गेली अनेक वर्षे वर्तमानावर आधारित वास्तववादी चित्रपट बनवणारे प्रख्यात दिग्दर्शक मधुर भांडारकर ‘इंदू सरकार’ या त्यांच्या पहिल्याच राजकीय चित्रपटाच्या निमित्ताने प्रकाशझोतात आले आहेत. एकीकडे नेहमीच चुकीच्या कारणास्तव चर्चेत असणारे कलात्मक आविष्काराशी काहीही देणेघेणे नसलेले सेन्सॉर बोर्ड आणि दुसरीकडे झुंडीची गुंडगिरी अशा कात्रीत ते अडकले आहेत. हा चित्रपट १९७५ ते १९७७ या काळातील देशात आणीबाणी असलेल्या काळाच्या पार्श्वभूमीवर बेतलेला आहे. यातील प्रमुख पात्रे ही अर्थातच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि त्यांचे पुत्र संजय गांधी यांच्यावर बेतलेली आहेत. आणीबाणीचा निर्णय घोषित झाल्यानंतर देशातल्या लोकांचे आचार-उच्चार आणि अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य धोक्यात आले होते. देशात एक अराजकसदृश्य वातावरणही निर्माण झाले. या कालखंडावर आजवर अनेक पुस्तके लिहिली गेली, अनेक चर्चा झालेल्या आहेत. या आणीबाणीबद्दल काँग्रेसी समर्थन, विरोधापासून तो देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासातला सर्वाधिक लांच्छनास्पद काळ इथपर्यंत अनेक दृष्टिकोन आहेत आणि व्यक्त झाले आहेत. प्रत्येक लेखक, कलावंताला आपले प्रतिपादन करण्याचा अधिकार असतो. मधुर भांडारकर यांनाही ते आहे. मग ते प्रतिपादन कोणाला मान्य असो वा नसो. मात्र हा अधिकार हिरावण्याचा प्रयत्न राजकीय, धार्मिक व्यक्तींच्या संदर्भात नेहमीच होताना दिसतो, हे दुर्दैव आहे. देशातील अभिव्यक्तीस्वातंत्र्य संकुचित होत असल्याबद्दल आणि झुंडशाहीने ही जागा व्यापल्याच्या निषेधार्थ सुमारे दीड दोन वर्षांपूर्वी विविध साहित्यिकांनी आपले पुरस्कार परत करून त्याबद्दल आपला निषेध नोंदवायला सुरुवात केली होती. त्यावेळी लेखकांचा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात रचलेला कट असून हे साहित्यिकच कसे देशद्रोही आहेत याबद्दलच्या दिल्ली येथील मोर्चात चित्रपट दिग्दर्शक मधुर भंडारकर अग्रस्थानी होते. आता ते दुसऱ्या वास्तव बाजूला पोचले आहेत. वास्तववादी चित्रपट करणाऱ्या आणि त्याबद्दल तीनदा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मधुर भांडारकरांना देशातील या वास्तवाचे अजिबात भान नसावे हे आश्चर्य आहे. निष्ठेच्या चढाओढीत विवेकाची होळी करून रस्त्यावर उतरलेले कोणत्याही पक्ष संघटनांचे असले तरी ते कलावंताचे शत्रूच असतात हे आता त्यांनाही कळले असेल. काँग्रेस कार्यकर्त्यांपासून धोका निर्माण झाल्याने राज्य सरकारकडून त्यांना पोलिस संरक्षण पुरवण्यात आले आहे. व्यक्तीपूजेच्या मागे अराजकच निर्माण होते आणि तेथे कलात्मक स्वातंत्र्याला कोणतेही स्थान राहात नाही, हे आपले दुर्दैव आहे.
असहिष्णुतेचा चटका
गेली अनेक वर्षे वर्तमानावर आधारित वास्तववादी चित्रपट बनवणारे प्रख्यात दिग्दर्शक मधुर भांडारकर ‘इंदू सरकार’ या त्यांच्या पहिल्याच राजकीय चित्रपटाच्या निमित्ताने प्रकाशझोतात आले आहेत.
Maharashtra Times 18 Jul 2017, 4:00 am