अ‍ॅपशहर

जंगलांचा सांगावा

जल, जंगल, जमिनीवर हव्यासी मानवाच्या वाढत्या आक्रमणामुळे वन्यजीव आणि मानवातील संघर्ष आता टोकाच्या पातळीवर पोहोचला आहे. वन्य प्राण्यांचे हल्ले होत आहेत, अनेकांचे जीव जात आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात भुदरगड तालुक्यात दोनच दिवसांपूर्वी गव्याच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला. चंद्रपूर जिल्ह्यात नागभीड तालुक्यात अस्वलांच्या हल्ल्यात पाच जणांचा बळी गेला. या दोन्ही घटनांनी मानवी अस्तित्वासाठी धोक्याची घंटाच वाजवली आहे.

Maharashtra Times 16 May 2017, 1:00 am
जल, जंगल, जमिनीवर हव्यासी मानवाच्या वाढत्या आक्रमणामुळे वन्यजीव आणि मानवातील संघर्ष आता टोकाच्या पातळीवर पोहोचला आहे. वन्य प्राण्यांचे हल्ले होत आहेत, अनेकांचे जीव जात आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात भुदरगड तालुक्यात दोनच दिवसांपूर्वी गव्याच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला. चंद्रपूर जिल्ह्यात नागभीड तालुक्यात अस्वलांच्या हल्ल्यात पाच जणांचा बळी गेला. या दोन्ही घटनांनी मानवी अस्तित्वासाठी धोक्याची घंटाच वाजवली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम encroachment of jungles is a big issue
जंगलांचा सांगावा



अर्थात ही काही पहिलीच घटना नाही. एकट्या चंद्रपूर जिल्ह्यातच गेल्या चार महिन्यांत बारा जणांना जीव गमावावा लागला. संपूर्ण राज्यात जंगलांच्या परिसरात नित्यनेमाने अशा घटना घडतच आहेत. विशेषत: सह्याद्रीच्या पट्ट्यात याचे प्रमाण अधिक. मुंबई, पणे,नाशिक परिसरातील बिबट्यांचा उपद्रव नवा नाही. सध्या उन्हाचा पारा चढाच असल्याने वनांतील पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटत आहेत. अन्न आणि चाऱ्याचा प्रश्नही गंभीर होत आहे. या शोधात प्राणी जंगलाबाहेर पडतात, माणसावर हल्ले करतात. त्यातच माणसासाठी हे दिवस लाकूडफाटा जमा करून पावसाळ्याची बेगमी करण्याचे, मध गोळा करण्याचे, तेंदूपत्ता तोडण्याचे. जंगलात जाण्याशिवाय पर्याय नाही. अनेक भागात खरिपाचे भातपीक घेण्यासाठी जमीन तयार करण्याची उन्हाळी धांदल सुरू आहे. हिरव्या चाऱ्याच्या शोधात जंगलातून बाहेर पडलेल्या गव्यांनी भुदरगडमध्ये ऊसशेतीत काम करणाऱ्या शेतकऱ्यावर हल्ला केला. त्याचे वार्तांकन करायला गेलेला स्थानिक वृत्तवाहिनीचा प्रतिनिधीही यात बळी गेला. जंगली हत्ती,गवे, बिबटे आणि अस्वलांकडून नागरी वस्तीवरील हल्ल्यांचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहेत. दुर्दैवाने घटना घडल्यानंतर वन विभागाचे काम सुरू होते. त्या घडूच नयेत यासाठीची प्रतिबंधक उपाययोजना कमी पडते, बऱ्याचदा माणसाचा अतिउत्साहही नडतो. पंचनामे आणि किरकोळ नुकसानभरपाई यापलीकडे हा विषय सरकारनेही फारसा कधी गांभीर्याने घेतलेला नाही. शिकारीवर बराचसा अंकुश बसला असला तरी ती थांबलेली नाही. यातूनच जंगलाची अन्नसाखळी तुटते.

पाऊसमान घटत चालल्याने प्राण्यांसाठीचे नैसर्गिक पाणीसाठे कोरडे होत आहेत. मानवी अतिक्रमणामुळे जंगले, वनजमीन आक्रसत आहे.वास्तविक बदलत्या काळाला अनुरूप नवे दीर्घकालीन वनधोरण राबविण्याची जशी गरज आहे, तसेच प्रस्थापित वन्यजीव रक्षणाचे कायदे आणि नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीचीही. माणसाच्या अस्तित्वासाठी जंगले आणि तेथे राहणाऱ्या प्राण्यांचेही रक्षण तितकेच महत्वाचे. ताज्या घटनांनी ही गरज अधिक ठळक केली आहे!

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज