अ‍ॅपशहर

सरकारी अनास्थेचा घाला

आपल्याकडची रस्त्यांची आणि त्या अनुषंगाने सुरक्षिततेची परिस्थिती एवढी तकलादू आहे, की सतत अपघात होत असतात आणि त्यात माणसं मरून अनेक कुटुंबे उघड्यावर येत असतात. अपघाताच्या बातम्या सरावाच्या झाल्या असल्या तरी पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावर आंबेनळी घाटातील अपघाताने चांद्यापासून बांद्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्राच्या काळजाचा ठोका चुकवला.

Maharashtra Times 31 Jul 2018, 4:16 am
आपल्याकडची रस्त्यांची आणि त्या अनुषंगाने सुरक्षिततेची परिस्थिती एवढी तकलादू आहे, की सतत अपघात होत असतात आणि त्यात माणसं मरून अनेक कुटुंबे उघड्यावर येत असतात. अपघाताच्या बातम्या सरावाच्या झाल्या असल्या तरी पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावर आंबेनळी घाटातील अपघाताने चांद्यापासून बांद्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्राच्या काळजाचा ठोका चुकवला. दोन दिवसांच्या सुटीनिमित्त दापोली येथील कृषी विद्यापीठाचे कर्मचारी महाबळेश्वर येथे सहलीसाठी निघाले होते. दोन आठवडे मोठ्या उत्साहाने आधी सहलीची तयारी केली जाते, सहलीला निघण्यापूर्वी सर्वांचे छायाचित्र काढले जाते आणि काही तासांतच तीस हसते-खेळते जीव या जगाचा निरोप घेतात. तीस कुटुंबांवर दु:खाची कुऱ्हाड कोसळते. दापोली कृषी विद्यापीठाच्या प्रशासनाच्या पाठीचा कणा मोडून पडतो. कुणाचेही काळीज पिळवटून टाकणारी ही घटना आहे. काही अपघात बेजबाबदार वाहन चालवल्यामुळे किंवा चालकांच्या उन्मादाने होत असतात. हा अपघात तसा नव्हता. नोकरदार माणसे रोजच्या व्यापातून थोडा विरंगुळा म्हणून एक-दोन दिवसांच्या सहली काढतात, तशी ही सहल होती. त्यामध्ये तीस जणांचे प्राण गेले, एकजण आश्चर्यकारकरित्या बचावले. मोठ्या अपघातांच्या निमित्ताने असेही काही आश्चर्यकारक पाहायला, ऐकायला मिळत असते. या अपघाताला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होतो आणि तो अधिक जोरकसपणे विचारला गेला पाहिजे. कारण आपल्याकडील रस्त्यांची परिस्थिती बहुतांश अपघातांना कारणीभूत असते. घाटांमधला प्रवास तर जीव मुठीत ठेवून करावा लागतो. पावसाळा आणि हिवाळ्यात या घाटांमध्ये धुक्याचे साम्राज्य असते आणि अशा परिस्थितीत पाच फुटाच्या पुढे काय आहे, हे दिसत नाही. थोडीशी ढिलाई किंवा हलगर्जी जिवावर बेतू शकते. संरक्षणासाठी कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना नाहीत आणि हे चित्र वर्षानुवर्षे कायम आहे. चालक कितीही निष्णात असला तरी अशा परिस्थितीवर नियंत्रण मिळवता येत नाही. महाराष्ट्रात असे अनेक दुर्गम घाट आहेत आणि त्या बहुतेक घाटांमध्ये अशीच परिस्थिती आहे. मोठे अपघात होतात तेव्हा काळाचा घाला वगैरे म्हणून शोक व्यक्त होतो. प्रत्यक्षात सरकारी अनास्थेचा हा घाला असतो. घाटांत उपाययोजना करण्याची आश्वासने सरकारी पातळीवरून दिली जातात. प्रत्यक्षात पुढे काही होत नाही. आंबेनळी घाटाच्या अपघातानंतरही संबंधितांना जाग येईल, अशी अपेक्षा बाळगण्याजोगी परिस्थिती नाही.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम accident

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज