'राजकारण गेलं चुलीत' म्हणत, राज्यातील सत्तांतराचा उसना आवेग बाजूला ठेवत राज्यातील हुशार साखर कारखानदारांनी पूर्वनियोजित वेळेनुसार कारखान्यांची धुराडी पेटवली खरी, पण साखरपट्ट्यात फारसा उत्साह नाही. निसर्गानेच शेतकरी, शेतमजूर, कारखानदार आणि सरकार सर्वांनाच मेटाकुटीस आणल्याने साखर हंगामाचे काय, कसे होणार, हा प्रश्न उभा आहे. दुष्काळ, महापूर, अवकाळी आणि परतीच्या पावसाने खरिपावर ओले संकट आणले. उभी पिके अक्षरश: धुवून नेली. उसालाही मोठा फटका बसला. दुष्काळी भागात चाऱ्यासाठी उसाची प्रचंड पण आवश्यक तोड झाल्याने राज्यात सर्व भागात उसाची भीषण टंचाई निर्माण झाली. कारखाने चालवायचे कसे? हे कठीण प्रश्नचिन्ह कारखानदारांसमोर आहे. मिळेल तो ऊस पळवापळवीचे प्रकार सुरू असून, महाकाय यंत्रे वापरून ऊस तोडण्याचे आणि वाहतुकीचे प्रयत्न युद्धपातळीवर सध्या सुरू आहेत. शेतकरी संघटनांनी परिस्थिती ओळखून थोडे सबुरीने घेतल्याने याला वेळीच गती मिळाली. कारखानदारांत गाळपाची स्पर्धा जोरात आहे. १९५ पैकी ३५ हून अधिक कारखान्यांवर ऊसटंचाईमुळे कारखाने बंद ठेवण्याची वेळ आली. बाकीचे कसेबसे सुरू झाले. कारखानदारांनी तोडणी मजुरांच्या टोळ्यांची जुळणी आधीच केल्याने रानोमाळ पोटासाठी पडलेली मजुरांची पाले, उसाने भरलेल्या, पल्ला गाठण्यासाठी धडपडणाऱ्या बैलगाड्या, त्यामागे परिस्थितीशी दोन हात करत झुंजणारी बायामाणसे, धडधडणारे ट्रॅक्टर-ट्रकच्या वाहतुकीने गजबजलेले रस्ते….. अशी सर्वत्र उडालेली ही ऊसधांदल. शेतकरी, मजूर आणि यंत्रे उभ्या उसावर तुटून पडत शिवारे उघडी करत आहेत. हंगाम कसाबसा ८०-९० दिवसच चालेल. साहजिकच साखरेचे घटते उत्पादन, मजुरांच्या हाताला निम्मेच काम या सर्वांचा शेतीच्या सर्वच घटकांवर विपरीत परिणाम होईल. यंदा एक-दोन रुपये जादा दराने साखर घेऊन गोड मानून घेण्याशिवाय ग्राहकासमोर पर्याय नाही!
अखेर पेटली धुराडी !
'राजकारण गेलं चुलीत' म्हणत, राज्यातील सत्तांतराचा उसना आवेग बाजूला ठेवत राज्यातील हुशार साखर कारखानदारांनी पूर्वनियोजित वेळेनुसार कारखान्यांची ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Nov 2019, 4:00 am