अ‍ॅपशहर

व्यक्तिस्वातंत्र्याचा सन्मान

आपल्या घटनेने प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासनेचे स्वातंत्र्य दिले आहे. तसे अभिवचन प्रास्ताविकेत आवर्जून नमूद करण्यात आले आहे. हे स्वातंत्र्य अबाधित राहील याची काळजी सर्वांनीच घ्यायला हवी. हा देश माझा आहे असे ज्यांना वाटते, त्यांच्यावर हे स्वातंत्र्य जपण्याची मोठी जबाबदारी आहे.

Maharashtra Times 10 Jan 2018, 4:00 am
आपल्या घटनेने प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासनेचे स्वातंत्र्य दिले आहे. तसे अभिवचन प्रास्ताविकेत आवर्जून नमूद करण्यात आले आहे. हे स्वातंत्र्य अबाधित राहील याची काळजी सर्वांनीच घ्यायला हवी. हा देश माझा आहे असे ज्यांना वाटते, त्यांच्यावर हे स्वातंत्र्य जपण्याची मोठी जबाबदारी आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम honour of personal freedom
व्यक्तिस्वातंत्र्याचा सन्मान


चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत वाजविण्याच्या सक्तीला अनेकांनी आक्षेप घेतला. सर्वोच्च न्यायालयाने ही सक्ती तूर्त बाद ठरविल्याने अनेकांनी मोकळा श्वास घेतला असेल. देशाविषयीचा अभिमान कृतीतून झळकायला हवा. प्रतीके आणि प्रतिमांचा संबंध देशभक्तीशी जोडण्याचा प्रयत्न नेहमीच तंटा निर्माण करणारा ठरतो. चित्रपटगृहातील राष्ट्रगीत सक्तीच्या अनुषंगाने तसे झालेही. राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज यासारख्या प्रतीकांविषयीचा आदर अंतर्मनातून व्हायला हवा. विशिष्ट चौकटीतच आदर व्यक्त व्हावा, अशी बंधने योग्य नाहीत.

मनोरंजनासाठी चित्रपटगृहात आल्यावर राष्ट्रगीतासाठी उभी झाली नाही म्हणून एखादी व्यक्ती देशद्रोही ठरू शकत नाही. मानवंदना ही स्वाभाविक प्रक्रिया आहे. अनेक छोट्या भासणाऱ्या कृतींचे सामूहिक प्रत्यंतर नव्या पिढीत राष्ट्रनिष्ठा संक्रमित करण्यास पोषक ठरते. चित्रपटगृहातील राष्ट्रगीत प्रकरणात खरेतर नसलेले मुद्देच अधिक गाजले. कधी मुद्दाम तर कधी उगाच गाजले. उभे राहणे शक्य नसलेल्या अपंगाची व्यथा ऐकून न घेताच कोरडे ओढण्याचे प्रकार झाले.

देशातील नागरिकांच्या सामूहिक शिस्तीशी निगडीत असेलेल्या मुद्द्यांवरील माघार बरेचदा कुण्या एका कंपूला आपला विजय वाटू लागतो. उन्माद आणि आंतरिक साद यातील फरक अशावेळी समजून घ्यायला हवा. एका गटावरील राग व्यक्त करायचा म्हणून एसटीवरील दगडफेक योग्य ठरू शकत नाही. देशभक्ती सिद्ध करणाऱ्या प्रतीकांच्या चौकटी आम्हीच ठरवू हा अट्टाहासदेखील समर्थनीय असू शकत नाही. इथे राहणारे लोक म्हणजेच देश, ही संकल्पना समजून घेतली तर अवाजवी अपेक्षांना खीळ बसू शकेल.

सहा महिन्यांत राष्ट्रगीताचे नवे नियम करण्याची समंजस भूमिका केंद्राने घेतली आहे. अर्थात, देशात राहूनही सर्वच गोष्टींना विरोध करू हा हेका मात्र नेहमीच सज्ज झालेल्या आंदोलकांना त्यागावा लागेल. नवे नियम ठरविणाऱ्या बारा सदस्यांनी स्वतंत्र आणि सुसज्ज देशातील व्यक्तिस्वातंत्र्याचा सन्मान राखावा ही अपेक्षा आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज