'याचक नव्हे तर दाता' अशी भारताची प्रतिमा अलीकडे निर्माण झाली आहे काय? केरळसाठी संयुक्त अरब अमिरातीच्या मदतीवरून हा प्रश्न पेटला आहे. अमिरातीत काम करणाऱ्या ३० लाख भारतीयांमध्ये अंदाजे ८० टक्के केरळी आहेत. हे लक्षात घेतले तर अमिरातीने देऊ केलेल्या ७०० कोटींच्या आकड्यामागील भावनिक गुंतवणूक लक्षात येते. अर्थात, अशी कुठलीही अधिकृत मदत आम्ही जाहीर केलेली नाही, हा झाला अमिरातीचा ताजा खुलासा. मात्र, त्यामुळे मदत नाकारण्याच्या वादाचे कवित्व संपलेले नाही. केंद्र सरकारला केरळातील सत्तारुढ डाव्यांसह काँग्रेस आणि अन्य विरोधकांच्या आरोपांचा सामना करावा लागतो आहे. खरेतर केरळातील प्रकोपाकडे भारतातील मोठे संकट म्हणून बघायला हवे. या नैसर्गिक आपत्तीमुळे तब्बल २२ हजार कोटींचे नुकसान झाले. चारशे जीव गेले. ४० हेलिकॉप्टर, ३१ विमाने, ५०० नौका, हजारो लष्करी जवान सध्या केरळात राबत आहेत. केरळाने केंद्राकडून २ हजार कोटींच्या मदतीची अपेक्षा केली. ६०० कोटी ही प्रारंभिक मदत असल्याचा केंद्राचा दावा आहे. भारताने हैतीसारख्या आर्थिकदृष्ट्या कमकुमवत देशांपासून नेपाळ वगैरे देशांना मदत केली आहे. संकटाच्या काळातही आत्मसन्मानाचा मुद्दा गैरलागू ठरविता येणार नाही. हा कुठल्याही एका पक्षाचा प्रश्न नाही. देशाची आत्मनिर्भरता जगात संक्रमित होण्यासाठी असे प्रसंग कारणीभूत ठरतात. त्सुनामी संकटात तेव्हाच्या सरकारने विदेशी मदत नाकारली होती. अमेरिका, जपानची मदत स्वीकारण्यास यापूर्वीही आपण नम्र नकार दिला आहे. अर्थात, अशी मदत नाकारताना तेवढीच आर्थिक मदत देशांतर्गत उभी करून दाखविण्याचे आव्हान केंद्र सरकारला पेलावे लागेल. जगापुढे आर्थिक सक्षमता दाखविण्याच्या नादात केरळी जनतेला खाईत ढकलणे योग्य नाही. अशा महत्त्वाच्या प्रसंगी सर्वपक्षीय सहमती निर्माण करण्याकडे सरकारचा कल हवा. विरोधी पक्षांसोबतचा समन्वय सध्याच्या सरकारला नको आहे. अहंकार आणि सन्मान यात गल्लत होता कामा नये. रेडक्रॉससारख्या संस्थांच्या माध्यमातून होणारी मदत जगभर स्वीकारली जाते, हेदेखील दुर्लक्षून चालणार नाही. सरतेशेवटी जलसंकटात अडकलेल्या देवभूमीला बाहेर काढणे महत्त्वाचे आहे. संकट सुटावे. सलोखाही जपला जावा.
संकटातही जपावा सलोखा!
'याचक नव्हे तर दाता' अशी भारताची प्रतिमा अलीकडे निर्माण झाली आहे काय? केरळसाठी संयुक्त अरब अमिरातीच्या मदतीवरून हा प्रश्न पेटला आहे. अमिरातीत काम करणाऱ्या ३० लाख भारतीयांमध्ये अंदाजे ८० टक्के केरळी आहेत. हे लक्षात घेतले तर अमिरातीने देऊ केलेल्या ७०० कोटींच्या आकड्यामागील भावनिक गुंतवणूक लक्षात येते. अर्थात, अशी कुठलीही अधिकृत मदत आम्ही जाहीर केलेली नाही, हा झाला अमिरातीचा ताजा खुलासा.
Maharashtra Times 27 Aug 2018, 8:40 am