अ‍ॅपशहर

सत्यपालांचा सत्यापलाप!

चार्ल्स डार्विनचा उत्क्रांतिवादाचा सिद्धान्त चूक असून, मानव माकडापासून उत्क्रांत झालेला नाही, हे केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांनी केलेले विधान पूर्णपणे अशास्त्रीय आहे. डार्विनचा सिद्धान्त शास्त्रज्ञांनी ३०-३५ वर्षांपूर्वीच फेटाळल्याचे त्यांचे विधान तर सत्याचा विपर्यास करणारे आहे.

Maharashtra Times 24 Jan 2018, 3:00 am
चार्ल्स डार्विनचा उत्क्रांतिवादाचा सिद्धान्त चूक असून, मानव माकडापासून उत्क्रांत झालेला नाही, हे केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांनी केलेले विधान पूर्णपणे अशास्त्रीय आहे. डार्विनचा सिद्धान्त शास्त्रज्ञांनी ३०-३५ वर्षांपूर्वीच फेटाळल्याचे त्यांचे विधान तर सत्याचा विपर्यास करणारे आहे. गेल्या आठवड्यात औरंगाबाद येथे त्यांनी डार्विनवादावर भाष्य केल्यानंतर विज्ञान जगतातून टीकेचा सूर उमटला. देशभरातील शास्त्रज्ञांनी त्यांचे म्हणणे खोडून काढले. मात्र, यानंतरही डॉ. सत्यपाल सिंह गप्प बसले नाहीत. आपल्या म्हणण्यावर ते ठाम असून, हा विषय शाळेत शिकविला जाऊ नये, या भूमिकेचा त्यांनी सोमवारी पुनरुच्चार केला आणि डार्विनच्या सिद्धान्तावर व्यापक चर्चा घडवून आणण्यासाठी मोठी परिषद घेण्याचा विचारही त्यांनी बोलून दाखविला. अशा परिषदेद्वारे डार्विनवादावर चर्चा होण्यास काहीच हरकत नाही; परंतु मंत्र्यांच्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ परिषदेचा खटाटोप असेल, तर त्यातून फार काही साध्य होणार नाही. डार्विनच्या सिद्धान्तावर मतमतांतरे जरूर असू शकतात. किंबहुना, गेल्या दीडशेहून अधिक वर्षांपासून ती व्यक्त होत आलीच आहेत. विज्ञानातील सिद्धान्त ही निरीक्षणे आणि प्रयोग यांच्या साह्याने मांडली जातात आणि त्यांचा वैश्विक स्तरावर त्यांचा पडताळा घेता येतो. काळानुरूप आकलन बदलल्यानंतर विज्ञानातील अनेक सिद्धान्त वा नियम रद्दबातल झाले आहेत. त्यामुळे डार्विनचे प्रमेय खोटे ठरवायचे असेल, तर ते विज्ञानाच्या कसोट्यांवरच होऊ शकते. डार्विनने १८५९मध्ये उत्क्रांतिवाद मांडला. तेव्हापासून आतापर्यंत त्याची थिअरी खोडून काढण्याचे अनेक प्रयत्न झाले; परंतु ते विज्ञानाच्या कसोट्यांवर फारसे टिकले नाहीत. किंबहुना, विज्ञानातील नवनवीन शोध डार्विनवादालाच पुष्टी देणारे ठरले आहेत. त्यामुळे डॉ. सिंह यांच्या विधानात वैज्ञानिक तथ्य नाही. ईश्वराने जीवसृष्टी निर्माण केली, अशी समजूत बहुतेक धर्मांनी घालून दिल्याने धार्मिक मंडळी डार्विनचा उत्क्रांतिवाद नाकारत आले आहेत. डॉ. सत्यपाल सिंह त्यांपैकीच एक ठरत आहेत. देशाच्या शिक्षण विभागाचे कामकाज डॉ. सत्यपाल सिंह पाहतात. ते स्वत: उच्चशिक्षित आहेत. त्यांच्यासारख्या व्यक्तीने असे विधान करणे बेजबाबदारपणाचे आहे. अशा अवैज्ञानिक विधानांमुळे देशात विज्ञानवाद रुजण्यातील अडचणी वाढतच जाणार, यात शंका नाही.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम dr satyapal singh speech issue
सत्यपालांचा सत्यापलाप!

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज