्यांना कामठीतून मदत मिळाली होती असाही संशय आहे. पुढे अब्दुल करीम टुंडा तसेच यासीन भटकळ हे दोघे दहशतवादी नागपुरात वास्तव्यास होते हे पोलिस यंत्रणेच्या तपासात स्पष्ट झाल्याने ही चिंता अधिकच गडद झाली. अतिरेक्यांनी नागपुरात आश्रय घेऊन पुढे चाल केल्याचे लक्षात आल्याने यंत्रणा चौकस झाली आहे. संघ मुख्यालयाची सुरक्षाही वाढविण्यात आली आहे. असे असतानाही नुकतेच एका युवकाने रॉकेलची बाटली घेऊन मुख्यालयात शिरण्याचा प्रयत्न केला. इतरत्र दाद न मिळाल्यास संघ मुख्यालय गाठून ‘फिर्याद’ करण्याची परंपरा संघ परिवारात आहे. मोठे राजकीय नेतेही अध्येमध्ये सौजन्यभेटीच्या नावाखाली मुख्यालयाच्या वाऱ्या करीत असतात. रॉकेलची बाटली घेऊन मुख्यालयात घुसखोरीचा प्रयत्न करणारा स्वयंसेवकच निघाल्याने पोलिस यंत्रणेने निश्वास टाकला. बी. टेक. होऊनही बेरोजगार असल्याने या युवकाने उत्तर प्रदेशात दाद मागण्याचा प्रयास केला. तिथे हताश झाल्याने तो थेट मुख्यालयावर धडकला. त्रिस्तरीय सुरक्षा यंत्रणेमुळे तो आत जाऊ शकला नाही. युवकाने रॉकेल कशासाठी सोबत नेले होते याचा शोध अद्यापही लागलेला नाही. तोंडी ताकीद देऊन त्याला सोडून देण्यात आले. मागे मुख्यालयाला खेटून असलेल्या मंदिरात चोरी झाली होती. संभाव्य धोका लक्षात घेऊन सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आणायला हवा. संशयित व्यक्तींनी केलेली नागपुरातील पोद्दारेश्वर राममंदिराची टेहाळणी पोलिसांच्या लक्षात आली होती. महाल परिसरातील एका घरात राहून संघ मुख्यालयावर नजर ठेवणाऱ्या संशयित अतिरेक्याची हालचालही पोलिसांनी टिपली होती. एक लाखात चार बॉम्ब देईन अशी दर्पोक्ती करणारा युवक मोमीनपुऱ्यात राहून गेला होता. या घटनांच्या पार्श्वभूमीवर एखादा युवक संघ मुख्यालयात शिरण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याची पुरेशी गंभीर दखल घ्यायला हवी. आत्मदहनासाठी तो आला असल्याचाही पोलिसांना संशय होता. राज्यातील महत्त्वाच्या स्थानांभोवतीची सुरक्षा वाढवावी. सर्वच शहरांमधील नागरिकांनी सजग व्हायला हवे.
गरज सजगतेची...
सध्या देशातील काही शहरे अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर आहेत. पोलिसांच्या गुप्त अहवालात या गोष्टी प्रकर्षाने आल्या आहेत. उपराजधानी नागपुरात रा. स्व. संघाचे मुख्यालय, दीक्षाभूमी ही संवेदनशील केंद्र आहेत.
Maharashtra Times 6 Sep 2017, 3:29 am