कसत असूनही जमीन नावावर नसलेले, शेतीत राब राब राबूनही दोन वेळ पोटभर खायला मिळत नसलेले, डोक्यावर सतत कर्जाचे ओझे वाहणारे शेतकरी सुमारे दोनशे किलोमीटर पायपीट करून मुंबईत दाखल झाले, तेव्हा त्यांच्या हृदयद्रावक सत्यकथांनी अनेकांना पाझर फुटला. त्यांचा एल्गार पाहून सत्ताधारीही झुकले; परंतु सत्ताधारी पक्षाच्या खासदार पूनम महाजन यांना मात्र शेतकऱ्यांच्या वेदना न दिसता 'शहरी माओवादी' दिसले. शेतकऱ्यांच्या या आंदोलनातून शहरी माओवाद डोकावत असल्याची शंका व्यक्त करून महाजन यांनी संवेदनशून्यतेचा कळस तर गाठलाच; परंतु त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठही चोळले. आंदोलक शेतकऱ्यांच्या हातात लाल झेंडे आहेत म्हणून माओवाद्यांची फूस आहे, असा अर्थ काढणे पूर्णपणे चुकीचे आहे. नाशिकहून मुंबईच्या दिशेने सहा दिवस पायपीट करणाऱ्या हजारो शेतकरी बाया-बापड्यांचे पाय सुजले, कित्येकांचे पाय रक्ताळले, डोळे पाणावले; तरीही आपल्या न्याय्य मागण्यांसाठी ते जिद्दीने कूच करीत राहिले. अशा वेळी एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचे प्रश्न समजून घेण्याची, त्यांना शक्यतोपरी मदत करण्याची आणि त्यांचे मागणे मान्य होण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची गरज असताना पूनम महाजन यांनी मात्र त्यांच्या 'लाँग मार्च'वरच संशय घेतला. माओवाद्यांना सहानुभूती असलेली मंडळ शहरात आहेत, अशी सार्वत्रिक टिपणी करीत त्यांनी कसलाही पुरावा न देता शेतकऱ्यांच्या मोर्चावर दोषारोप केला. त्यांचे हे वक्तव्य बेजबाबदार तर आहेच; परंतु त्याचबरोबर जमिनीवरच्या वास्तवाबद्दल त्यांची अनभिज्ञता दाखवणारे आहे. माओवाद्यांकडून होणाऱ्या हिंसाचाराचा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि तो सोडविण्याची गरज आहे; मात्र त्याची शेतकऱ्यांच्या मोर्चाशी सांगड घालणे शेतकऱ्यांवर अन्याय करणारे आहे. कसत असलेली वनजमीन आपल्या नावावर व्हावी, कर्जमाफीची व्याप्ती वाढवावी, नद्यांचे पाणी अडवावे, जीर्ण रेशनकार्डे बदलावीत यांपैकी कोणत्या मागण्यांतून किंवा परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची अडचण होऊ नये म्हणून दिवसभर पायपीट करूनही रात्रीच पुन्हा २५ किलोमीटर चालून आझाद मैदानात आलेल्या शेतकऱ्यांच्या कोणत्या कृतीतून महाजन यांना माओवाद दिसला, हे त्यांनी सांगावे; अन्यथा झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करून आपला चष्मा बदलावा.
संवेदनशून्यतेचा कळस
कसत असूनही जमीन नावावर नसलेले, शेतीत राब राब राबूनही दोन वेळ पोटभर खायला मिळत नसलेले, डोक्यावर सतत कर्जाचे ओझे वाहणारे शेतकरी सुमारे दोनशे किलोमीटर पायपीट करून मुंबईत दाखल झाले, तेव्हा त्यांच्या हृदयद्रावक सत्यकथांनी अनेकांना पाझर फुटला. त्यांचा एल्गार पाहून सत्ताधारीही झुकले; परंतु सत्ताधारी पक्षाच्या खासदार पूनम महाजन यांना मात्र शेतकऱ्यांच्या वेदना न दिसता 'शहरी माओवादी' दिसले.
Maharashtra Times 14 Mar 2018, 3:00 am