अ‍ॅपशहर

वाचाळांचा शिमगा

सत्तेबरोबर शहाणपणही तितकेच महत्त्वाचे असते; पण ते प्रत्येकाकडे असतेच असे नाही. याचा एक नमुनेदार दाखला राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी परवाच लातूरला एका जाहीर समारंभात दिला. सत्तेत असल्याने वाट्टेल ते बोलायचा परवाना मिळाल्याच्या आविर्भावात सध्या अनेक सत्ताधारी आहेत. आपण काय बोलतो आहोत, याचे साधे भान वा तारतम्यही त्यांना उरलेले नाही.

Maharashtra Times 15 Mar 2017, 12:41 am
सत्तेबरोबर शहाणपणही तितकेच महत्त्वाचे असते; पण ते प्रत्येकाकडे असतेच असे नाही. याचा एक नमुनेदार दाखला राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी परवाच लातूरला एका जाहीर समारंभात दिला. सत्तेत असल्याने वाट्टेल ते बोलायचा परवाना मिळाल्याच्या आविर्भावात सध्या अनेक सत्ताधारी आहेत. आपण काय बोलतो आहोत, याचे साधे भान वा तारतम्यही त्यांना उरलेले नाही.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम dilip kambles tongue slipped
वाचाळांचा शिमगा


भाजपचे एक सहयोगी आमदार प्रशांत परिचारक यांना सैनिकांच्या पत्नीबाबतचे वक्तव्य कसे अंगाशी आले, ही ताजी घटना असताना याच पक्षाचे आणखी एक मंत्री बरळले. एरवी जत्रेत फिरताना बोलावे तसे कोणी बोलले तर त्याकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ असत नाही. जत्रेत अशा पिपाण्या वाजतच असतात; पण इथे खुद्द सामाजिक न्यायमंत्रीच बेताल बोलू लागले तर कोणाला विचारायचे? लातूरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या इमारतीच्या उद्‍घाटन समारंभात मंत्री दिलीप कांबळे यांनी सरकारचे समर्थन करायच्या नादात ‘घाबरायला मी काय ब्राह्मण आहे का?... मी दलित आहे... एकेकाचे थोबाड रंगवले असते,' अशी मुक्ताफळे उधळली आणि राज्याच्या राजकारणात ‘सोशल इंजिनीअरिंग’चा प्रयोग राबवायला निघालेले मुख्यमंत्री फडणवीस यांना घरचा आहेर दिला.

सामाजिक न्याय विभागातील दलालांनी दलाली बंद झाल्याने उच्छाद मांडला आहे. या कारणावरून काही मंडळींनी कार्यक्रमातच विरोधी घोषणाबाजी केली, असे कांबळे यांचे म्हणणे आहे. यातून आधीच मंत्री बिथरले होते. मग ते बोलूनच गेले. देशपातळीवर पक्षात असे वाचाळवीर अनेकदा विनोद करीत असतात. त्यांची यादी भलीमोठी आहे. राज्यापुरता विचार करायचा तर गिरीश बापट, एकनाथ खडसे, प्रशांत परिचारक, शिवसेना आमदार सावंत, अजित पवार.. आदींच्या पंगतीत दिलीप कांबळे जाऊन बसले. एक मंत्री सर्व संकेत बाजूला ठेवत अशी जातीय भाषा करतो, हे अतिशय गंभीर आहे. ते म्हणतात तशी खरेच दलाली बंद झाली आहे का, हा तर निराळाच व अधिक गंभीर सवाल आहे. सामाजिक न्याय खात्यातील दलाली बंद झालेली नाही. फक्त दलाल बदलले, असे म्हणतात. त्यांचा शोध कांबळे घेणार का, हा खरा प्रश्न आहे. नेहमीप्रमाणे माफी मागत त्यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांनी आता पक्षाचे मंत्री आणि आमदारांसाठी ‘सभेत कसे बोलावे’ या विषयावर प्रबोधनवर्ग घेतलेला बरा. सुदैवाने, भाजपकडे त्यासाठी उत्तम प्रशिक्षणसंस्थाही आहेत!

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज