प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या अभियांत्रिकी शाखेच्या शिक्षणाला अवकळा येत चालली आहे काय, असा प्रश्न निर्माण होण्यासारखी परिस्थिती निर्माण होत आहे. सर्वाधिक रोजगाराच्या संधी देणारी आणि व्यवसायाभिमुख शाखा म्हणून अभियांत्रिकीकडे बघितले जाते. अर्थातच त्याचा पायाही भक्कम होता. पण अलिकडे देशभरातील शिक्षणसंस्थांतून अभियांत्रिकीची पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी सुमारे साठ टक्के अभियंते बेरोजगार असल्याची माहिती उघड झाली आहे. गेल्या चार दशकांपासून देशात शिक्षणाचे वारे वेगाने वाहू लागले आणि साहजिकच नवशिक्षितांच्या नव्या पिढ्या शिक्षणाकडे आकृष्ट झाल्या. त्यातही पैसा मिळवून देणारी शाखा म्हणून वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षणाकडे मोठा ओढा होता. महाराष्ट्रापुरता विचार करायचा तर खुल्या शैक्षणिक धोरणानंतर खासगी विनाअनुदानित शिक्षण संस्थांचे अक्षरश: पेव फुटले. शिक्षणाच्या या कारखान्यांतून लाखोंच्या संख्येने डॉक्टर, इंजिनियर बाहेर पडले. पण हा फुगा फुटला. गेल्या सात-आठ वर्षांपासून अभियांत्रिकी शाखेचे वलयही कमी होऊ लागले. एकीकडे बेरोजगारीचा धोका वाढत असताना गेल्यावर्षी अभियांत्रिकीच्या पस्तीस हजारावर जागाच रिक्त होत्या. देशाच्या विकासाच्या गतीशी शैक्षणिक धोरण सुसंगत नसल्याचेच हे उदाहरण आहे. यासाठी देशभरातील विशेषत: औद्योगिक क्षेत्रातील मंदीचे वातावरणही कारणीभूत असावे. देशाला लागणाऱ्या कुशल, अतिकुशल मनुष्यबळाची गरज आणि त्याची सुनियोजितरितीने निर्मिती याचाही गैरमेळ दिसतो. यामुळेच दरवर्षी उत्तीर्ण होणाऱ्या आठ लाख अभियंत्यांपैकी साठ टक्के म्हणजे सुमारे पावणेपाच लाखावर अभियंते बेरोजगार आहेत. ‘ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन’ संस्थेच्या अहवालातील ही आकडेवारी धक्कादायक आहे. शैक्षणिक धोरणातील गोंधळाची ही परिणीती म्हणावी लागेल. ३ हजार २०० शिक्षणसंस्थांच्या केवळ पंधरा टक्के अभ्यासक्रमांनाच नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रिडेशनची मान्यता मिळते, हेही यामागील कारण सांगितले जाते. उर्वरित ८५ टक्के अभ्यासक्रमांची वेळीच चिकित्सा आणि पडताळणी होणे आवश्यक आहे. या पिढीच्या भवितव्याशीही असा खेळ मांडता येणार नाही. यंदा अभियांत्रिकीसाठी देशभरात एकच परीक्षा होणार आहे, याचे परिणामही तपासावे लागतील. जगाला शिक्षक पुरवायची भाषा करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अभियांत्रिकी क्षेत्रातील बेकारीकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. अमेरिकेतील घडामोडींमुळे याची तीव्रता वाढणार आहे, हेही विसरता येणार नाही!
‘अभियांत्रिकी’ला अवकळा
प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या अभियांत्रिकी शाखेच्या शिक्षणाला अवकळा येत चालली आहे काय, असा प्रश्न निर्माण होण्यासारखी परिस्थिती निर्माण होत आहे. सर्वाधिक रोजगाराच्या संधी देणारी आणि व्यवसायाभिमुख शाखा म्हणून अभियांत्रिकीकडे बघितले जाते.
Maharashtra Times 20 Mar 2017, 12:00 am