कर्तृत्वाचा घडा रिकामा झाला की लोक श्रद्धेकडे वळतात आणि तेथून ते अंधश्रद्धेच्या विळख्यात अवचित सापडतात. सामान्यजनांसाठी हा अनुभव ठीक; पण एखादी बँकच जर अंधश्रद्धेच्या कच्छपि लागली तर तिला कोणी वाचवायचे? लौकिकार्थाने बँक ही वास्तू, पण ती चालविणारी शेवटी माणसंच आणि ही माणसं कशी वर्तन करतात, यावर बरेच अवलंबून असते. नाशिक जिल्हा सहकारी बँकेला अशीच 'मानसिक' भूतबाधा झाली असून, त्यासाठी बँकेचेच स्थलांतर करण्याचा अचाट सहमतीचा निर्णय घेतला गेला आहे. कब्रस्थानाच्या जागेवर बँकेची इमारत बांधल्याने ती आर्थिकदृष्ट्या डबघाईला गेली, असा सोयीस्कर निष्कर्ष कर्तृत्वाच्या नावाने ठणाणा असलेल्यांनी काढला. त्या पुष्ट्यर्थ बँकेत वास्तुदोष असल्याचा जावईशोध लावला गेला. मांत्रिकाकडून पूजाविधी करून भुताटकी घालविण्याचा अजब प्रयत्न केला गेला. बुद्धिभ्रष्टांच्या या अंधश्रद्धांमुळे बँक उभी करून तिला शिखरावर नेणाऱ्या सहकार तज्ज्ञांना 'हेचि फल काय मम तपाला' असे वाटले असेल. तीन हजार कोटींच्या ठेवी आणि साधारण तेवढ्याच रकमेची कर्जे थकीत, वसुली पाच ते दहा टक्क्यांच्या आसपास, कर्मचाऱ्यांचा पगार करायलाही पैसे नाहीत, अशी रोखता पूर्णत: संपल्याची स्थिती आहे. बँकिंग म्हणून होणारा एकही व्यवहार सध्या होत नसल्याने एका अर्थाने ही बँक वास्तविक व्हेंटिलेटरवर आहे; पण ते मान्य करायचे सोडून भुताटकीसारख्या खुळचट कल्पनांच्या मागे धावताना या कर्तृत्वशून्य माणसांना काहीच कसे वाटत नाही, याचे कुणालाही नवल वाटेल. चार वर्षांपूर्वी प्रशासकांनी हीच सुस्थितीतील बँक लोकप्रतिनिधींच्या ताब्यात दिली असताना तिला मृत्युपंथाला लावणाऱ्यांची खरेतर गय करता कामा नये. पण नेमके तेच टाळून अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा प्रकार अनाठायी व निषेधार्हच नव्हे, तर नव्या कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हेगारी स्वरूपाचा आहे. मुख्य वास्तू बदलली तरी जिल्ह्यातील दोनशेवर शाखांच्या व्यवहारांचे काय, या प्रश्नाचे उत्तर कोण देणार? कर्जवाटपातील अनियमितता, नियमबाह्य भरती, वारेमाप व बेकायदा खरेदी या मुद्द्यांवर सगळे चिडीचूप बसतात आणि भंपक उपायांच्या नादी लागून मूळ विषय कानामागे टाकतात. समाजात चालणाऱ्या असल्या छद्मविज्ञानाच्या प्रकारांना वेळीच रोखले नाही तर एक दिवस हाहाकार माजेल.
कर्तृत्वशून्यतेची भुताटकी
कर्तृत्वाचा घडा रिकामा झाला की लोक श्रद्धेकडे वळतात आणि तेथून ते अंधश्रद्धेच्या विळख्यात अवचित सापडतात. सामान्यजनांसाठी हा अनुभव ठीक; पण एखादी बँकच जर अंधश्रद्धेच्या कच्छपि लागली तर तिला कोणी वाचवायचे? लौकिकार्थाने बँक ही वास्तू, पण ती चालविणारी शेवटी माणसंच आणि ही माणसं कशी वर्तन करतात, यावर बरेच अवलंबून असते.
MT 9 May 2019, 5:52 am