कमालीची असहिष्णुता आणि कमालीचा विघटनवाद देशात सुरू असल्याचे सांगतानाच सांस्कृतिक दहशतवादाची व्याप्ती सुस्पष्टपणे मांडणारे भाषण ज्या संमेलनात डॉ. प्रज्ञा दया पवार यांनी केले तेच संमेलन त्यांना अर्धवट सोडून जावे लागावे, यापेक्षा खेदजनक आणि क्लेशकारक दुसरे काय असेल? महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने सातारा जिल्ह्यातील पाटण येथे गेल्या आठवड्याच्या अखेरीला भरविलेल्या विभागीय साहित्य संमेलनातील झालेला प्रकार हा त्याच्या अध्यक्ष डॉ. प्रज्ञा दया पवार यांनी नमूद केलेला अहिष्णुता अधोरेखित करणाराच होता. त्यांनी आणि संमेलनाचे उद्घाटक प्रा. रावसाहेब कसबे यांनी देशातील सध्याच्या स्थितीवर भाष्य केले, प्रतिमांद्वारे झुंडीचे राजकारण करणाऱ्यांवर कोरडे ओढले, विरोधी विचार मांडणाऱ्यांची जी गळचेपी होतेय ते नेमक्या पद्धतीने मांडले. हे दोघेही प्रथमच अशी भूमिका मांडत नव्हते. यापूर्वीही त्यांनी अशी भाष्ये केली आहेत. तरीही त्यांच्या भाषणांवर काहींनी आक्षेप घेऊन त्यांना संमेलनातून बाहेर जाण्यास भाग पाडले. ते ज्या विचारसरणीवर आघात करीत होते, त्याच विचारांचे वाहक असलेल्यांनी आपली असहिष्णुता दाखवून दिली. भारतीय जनता पक्षाचे संपूर्ण बहुमताचे सरकार केंद्रात सत्तेवर आल्यानंतर हिंदुत्ववाद्यांचा जोर वाढला आहे. स्वयंघोषित गोरक्षक कायदा हातात घेऊन मारहाण करीत असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. दादरीपासून उनापर्यंतच्या घटना केवळ वाढती असहिष्णुता दर्शविणाऱ्या नाहीत, तर दहशत निर्माण करणाऱ्याही आहेत. त्यांचा उल्लेख करतानाच डॉ. पवार यांनी सध्या राज्यात निघत असलेल्या मराठा क्रांती मोर्चांचा उल्लेखही केला. कोपर्डी अत्याचाराचा निषेध करतानाच माणुसकीला काळिमा फासणाऱ्या अशा अन्य घटनांबाबतची भूमिका कोणती, असा सवाल त्यांनी केला. डॉ. कसबे यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक नाकारणाऱ्या मानसिकतेवर प्रहार केला. या दोघांच्या बोलण्यातील आशय समजून घेण्याची गरज असताना, प्रत्यक्षात मात्र वादग्रस्त विधान करून तेढ वाढविल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. स्थानिक राजकारणाचे हिशेबही या निमित्ताने चुकते केले जात आहेत. वास्तविक या साऱ्यांतून बाहेर पडून व्यापक असहिष्णुता आणि दहशत यांबाबत विचार करणे सुज्ञपणाचे आहे. मात्र, याचे भान हरवत चालले आहे. हे असेच होत राहिल्यास झुंडशाही अधिक प्रबळ होईल. त्यामुळे, अशा असहिष्णुतेच्या विरोधात क्षीण का होईना आवाज उठवित राहणे महत्त्वाचे आहे.
असहिष्णुता अधोरेखित
कमालीची असहिष्णुता आणि कमालीचा विघटनवाद देशात सुरू असल्याचे सांगतानाच सांस्कृतिक दहशतवादाची व्याप्ती सुस्पष्टपणे मांडणारे भाषण ज्या संमेलनात डॉ. प्रज्ञा दया पवार यांनी केले तेच संमेलन त्यांना अर्धवट सोडून जावे लागावे, यापेक्षा खेदजनक आणि क्लेशकारक दुसरे काय असेल?
Maharashtra Times 14 Oct 2016, 4:00 am