अ‍ॅपशहर

​ ‘जयप्रभा’चा वारसा जपूया...

मराठी चित्रपटसृष्टीचे माहेरघर असलेल्या कोल्हापुरात अलीकडे चित्रपटनिर्मिती थंडावली आहे. त्याची कारणे अनेक असली तरी ‘जयप्रभा’ला कुलूप, तर शालिनी स्टुडिओ जमीनदोस्त झाल्याने निर्मात्यांची पावले दुसरीकडे वळली. चित्रनगरी असली तरी तेथे अद्याप म्हणाव्या तशा सुविधा नाहीत. त्यामुळे निर्माते तेथे जायला उत्सुक नाहीत. कलानगरीत चित्रपटनिर्मितीला उतरती कळा लागली असताना अशा कठीण काळात जयप्रभा स्टुडिओबाबत गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घेतली. त्यांनी उचललेले हे पाऊल स्वागतार्ह म्हणावे लागेल.

Maharashtra Times 20 Jul 2017, 4:00 am
मराठी चित्रपटसृष्टीचे माहेरघर असलेल्या कोल्हापुरात अलीकडे चित्रपटनिर्मिती थंडावली आहे. त्याची कारणे अनेक असली तरी ‘जयप्रभा’ला कुलूप, तर शालिनी स्टुडिओ जमीनदोस्त झाल्याने निर्मात्यांची पावले दुसरीकडे वळली. चित्रनगरी असली तरी तेथे अद्याप म्हणाव्या तशा सुविधा नाहीत. त्यामुळे निर्माते तेथे जायला उत्सुक नाहीत. कलानगरीत चित्रपटनिर्मितीला उतरती कळा लागली असताना अशा कठीण काळात जयप्रभा स्टुडिओबाबत गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घेतली. त्यांनी उचललेले हे पाऊल स्वागतार्ह म्हणावे लागेल.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jayprabha studio at kolhapur
​ ‘जयप्रभा’चा वारसा जपूया...


या ऐतिहासिक स्टुडिओला मिळालेले जीवदान निश्चितच या क्षेत्राला नवी उभारी देणारे आहे. वारसा स्थळांत या स्टुडिओचा समावेश असणे आणि त्यावर न्यायालयाची मोहर उठणे ही बाबही चित्रपटसृष्टीच्या अभिमानात भर घालणारीच ठरली आहे. राज्य सरकार आणि महापालिकेच्या विकासप्रकल्पांत या स्टुडिओत पुन्हा एकदा चित्रीकरण सुरू व्हावे, यासाठीचे नियोजन आहे. चित्रपट महामंडळ, अनेक चित्रकर्मी, रंगकर्मी यासाठी सतत धडपडत आहेत. ते स्वप्न साकारण्यास मंगेशकर यांनी हातभारच लावला आहे. छत्रपती राजाराम महाराज यांनी चित्रतपस्वी भालजी पेंढारकरांना त्याकाळी साडेतेरा एकर जागा दिली होती. ही जागा केवळ चित्रपटनिर्मितीसाठीच वापरण्याची अटही तेव्हा त्यांनी घातली. त्यानुसार जयप्रभा स्टुडिओ उभारला गेला. भालजींनी आणि अनेक मराठी व हिंदी चित्रपट निर्मात्यांनी या स्टुडिओत असंख्य चित्रपट तयार केले. यातून स्टुडिओशी चित्रपटसृष्टीतील अनेकांचे भावनिक नाते निर्माण झाले. लता मंगेशकरांनी ही जागा विकायला काढली तेव्हा त्या विरोधात कोल्हापूरकर रस्त्यावर उतरले. कोल्हापूर महापालिकेच्या हेरिटेज वास्तूंच्या यादीत या स्टुडिओचाही समावेश आहे. ही जागा खासगी मालकीची आहे, त्यामुळे हेरिटेजच्या यादीत समाविष्ट करता येणार नाही, अशी याचिका मंगेशकरांनी न्यायालयात दाखल केली. साहजिकच रस्त्यावरची लढाई न्यायालयातही पोहोचली. मंगेशकरांचे बालपण कोल्हापुरात गेले. त्यांच्याविषयी कोल्हापूरकरांच्या मनात नेहमीच आपुलकीची भावना आहे. ‘जयप्रभा’च्या आंदोलनामुळे त्यांच्यावर टीका झाली खरी; पण कोल्हापूरकरांचा मान राखत अखेर त्यांनी याचिका मागे घेतली. कोल्हापूरच्याच नव्हे तर समस्त चित्रपटसृष्टीच्या ​दृष्टीने हा आनंददायी निर्णय आहे. सध्या येथील चित्रपटनिर्मिती बंद असली तरी पुन्हा नव्याने येथे ‘लाइट, कॅमेरा, अॅक्शन...’ची आरोळी सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज