अ‍ॅपशहर

दाव्यांचा गोंधळ

यशाला अनेक बाप असतात, असे म्हटले जाते ते ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाच्या निमित्ताने पुन्हा प्रकर्षाने दिसत आहे. निवडून आलेल्या यशवंतांवर ‘हा आमचाच’ असा दावा सगळ्याच प्रमुख राजकीय पक्षांनी छातीठोक चालविला आहे. त्यातून सामान्यांचा मात्र पुरता गोंधळ उडतो आहे.

Maharashtra Times 11 Oct 2017, 4:00 am
यशाला अनेक बाप असतात, असे म्हटले जाते ते ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाच्या निमित्ताने पुन्हा प्रकर्षाने दिसत आहे. निवडून आलेल्या यशवंतांवर ‘हा आमचाच’ असा दावा सगळ्याच प्रमुख राजकीय पक्षांनी छातीठोक चालविला आहे. त्यातून सामान्यांचा मात्र पुरता गोंधळ उडतो आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम gram panchayat elecitons in maharashtra
दाव्यांचा गोंधळ


समाजमाध्यमावर उमटणाऱ्या उलट्यासुलट्या प्रतिक्रियांनी या गोंधळाचे स्वरूप अधिकच विस्तारले. लोकसभेच्या निवडणुका होऊन साडेतीन वर्षे झाली. विधानसभेच्या निवडणुका होऊन आता तीन वर्षे होतील. तेव्हा लोकांनी धूमधडाक्यात सत्तापरिवर्तन केले. त्यानंतर दोन्ही सरकारांनी धाडसी निर्णय घेतले. त्याचे काहींनी समाधान मानले तर काहींनी त्रागा केला. प्रत्यक्ष लोकांचे यात काय मत आहे, हे जाणून घेण्यासाठीची ‘लिटमस टेस्ट’ म्हणून १६ जिल्ह्यांतील तीन हजार १३१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. सरपंचांची निवडणूक पहिल्यांदाच जनतेतून; तीही थेट पद्धतीने होणार असल्याने या निवडणुकीवर लक्ष केंद्रित होणे स्वाभाविकच होते. तसे ते झाले. निवडणुकीचे निकाल लागले आणि सगळ्याच पक्षांनी आमचाच विजय झाल्याचे ढोल वाजविणे सुरू केले. भाजपच्या आयटी सेलने सर्वप्रथम विजयी जागांचे आकडे घोषित करून भाजपची घोडदौड अधोरेखित केली. पाठोपाठ प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भाजपला निर्विवाद यश मिळाल्याची घोषणा केली. राज्यभर भाजपच्या यशाचा बोलबाला सुरू असताना, इतरही पक्ष गणितांच्या लढाईत उतरले. प्रत्यक्षात कुठल्याच पक्षाने अधिकृत यादी जाहीर केली नाही. ग्रामपंचायतीच्या यशाला दावे आणि प्रतिदाव्यांच्या कुंपणात बंदिस्त ठेवले. असे पहिल्यांदा झालेले नाही. याआधीही ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये विजयी उमेदवारांवर राजकीय पक्ष हक्क सांगत. कधी कधी तर एकाच गावात विजयी झालेल्या उमेदवारांवर दोन विरोधक दावा करत. मुळात ग्रामपंचायत निवडणुका पक्ष म्हणून होत नाहीत. तिथे पक्षाचे चिन्हही नसते. ती कधी कधी एकाच पक्षाच्या दोन गटांमध्ये होते. तेथील निवडणुकीचे मुद्देही खूप स्थानिक असतात. ते एकमेकांशी जोडलेले असतात. त्यामुळे तेथील राजकारणाचे पक्षीय संबंध ही बाब नेहेमी धूसर असते. तशी ती आताही आहे. यशाचे अपहरण फार काळ परवडणारे नसते. आकडेवारी, दावे, प्रतिक्रिया यांचा विचार करता भाजपचे दावे सध्यातरी बळकट दिसतात. जनमत त्यांच्या बाजूने असल्याचे दिसते. अर्थात तसे नसेल तर विरोधकांना ते सप्रमाण सिद्ध करावे लागेल. शेवटी जमाना ‘इन्स्टन्ट’चा आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज