साठ ते ऐंशीच्या दशकात भारतातील शहरी तसेच निमशहरी जनजीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या आणि देशातील सत्ताधाऱ्यांचे प्रतीक बनलेल्या अँबेसॅडर गाडीचे नाव आणि व्यापारचिन्ह विकले गेल्याने खऱ्या अर्थाने एका युगाचा अस्त म्हणावा लागेल. ‘अँबी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गाडीसाठी मालक कंपनी असलेल्या बिर्ला समूहाने मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले होते. कंपनीकडे निधीचा तुटवडा असल्याने गुंतवणूकदार मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते. अखेर फ्रेंच मोटार कंपनी प्युजोने या मोटारीचे नाव आणि व्यापारचिन्ह सुमारे ८० कोटी रुपयांना विकत घेतले. मूळ इंग्लंडमधील मॉरिस ऑक्सफर्ड या शतकाहून अधिक जुन्या मोटार कंपनीच्या डिझायनवर आधारित अँबेसॅडर गाडी १९५८ सालापासून रस्त्यावरून धावू लागली. २०१४ मध्ये त्याचे उत्पादन बंद होईपर्यंत बाहेरून ती फार बदलली नाही. इतक्या वर्षांत त्याच्या फक्त सहा आवृत्त्या निघाल्या. ऐंशीच्या दशकात वर्षाला २४ हजार मोटारी बनवणारी ही कंपनी बंद झाली, तेव्हा दिवसाला अवघ्या पाच गाड्या बनवत होत्या. काही वर्षांपूर्वी अल्प काळाकरिता प्युजोने भारतात प्रवेश केला होता. परंतु पुरेशा यशाअभावी त्याला माघार घ्यावी लागल्याने पुन्हा भारतात येण्याचा इरादा तेव्हा जाहीर केला होता. आता या कराराद्वारे तो पूर्ण होईल असे दिसते. कारण चेन्नईमध्ये कार उत्पादनासाठी सातशे कोटी रुपयांची प्रारंभिक गुंतवणूकही प्युजोने जाहीर केली आहे. अँबेसॅडर हे नाव आणि व्यापारचिन्ह ते नेमके कशासाठी वापरणार, अँबेसॅडर मॉडेल नव्याने बाजारपेठेत आणणार की त्यांच्या एखाद्या मॉडेलला ते अँबेसॅडर असे नाव देणार, याबाबत खुलासा होईलच. ऐंशीच्या दशकात मारुती सुझुकी मोटारीच्या आगमनाने अँबीला धक्के बसू लागले. जागतिकीकरणानंतर ग्राहकांनी इतर पर्याय स्वीकारणे पसंत केले तरी ती सरकारी गाडी म्हणून टिकली. अखेर वाजपेयी सरकारच्या काळात तिला निवृत्त करण्यात आले आणि त्याची जागा बीएमडब्ल्यू गाडीने घेतली. पंतप्रधान आणि सामान्य नागरिक या दोघांनाही वाहून नेणारी गाडी म्हणून या कारची ओळख आहे. जगातील सर्वाधिक आरामदायक टॅक्सी म्हणूनही त्याचा सन्मान झाला होता. आता ती परदेशी मालकीची झाली तरी देशातील जुन्या पिढीच्या मनातील भावुक कोपरा तिच्या आठवणीने कायम अडलेला असेल.
अँबीचा युगान्त
साठ ते ऐंशीच्या दशकात भारतातील शहरी तसेच निमशहरी जनजीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या आणि देशातील सत्ताधाऱ्यांचे प्रतीक बनलेल्या अँबेसॅडर गाडीचे नाव आणि व्यापारचिन्ह विकले गेल्याने खऱ्या अर्थाने एका युगाचा अस्त म्हणावा लागेल.
Maharashtra Times 13 Feb 2017, 12:00 am