अ‍ॅपशहर

पुरंदरचे ‘टेकऑफ’

हवाई दलाच्या मान्यतेची मोहोर उमटल्यामुळे गेली काही वर्षे प्रतीक्षेत असलेल्या पुण्याजवळील पुरंदर येथील विमानतळाच्या उभारणीला गती मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

Maharashtra Times 15 Jan 2018, 1:16 am
हवाई दलाच्या मान्यतेची मोहोर उमटल्यामुळे गेली काही वर्षे प्रतीक्षेत असलेल्या पुण्याजवळील पुरंदर येथील विमानतळाच्या उभारणीला गती मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. मुंबईपाठोपाठ राज्यात सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या पुणे, पिंपरी चिंचवड आणि परिसरासाठी स्वतंत्र आंतरराष्ट्रीय विमानतळाची गरज यापूर्वी वारंवार अधोरेखित झाली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम iaf has cleared purandar airport
पुरंदरचे ‘टेकऑफ’


सध्याचा लोहगाव विमानतळ लष्करी उद्देशासाठी वापरण्यात येत असल्याने त्याच्या विस्तारावर आणि नागरी उड्डाणांवर मर्यादा आहेत. हे लक्षात घेऊनच नव्या विमानतळाची मागणी पुढे आली; पण हे स्वप्न प्रत्यक्षात उतरण्याचा मुहूर्त वारंवार पुढे जात राहिला. कधी तांत्रिक व्यवहार्यतेची अडचण, तर कधी स्थानिकांचा भूसंपादनास विरोध, असे अनेक अडथळे या विमानतळाच्या मार्गात येत राहिले. प्रथम खेड तालुक्यातील जागा यासाठी निश्चित करण्यात आली. मात्र, स्थानिक रहिवासी आणि लोकप्रतिनिधींनीही तेथे जागा देण्यास नकार दिला; तसेच तांत्रिक बाबींचीही पूर्तता होत नसल्याने अखेर जिल्हा प्रशासनाने पर्यायी जागा शोधण्यास सुरूवात केली. अखेर पुरंदर तालुक्यातील जागा यासाठी निश्चित केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. येथील स्थानिकांचा विरोध आणि पुनर्वसनाबाबत जिल्हा प्रशासनाकडून चर्चेची प्रक्रिया सुरू झाली होती. त्यातच हवाईदलाने विमानतळाच्या प्रस्तावात काही त्रुटी समोर आणल्या होत्या. त्यानुसार काही बदल करून सुधारित प्रस्तावही सादर करण्यात आला. या प्रक्रियेत गेल्या सव्वा वर्षांपासून विमानतळाच्या उभारणीच्या आघाडीवर शांतता पसरली होती. आता हवाई दलाने या सुधारित प्रस्तावास मान्यता दिल्याचे भारतीय विमान प्राधिकरणाने जाहीर केले आहे. त्यामुळे या प्रकल्पातील मोठी अडचण दूर झाली. आता पुढील मान्यतांचे प्रशासकीय सोपस्कार आणि आर्थिक नियोजन, ही या विमानतळाच्या मार्गातील आव्हाने आहेत. त्याबरोबरच या विमानतळास जागा देण्यासंदर्भात स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांच्या सर्व शंकांचे निरसन करणे आणि त्यांना आकर्षक मोबदला देऊन भूसंपादनाची करण्याचेही आव्हान आहे. हा प्रकल्प उभा राहिल्यानंतर पुणे जिल्ह्यासह सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर हा भाग थेट जगाशी जोडला जाणार असून काही काळातच या परिसराचे चित्र आमूलाग्र बदलेल. मग विकासाचेही ‘टेक ऑफ’ होईल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज