माजी केंद्रीय मंत्री एस. जयपाल रेड्डी यांच्या निधनाने एक अभ्यासू नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. संसदेत एकूण सातवेळा लोकांचे प्रतिनिधित्व करणारे आणि त्याच्या आधी चारवेळा विधानसभेचे सदस्य असलेले रेड्डी हे मोठे लोकनेते नव्हते; परंतु अभ्यास, वक्तृत्व आणि प्रशासन यांच्याद्वारे त्यांनी आपले स्थान निर्माण केले. अपंगत्वाची तमा न बाळगता, त्याचे भांडवल न करता आणि कोणाचाही आधार न घेता त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले. या धडपडीचे प्रतिबिंब त्यांच्या राजकीय वाटचालीतही दिसते. त्यांनी राजकारणात उडी घेतली तेव्हा स्वातंत्र्यलढ्याचा आणि विचारांचा वारसा पुढे नेणारे अनेक दिग्गज नेते राजकीय क्षितिजावर होते. त्यांचा आणि मुख्य म्हणजे गांधीविचारांचा प्रभाव रेड्डींवर होता. वैचारिक भूमिका आणि प्रत्यक्ष राजकारण यांत मोठे अंतर असते; सत्तेत राहून वैचारिकता जपता येतेच असे नाही. मात्र, या दोहोंत समन्वय साधता येतो. रेड्डींनी तसा साधण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस, जनता पक्ष, जनता दल आणि परत काँग्रेस असा राजकीय प्रवासही त्यांनी याच समन्वयवादातून केला. धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावर ठाम राहणाऱ्या रेड्डींनी काही केंद्रीय मंत्रिपदांवर आपली मुद्रा उमटवली. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात पेट्रोलियम मंत्री म्हणून काम करताना त्यांनी रिलायन्स उद्योगाला झुकते माप देण्यास नकार दिला. पंडित नेहरूंच्या नावे असलेली नागरी पुनरुत्थान योजना (जेएनएनयूआरएम) रेड्डींनी अतिशय प्रभावी राबविली आणि मध्यम आकाराच्या शहरांत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला. जगाच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर परिणाम करणाऱ्या दहा विचारधारांवर त्यांनी केलेले चिंतन अतिशय मोलाचे आहे. अभ्यासू लोकप्रतिनिधी दुर्मीळ होत असताना रेड्डी यांचे जाणे खरेच पोकळी निर्माण करते.
अभ्यासू नेता
माजी केंद्रीय मंत्री एस. जयपाल रेड्डी यांच्या निधनाने एक अभ्यासू नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. संसदेत एकूण सातवेळा लोकांचे प्रतिनिधित्व करणारे आणि त्याच्या आधी चारवेळा विधानसभेचे सदस्य असलेले रेड्डी हे मोठे लोकनेते नव्हते.
महाराष्ट्र टाइम्स 30 Jul 2019, 9:12 am