अ‍ॅपशहर

रॉयल्टीचा सूर

आपण संगीतबद्ध केलेल्या गाण्यांच्या गायनावर रॉयल्टी मागण्याबाबत प्रख्यात संगीतकार इलयराजा यांनी गायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांना पाठवलेल्या नोटिशीमुळे कॉपीराइटचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Maharashtra Times 22 Mar 2017, 12:00 am
आपण संगीतबद्ध केलेल्या गाण्यांच्या गायनावर रॉयल्टी मागण्याबाबत प्रख्यात संगीतकार इलयराजा यांनी गायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांना पाठवलेल्या नोटिशीमुळे कॉपीराइटचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दक्षिणेकडील या दोन प्रख्यात संगीतकार आणि गायक यांच्यातील रॉयल्टीच्या वादाने सर्जनशील क्षेत्रातील बौद्धिक संपदा आणि त्यावरील अधिकार या सनातन विषयावर निर्णायक तोडगा निघतो की नाही, हे नंतर स्पष्ट होईल; परंतु बौद्धिक संपदेचे महत्त्व या वादामुळे अधोरेखित झाले आहे. रशिया, श्रीलंका, मलेशिया, सिंगापूर, दुबई आणि भारतामध्ये कार्यक्रम करून बालसुब्रह्मण्यम अमेरिकेच्या दौऱ्यावर निघाले आहेत. त्याच सुमारास त्यांना इलयराजा यांच्याकडून नोटीस मिळाली आहे. केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनीही या वादात उडी घेतली आहे. त्यानंतर मत-मतांतराचा नेहमीप्रमाणे धुरळा उडणे सुरू झाले आहे. या दोघांमध्ये काही वितुष्ट आले आहे का आदी प्रश्न विचारले जात आहेत. मात्र, या प्रश्नांपलीकडे जाऊन कॉपीराइट म्हणजे काय; गायक, संगीतकार यांना तो किती लागू होतो, यांवर चर्चा व्हायला हवी. इलयराजा आणि बालसुब्रह्मण्यम यांच्याबाबत प्रश्न थोडा वेगळा आहे. बालसुब्रह्मण्यम हेच मूळ गायक आहेत आणि ते आपलीच गाणी कार्यक्रमात सादर करतात. अशावेळी रॉयल्टीचा मुद्दा येतो का, हा प्रश्न आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ilayaraja raises copyright issues sends notice to sp
रॉयल्टीचा सूर


गाण्यावर संगीतकार आणि मूळ गायक या दोघांनाही रॉयल्टी मिळते. जाहीर कार्यक्रमांतून मिळणाऱ्या मानधनातील हिस्सा संगीतकाराला द्यायचा का, या मुद्द्यांवर कॉपीराइट तज्ज्ञांमध्ये चर्चा आहे. आपल्याकडे मुळात साहित्यिक, संगीतकार, गायक यांच्या कॉपीराइटविषयी उदासीनता आहे. संगीतकार ओ. पी. नय्यर हे कॅसेट कंपन्यांकडून रॉयल्टी मिळण्याबाबत आग्रही असत आणि आपली रोजी-रोटी रॉयल्टीवरच चालते, असे त्यांनी जाहीर सांगितलेही होते. लता मंगेशकरही रॉयल्टीबाबत आग्रही असतात, असे सांगितले जाते. साहित्यिक, गायक, संगीतकार यांचे काम बराच काळ टिकणारे, समाजात राहणारे असते. त्याखेरीज इतरही त्या कलाकृतींवर आधारित कार्यक्रम करतात. अशावेळी मूळ कलाकृतीच्या निर्मात्याला त्याची रॉयल्टी मिळायला हवी. इलयराजा आणि बालसुब्रह्मण्यम यांच्यातील तिढा सुटेलही; परंतु त्या निमित्ताने चर्चेत आलेला रॉयल्टी आणि कॉपीराइट यांवर विचार व्हावा आणि कलाकार, तसेच सादरकर्ते या दोघांनाही फायदा व्हावा.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज