अ‍ॅपशहर

उत्कृष्ट कामगिरी

एकोणीस वर्षांखालील क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेतील विजेतेपदामुळे जागतिक क्रिकेटमधील भारताचा दबदबा आणखी वाढला आहे.

महाराष्ट्र टाइम्स 6 Feb 2018, 5:51 am
एकोणीस वर्षांखालील क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेतील विजेतेपदामुळे जागतिक क्रिकेटमधील भारताचा दबदबा आणखी वाढला आहे. कुठल्याही देशाच्या वरिष्ठ क्रिकेट संघात प्रवेश करण्यासाठीचा प्रशस्त मार्ग म्हणून एकोणीस वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेकडे बघितले जाते. या स्पर्धेतील कामगिरीच्या बळावर खेळाडूची वरिष्ठ संघात वर्णी लागेलच, याची खात्री देता येत नाही. परंतु, या स्पर्धेच्या अनुभवामुळे तरुण खेळाडूंची क्रिकेटची समज वाढण्यास, ते अधिक परिपक्व होण्यास मदत होते, हे नक्की. भारताचा धडाकेबाज कर्णधार विराट कोहली याच विश्वकरंडक स्पर्धेतून गवसलेला हिरा आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम cricket


विराटपूर्वी युवराज सिंह, महंमद कैफ, रवींद्र जडेजा यांच्यासारखे दमदार खेळाडूंना युवा विश्वकरंडक स्पर्धेनंतरच वरिष्ठ संघात स्थिरावले. आता पृथ्वी शॉ, मनजोत कालरा, शुभमन गिल, कमलेश नागरकोटी यांच्या रूपाने भविष्यातील भारतीय क्रिकेटचे संभाव्य आधारस्तंभ नावारूपाला येऊ लागले आहेत. विशेषत: कर्णधार पृथ्वी शॉची फलंदाजी आणि त्याच्यातील नेतृत्वगुण यामुळे क्रिकेटमधील अनेक दिग्गज प्रभावित झाले आहेत. या विजेतेपदासाठी खेळाडूंची कामगिरी महत्त्वाची होतीच, पण या यशाचे खरे श्रेय जाते ते संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड याला. निवृत्तीनंतर भारताच्या वरिष्ठ संघाचा प्रशिक्षक बनून पैसा आणि प्रसिद्धीच्या मागे न धावता त्याने खऱ्या अर्थाने खेळाडू ‘तयार’ करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या युवा आणि ‘अ’ संघाचा प्रशिक्षक म्हणून त्याची गेल्या काही दिवसांतील कामगिरी डोळ्यांत भरण्यासारखी आहे.

गेल्या दीड वर्षापासून त्याने एकोणीस वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेवर लक्ष केंद्रित केले होते. न्यूझीलंडला जाणाऱ्या संघाच्या घोषणेपूर्वी निवडक ५० खेळाडूंना देशांतर्गत स्पर्धांमध्ये तसेच परदेशातही आळीपाळीने खेळवण्यात आले. त्यांची कामगिरी आणि विविध परिस्थितीमध्ये येणाऱ्या त्यांच्या प्रतिक्रिया पाहूनच अंतिम संघ निवडण्यात आला. या स्पर्धेपूर्वी बहुतांश खेळाडूंनी परदेश दौरा केलेला असल्यामुळे न्यूझीलंडमधील वातावरणाशी जुळवून घेण्यात त्यांना अडचणी गेल्या नाहीत. त्याचे परिणाम संघाच्या कामगिरीत दिसले. युवकांचे अभिनंदन करतानाच ‘केवळ एका विश्वविजेतेपदापर्यंतची ओळख मर्यादित राहू देऊ नका,’ हा द्रविडचा सल्ला भविष्यातील भारतीय क्रिकेटचे चित्र स्पष्ट करण्यास पुरेसा ठरावा.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज