अ‍ॅपशहर

काँग्रेसच्या स्वप्नांना सुरूंग

सुभाष शिरोडकर आणि दयानंद सोपटे या काँग्रेसच्या दोन आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश करून गोव्यात सरकार स्थापन करण्याच्या काँग्रेसच्या स्वप्नांना सुरूंग लावला आहे. शिरोडकर हे ज्येष्ठ आमदार आणि माजी मंत्री आहेत. त्यामुळे गोव्यात कुणीही कधीही फुटण्याची परंपरा पुढे सुरू राहिली आहे.

Maharashtra Times 18 Oct 2018, 4:00 am
सुभाष शिरोडकर आणि दयानंद सोपटे या काँग्रेसच्या दोन आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश करून गोव्यात सरकार स्थापन करण्याच्या काँग्रेसच्या स्वप्नांना सुरूंग लावला आहे. शिरोडकर हे ज्येष्ठ आमदार आणि माजी मंत्री आहेत. त्यामुळे गोव्यात कुणीही कधीही फुटण्याची परंपरा पुढे सुरू राहिली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम goa two congress mlas subhash shirodkar dayanand sopte join bjp
काँग्रेसच्या स्वप्नांना सुरूंग


आयाराम-गयारामांची संस्कृती गोव्यासाठी नवी नाही, किंबहुना छोट्या राज्यांना हा शापच आहे. त्यामुळे सातत्याने राजकीय अस्थिरतेचे चित्र दिसते, ज्याला गोवाही अपवाद नाही. गोव्यात एखाद्या आमदाराने पक्षांतर करण्यात कुणाला आश्चर्य वाटत नाही आणि एक नेता अनेकवेळा पक्षांतर करू शकतो. विल्फ्रेड डिसूझा आणि चर्चिल आलेमाव या दोन माजी मुख्यमंत्र्यांचा तर मूळ व्यवसाय पक्षांतर आणि राजकारण दुय्यम असे वाटण्याजोगी परिस्थिती एकेकाळी होती. सुभाष शिरोडकर वगैरे त्यांच्यासमोर किरकोळ ठरतात. पक्षांतर करून थेट मुख्यमंत्री बनता येते, हे दिगंबर कामत यांनी अलीकडेच दाखवून दिले होते. राजकीय नैतिकता, पक्षनिष्ठा वगैरे गोष्टींना फारसे महत्त्व गोव्यात तरी दिले जात नसावे.

केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर मनोहर पर्रीकर संरक्षणमंत्री झाले आणि लक्ष्मीकांत पार्सेकर मुख्यमंत्री झाले. अलीकडे झालेल्या विधानसभा निवडणुकीत १७ जागा जिंकून काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरला, परंतु बहुमतापासून दूर राहिला. सत्तास्थापनेआधीच काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरू झाली. केंद्रीय निरीक्षक दिग्विजय सिंह मासे खाण्यात आणि पक्षाध्यक्ष राहुल गांधी पर्यटनात दंग असतानाच १३ जागा जिंकणाऱ्या भाजपने महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष (तीन आमदार), गोवा फॉरवर्ड (तीन आमदार) आणि इतर अपक्षांच्या मदतीने सरकार स्थापनेचा दावा केला. पर्रीकर गोव्यात परतले आणि मुख्यमंत्री झालेही. परंतु गेले नऊ महिने ते गंभीर आजारी असून गोवा-मुंबई-अमेरिका-दिल्ली-गोवा असे उपचार घेत आहेत. परंतु, त्यांनी मुख्यमंत्रिपद सोडलेले नाही. त्यांचा उत्तराधिकारी कोण, हे ठरत नसल्यामुळे पक्षही वेळकाढू धोरण अवलंबत आहे.

दरम्यान काँग्रेसने सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरू केल्यावर माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांचे भाजपमध्ये गेलेले पुत्र विश्वजित राणे यांनी काँग्रेसच्या दोन आमदारांना फोडले आहे. त्यामुळे विधानसभेतील बहुमताची गणिते पुन्हा बदलली आणि काँग्रेस सत्तास्पर्धेत मागे ढकलली गेली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज