बिहारमधील मुजफ्फरपूरसह काही जिल्ह्यांत मेंदूज्वराची (जापनीज एन्सेफलायटिस) साथ आली असून, त्यात सुमारे शंभर मुलांचा बळी गेला आहे. या विषाणूजन्य आजाराच्या बळींची संख्या याहून अधिक असणार; कारण खेड्यापाड्यांत मृत्यू पावलेल्यांची कारणासह नोंद होतेच असे नाही. बिहारच्या उत्तर भागात या आजाराने थैमान घातल्यानंतर त्वरेने उपाययोजना करण्यात तेथील नितीशकुमार सरकार कमी पडले ही वस्तुस्थिती आहे. दीडेक वर्षापूर्वी उत्तर प्रदेशमधील गोरखपूरमध्ये याच आजाराची साथ आली होती आणि त्यात सुमारे पाचशे जणांचा बळी गेला. त्यावर देशभर संतप्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर तेथील योगी आदित्यनाथ सरकारने जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफ यांच्या मदतीने लसीकरणाची व्यापक मोहीम सुरू केली. बिहारमध्येही तेच करण्याची गरज आहे. उत्तर प्रदेशचा पूर्व भाग आणि बिहारचा उत्तर भाग भौगोलिकदृष्ट्या एकच असून, तेथील उष्ण आणि दमट हवामानामुळे मेंदूज्वराच्या साथीला पोषकता निर्माण होत असावी. त्यामुळे उत्तर प्रदेशातील उपाययोजना तिथेही कामी येतील. मेंदूज्वराने मृतांची संख्या वाढू लागल्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन आणि आरोग्य राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांच्यासह मुजफ्फरपूरमध्ये जाऊन रुग्णांची पाहणी केली. परिस्थिती गंभीर असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बिहारच्या एका भागात मेंदूज्वर थैमान घालतो आहे, दुसऱ्या भागात उष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे. सतत पारा ४४ अंश सेल्सिअसच्या घरात असल्याने तेथील औरंगाबाद जिल्ह्यात उष्माघाताने तीस जणांचा बळी घेतला आहे. त्यांपैकी २७ जणांचा मृत्यू एकाच दिवशी झाला. सूर्याचा प्रकोप ही नैसर्गिक आपत्ती असली, तरी त्यामध्ये जीवितहानी होणार नाही याची काळजी जरूर घेता येते. चक्रीवादळासारख्या आपत्तीत मृत्यूचे प्रमाण कमी व्हावे यासाठी होत असलेल्या प्रयत्नांना आपल्याला आता यश येत आहे; उडिशामध्ये हे आपण एकदा नव्हे तर दोनदा दाखवून दिले. वाढत्या तापमानाकडे आपत्ती म्हणून पाहून त्याच्या निवारणासाठी प्रयत्न केल्यास उष्माघाताच्या बळींची संख्या रोखता येते. सार्वजनिक आरोग्य सेवेला प्राधान्य दिल्याखेरीज परिस्थिती सुधारणार नाही हेच बिहारमधील या दोन्ही आपत्तींतून स्पष्ट होते.
बिहारमधील आरोग्यसंकट
बिहारमधील मुजफ्फरपूरसह काही जिल्ह्यांत मेंदूज्वराची (जापनीज एन्सेफलायटिस) साथ आली असून, त्यात सुमारे शंभर मुलांचा बळी गेला आहे. या विषाणूजन्य आजाराच्या बळींची संख्या याहून अधिक असणार; कारण खेड्यापाड्यांत मृत्यू पावलेल्यांची कारणासह नोंद होतेच असे नाही.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Jun 2019, 2:00 am