संसद भवनाच्या पायऱ्यांना नमस्कार करून सुरू झालेली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसदीय यात्रा निवडणुकीपर्यंत येऊन ठेपली. या यात्रेत अनेक वळणे आली. गंगा महाआरती झाली. देशविदेशातील दौऱ्यात ढोल वाजवून झाले. परवाचे गंगास्नान आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांची पाद्यपूजा हा त्यातीलच एक टप्पा. या राजकीय यात्रेने मोदींना पुरते कणखर तसेच एककल्ली बनविल्याची चर्चा जोरात आहे. हा अट्टाहास अनेक वर्षांच्या आत्यंतिक विरोधातून दृढ झाला असल्याचे काहींना वाटते. कोणत्याही कारणांमधून चर्चेत राहण्याचा मोदींचा देहस्वभाव गुजरातचे राजकारण जवळून अनुभवणाऱ्यांच्या परिचयाचा होता. राष्ट्रीय पातळीवरील मतभिन्नता त्यातूनच वाढत गेली. मोदींच्या आत्मकेंद्रित स्वभावाची चर्चा आता त्यांच्याच पक्षातील धुरीण खासगी बैठकींतून करू लागले आहेत. काहींचा पक्षासोबतचा दुरावा त्यातूनच उद्भवला. असे असले, तरी मोदींच्या राजकीय परिश्रमांनी विरोधकांनाही थक्क केले, हे सत्य नाकारता येणार नाही. मोदींची वलयाविषयीची असोशी नवी नाही. पुलवामा हल्ल्यानंतरही जाहिरात चित्रिकरणात मश्गूल राहण्याच्या त्यांच्या वृत्तीवर त्यातूनच टीका झाली. समर्थकांना ती रुचणार नव्हतीच. तत्कालीन अमेरिकन अध्यक्षांच्या एकेरी उल्लेखाची तळी उचलून धरणारे कट्टर समर्थकही मोदींना लाभले आहेत. नोटाबंदीनंतर वृद्ध मातेला एटीएमच्या रांगेत उभे करण्याची त्यांची कृतीही गाजली. चर्चेत राहण्याचा 'योग' त्यांना साधला आहे. कुंभमेळा परिसर स्वच्छ करणाऱ्या कर्मचाऱ्यांची त्यांनी प्रयागराजध्ये केलेली पाद्यपूजा अपेक्षेप्रमाणे हिट झाली. राजकारणातील अशा युक्त्या-प्रयुक्त्यांवर आरोप-प्रत्यारोप चालणारच. त्याचा यत्किंचितही परिणाम न होऊ देता नव्या युक्त्यांच्या अथक शोधात राहणे हे मोदींचे वैशिष्ट्य आहे. अशा कृतींना कालांतराने सवंगपणा चिकटतो. राजकारणात अशा चर्चांचीच चलती असते. विरोधकांच्या तुलनेत मोदींचे विमान तेज आहे. आता तर साक्षात राजकीय महाकुंभ अवतरेल. विरोधकांना काठावर राहून 'जुमल्यां'ची लढत जिंकता येणार नाही. मोदींच्या डुबकीचा तोच जाहीर संदेश आहे.
पाद्यपुजेचा संदेश
संसद भवनाच्या पायऱ्यांना नमस्कार करून सुरू झालेली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसदीय यात्रा निवडणुकीपर्यंत येऊन ठेपली. या यात्रेत अनेक वळणे आली. गंगा महाआरती झाली. देशविदेशातील दौऱ्यात ढोल वाजवून झाले. परवाचे गंगास्नान आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांची पाद्यपूजा हा त्यातीलच एक टप्पा. या राजकीय यात्रेने मोदींना पुरते कणखर तसेच एककल्ली बनविल्याची चर्चा जोरात आहे.
महाराष्ट्र टाइम्स 26 Feb 2019, 4:00 am