अ‍ॅपशहर

बुरखा फाटला!

दिल्ली विद्यापीठातील प्रा. जी. एन. साईबाबा यांना झालेल्या जन्मठेपेच्या शिक्षेमुळे उच्चभ्रू वर्तुळातील नक्षलसमर्थकांचा चेहरा जगासमोर आला आहे. गडचिरोलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी प्रा. साईबाबा यांच्यासह पाच जणांना जन्मठेप आणि एकाला दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

Maharashtra Times 9 Mar 2017, 12:00 am
दिल्ली विद्यापीठातील प्रा. जी. एन. साईबाबा यांना झालेल्या जन्मठेपेच्या शिक्षेमुळे उच्चभ्रू वर्तुळातील नक्षलसमर्थकांचा चेहरा जगासमोर आला आहे. गडचिरोलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी प्रा. साईबाबा यांच्यासह पाच जणांना जन्मठेप आणि एकाला दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. या शिक्षेला वरच्या न्यायालयात आव्हान देण्यात येणार असल्याचे संबंधितांनी म्हटले आहे. त्यामुळे न्यायदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, असे म्हणता येत नाही. परंतु जिल्हा न्यायालयात आरोप सिद्ध होण्याची घटना खूप महत्त्वाची आहे. कारण अशा प्रकरणांमध्ये खालच्या न्यायालयातच पुराव्याअभावी निर्दोष सुटका होते आणि प्रकरण तिथेच संपून जाते. सुरुवातीला पोलिस कारवाईच्या काळात जेवढा गाजावाजा झालेला असतो, तो सगळा तकलादू असल्याचे सिद्ध होते. परंतु प्रा. साईबाबा प्रकरणामध्ये पुरावे गोळा करण्यासाठी गडचिरोलीच्या पोलिसांनी घेतलेले परिश्रम महत्त्वाचे ठरले आहेत. साईबाबांच्या अटकेची कारवाई राजधानी दिल्लीतून केली आहे आणि बहुतेक पुरावेही तेथूनच हस्तगत केले आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम delhi university professor gn saibaba sentenced to life for maoist links
बुरखा फाटला!


शिक्षणक्षेत्रात दिल्ली विद्यापीठासारख्या ठिकाणी अध्यापन करता करता हिंसाचाराचे तत्त्वज्ञान रुजवण्यासाठी होणाऱ्या प्रयत्नांचे भीषण वास्तव यानिमित्ताने पुढे आले आहे. उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात विष कालवण्याचे काम ही यातील धोकादायक बाब म्हणावी लागेल. दिल्ली विद्यापीठाचा विद्यार्थी हेम मिश्रा यालाही यात जन्मठेप झाली असून प्रशांत राही नामक एका पत्रकाराचाही त्यात समावेश आहे. गडचिरोली, छत्तीसगढच्या जंगलात राहून नक्षलवादी आपल्या कारवाया करीत असले तरी त्यांना हिंसाचाराला प्रवृत्त करणारे पांढरपेशे उच्चशिक्षित असतात, हेही यानिमित्ताने समोर आले. अशा प्रवृत्ती कायद्याच्या माध्यमातून ठेचायला हव्यात. परंतु त्याचवेळी सुक्याबरोबर ओले जळणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे. दिल्लीतील शैक्षणिक वर्तुळासह देशभरातील अनेक विद्यापीठांतून डाव्या विचारसरणीचे विद्यार्थी लोकशाही मार्गाने आंदोलन करीत आहेत. सरकारविरोधात आणि सरकारपुरस्कृत संघटनांविरोधात संघर्ष करीत आहेत. त्यांना नक्षलवादी संबोधून बदनाम करण्याची मोहीम चालवली जाते. साईबाबासारखे काही मोजके लोक अशी कृत्ये करतात तेव्हा लोकशाहीवर विश्वास ठेवून संघर्ष करणारे लोक बदनाम होतात, किंबहुना त्यांना बदनाम करण्यासाठी मोहीम चालवली जाते, हेही लक्षात घ्यावयास हवे. साईबाबा आणि त्यांच्या सहकाऱ्यांना शिक्षेपर्यंत घेऊन जाणाऱ्या गडचिरोली पोलिसांचे अभिनंदन करावयास हवे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज