अ‍ॅपशहर

अभद्र युती

बिल्डरला विरोध करणाऱ्या चाळकऱ्याचा मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना मुंबई महानगर क्षेत्रातील स्थित्यंतराच्या संघर्षातील रक्तरंजित आठवणींचे दुःखद स्मरण देणारी आहे. बिल्डर आणि चाळकरी हा संघर्ष वर्षानुवर्षे सुरू असून अनेक कथा-कादंबऱ्यांना आणि चित्रपटांना त्याने विषय पुरवले आहेत. विषय आर्थिक स्वरुपाचा आहे आणि त्यासंदर्भातील आकडे सामान्य माणसांचे डोळे विस्फारणारे असतात.

Maharashtra Times 17 Jul 2017, 12:59 am
बिल्डरला विरोध करणाऱ्या चाळकऱ्याचा मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना मुंबई महानगर क्षेत्रातील स्थित्यंतराच्या संघर्षातील रक्तरंजित आठवणींचे दुःखद स्मरण देणारी आहे. बिल्डर आणि चाळकरी हा संघर्ष वर्षानुवर्षे सुरू असून अनेक कथा-कादंबऱ्यांना आणि चित्रपटांना त्याने विषय पुरवले आहेत. विषय आर्थिक स्वरुपाचा आहे आणि त्यासंदर्भातील आकडे सामान्य माणसांचे डोळे विस्फारणारे असतात. चार दिवसांपूर्वी एका सामाजिक कार्यकर्त्याने लाचेच्या रकमेची बंडले सगळ्या टीव्ही चॅनलवर फिरवली, ते फक्त हिमनगाचे टोक होते. वास्तव कितीतरी भीषण आणि क्रूर म्हणता येईल असे आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम chawl resident killed for opposing builder
अभद्र युती


डोंबिवलीतील घटनेला अनेक पैलू आहेत. बिल्डर आणि चाळकरी संघर्ष किंवा बिल्डरकडून होणारी गुंडगिरी हे पारंपरिक पैलू आहेतच. बिल्डरच्या बाजूने असलेले राजकीय पाठबळही आहे. पोलिसांची निष्क्रियता किंवा पक्षपातीपणाही या निमित्ताने चव्हाट्यावर आला आहे. एरव्ही हा विषय एवढा चर्चेत आला नसता. परंतु सोशल मीडियामुळे त्याचे गांभीर्य झिरपण्यास मदत झाली. विशाल तावरे या तरुणाचा मारहाणीत मृत्यू झाला असून त्याप्रकरणी पोलिसांनी सहा संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. स्थानिक नगरसेविकेच्या पतीवरही आरोप होत असले तरी त्याचा संबंध मारहाणीशी नाही तर चाळीचे पाणी तोडण्याच्या प्रकाराशी असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. बिल्डर आणि त्याच्या गुंडांकडून झालेली मारहाण आणि त्यात झालेला चाळकऱ्याचा मृत्यू या घटनेची फारशी चर्चा झाली नसती. परंतु मृत विशाल तावरे यांचा चुलतभाऊ संजय तावरे यांनी पोलिसांच्या कारभाराचा पंचनामा करणारा व्हिडिओ ‘फेसबुक’वर टाकला आणि या विषयाचे आणि हत्येचे गांभीर्य अनेकांच्या लक्षात आले. विशालचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे नातेवाईक मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले. पण तेथे त्यांना हद्दीचे तद्दन बोगस कारण सांगून टोलवण्यात आले आणि रामनगर पोलिस ठाण्यात जाण्यास सांगण्यात आले. संजय तावरे यांच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी केवळ टोलवाटोलवीच केली नाही, तर आरोपींना पळून जाण्याच्याही सूचना दिल्या. फिर्यादीऐवजी थेट आरोपींनाच मदत करण्याचे किंवा हद्दीच्या कारणावरून आपली कायदेपालनाची जबाबदारी टाळण्याचे पोलिसांचे असे वर्तन वारंवार दिसून येते. पोलिस आणि धनदांडग्यांची ही अभद्र युती तोडण्याची हिंमत गृहखाते सांभाळणारे मुख्यमंत्री दाखवतात का, यावर कायद्याच्या राज्याची इभ्रत अवलंबून आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज