अ‍ॅपशहर

आता नवी परीक्षा

करोनावर लस आल्याने आरोग्य यंत्रणेसह सरकारी पातळीवरही सुटकेचा नि:श्वास टाकला जात असतानाच, 'बर्ड फ्लू'चे संकट एखाद्या वादळाप्रमाणे घोंघावत आल्याने प्रशासनाची पाचावर धारण बसली आहे.

महाराष्ट्र टाइम्स 6 Jan 2021, 7:52 am
करोनावर लस आल्याने आरोग्य यंत्रणेसह सरकारी पातळीवरही सुटकेचा नि:श्वास टाकला जात असतानाच, 'बर्ड फ्लू'चे संकट एखाद्या वादळाप्रमाणे घोंघावत आल्याने प्रशासनाची पाचावर धारण बसली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, झारखंड व केरळ या राज्यांमध्ये अवघ्या काही दिवसांतच या संकटाने थैमान घातले आहे. कावळे, बदके, कोंबड्या, मोर व अनेक स्थलांतरित पक्षी लक्षावधींच्या संख्येने मृत्युमुखी पडत आहेत. उत्तरेपासून ते थेट दक्षिणेपर्यंत अल्पावधीत हा विषाणू संक्रमित झाल्याने, देशभरात 'हाय अलर्ट' जारी करावा लागला आहे. संक्रमण झालेल्या भागात पक्ष्यांना मारण्याबरोबरच कोंबड्या, अंडी विक्रीवरही तातडीने बंदी घालण्यात आली आहे. मृत पक्षांमधील विषा‌णू, जीवाणू व सूक्ष्मजंतूंची तपासणी केली जात असताना, मृत कावळ्यांमध्ये 'एच ५ एन १' हा विषाणू आढळून आल्याने, धोक्याची घंटी वाजली आहे. या विषाणूच्या संपर्कात आल्यास पक्ष्यांचा अचानक मृत्यू तर होतोच; शिवाय हा आजार मनुष्यासाठीही धोकादायक या प्रकारात मोडतो. कोंबड्यांच्या माध्यमातून माणसात हा आजार पसरण्याची मोठी शक्यता असते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Bird Flu


'बर्ड फ्लू'चे बरेच प्रकार असले, तरी 'एच ५ एन १' हा मानवाला संक्रमित करणारा पहिला 'एव्हीयन इन्फ्लूएन्झा व्हायरस' आहे. या विषाणूचा पहिला संसर्गही १९९७मध्ये हाँगकाँगमध्ये, अर्थातच चीनमध्येच झाला. संक्रमित पोल्ट्री हाताळणीतून प्रादुर्भाव झाल्याची माहिती जगापुढे आली. भारतात २००६मध्ये सर्वप्रथम त्याची नोंद झाली. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे अनेक पक्षी अचानक गतप्राण झाल्यानंतर, 'बर्ड फ्लू'चा उलगडा झाला; त्यामुळे राज्यभरात कोंबड्यांवर गंडांतर आले. अडीच लाख कोंबड्या मारून टाकाव्या लागल्या, तर लक्षावधी अंडी नष्ट करावी लागली होती. पोल्ट्री व्यवसाय तेव्हा बरबाद झाला होता. आता पुन्हा एकदा तोच धोका काही राज्यांमध्ये चालून येत आहे. महाराष्ट्रात अद्याप एकही संक्रमित पक्षी आढळला नसला, तरी या काळात मोठ्या प्रमाणावर स्थलांतरीत पक्षी वि‌विध पाणथळ जागी येत असल्याने, अशा ठिकाणी बारीक लक्ष ठेवणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे ठरले आहे. करोनाला मोठ्या धैर्याने तोंड देऊन नागरिक नुकतेच कुठे मुक्तपणे विहार करायला सरावले असतानाच, या विषाणूने सगळ्यांच्या तोंडचे पाणी पळविले आहे. 'घरचं झालं थोडं अन् व्याह्यानं धाडलं घोडं' अशी ही अवस्था मानवी जिद्द आणि संयमाची परीक्षा तरी किती पाहणार?

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज