आंतरराष्ट्रीय आर्थिक स्थैर्य साध्य करण्याच्या हेतूने गेली दोन दशके कार्यरत असलेल्या जी-२० या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या ताज्या अधिवेशनात करोनाचे थैमान आणि कोलमडलेल्या अर्थव्यवस्था हे विषय ठळकपणे आणि अपेक्षितपणे चर्चिले गेले. त्याबरोबरच, बलाढ्य देशांनी एकत्रित येऊन सहकार्याने काम करण्याच्या आवश्यकतेवर दिला गेलेला भर; करोना साथीवर मात करण्यासाठी लसीची न्याय्य पद्धतीने उपलब्धता आणि वितरण; त्याचबरोबर आर्थिक संघर्ष करणाऱ्या व्यक्ती आणि व्यवसायांना मदत देण्याचे मान्य करणे, हेही मोठे यश मिळायला पाहिजे. लस सर्वांना परवडणाऱ्या दरात आणि सार्वत्रिकपणे उपलब्ध होणे, याबाबत सर्व देशांमध्ये एकमत झाले. तथापि, त्यात साडेचार अब्ज डॉलर्सची तूट आहे. ती वर्षअखेरपर्यंत भरणेही आवश्यक आहे. करोनाच्या साथीमुळे जगातील एकमेकांच्या सहकार्यातील केवळ ढिसाळपणा नव्हे तर त्याची अजिबात नसलेली तयारीही स्पष्ट झाली. त्यामुळे, पुढच्या काळात अधिक समान जग निर्माण करण्याचेही आवाहन केले गेले. जग दोन पातळीवर व वेगवेगळ्या वेगाने पुढे जात आहे. श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत आणि गरीब अधिक गरीब. ही दरी दूर होऊन आर्थिक समानता येण्यास खूप काळ लागेल; कारण आव्हान खूप मोठे आहे. तथापि, ही चर्चा सातत्याने होत राहणेही महत्त्वाचे असते, तशी ती झाली. निदान साथीचा सामना करण्यासाठी जग एकप्रकारे एका पातळीवर आले आहे. या सगळ्या मुद्द्यांकडे एकत्रितपणे पाहता येणे शक्य झाले आहे. त्याच्या जोडीला पर्यावरणाचे महत्त्व यावरचीही चर्चा महत्त्वाचे होती आणि ती झाली. आता या युरोपियन युनियन आणि एकोणीस देशांच्या समूहाने भविष्यकाळात आर्थिक असो वा पर्यावरणीय किंवा करोनासारख्या साथीचे प्रकार, ते अधिक चांगल्या पद्धतीने समन्वय साधून कसे हाताळता येतील, याचा धडा दिला पाहिजे. करोना ही यंदाची समस्या आहे; मात्र, मुख्य उद्देश आर्थिक स्थैर्य आहे. त्यासाठी कोणत्या दिशेने जाऊ शकतो, हे दाखवून देण्याची भारतालाही मोठी संधी आहे. कारण सौदी अरेबिया या पहिल्यांदाच एका अरब देशाकडे आलेल्या या परिषदेचे यजमानपद इ. स. २०२३ मध्ये भारताकडे येणार आहे.
उचित संधी
आंतरराष्ट्रीय आर्थिक स्थैर्य साध्य करण्याच्या हेतूने गेली दोन दशके कार्यरत असलेल्या जी-२० या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या ताज्या अधिवेशनात करोनाचे थैमान आणि कोलमडलेल्या अर्थव्यवस्था हे विषय ठळकपणे आणि अपेक्षितपणे चर्चिले गेले.
महाराष्ट्र टाइम्स 24 Nov 2020, 5:40 am