जलयुक्त शिवार योजनेची चौकशी महाविकास आघाडीने जाहीर केल्यामुळे आता पुढील काही काळ महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या आरोप-प्रत्यारोपांची राळ उडणार आहे. अशाच प्रकारे अजित पवार यांच्यावरही आरोप झाले होते. आता आरोपीच्या पिंजऱ्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. २०१५ साली ही योजना फडणवीस यांनी जाहीर केली. २०१४-१५च्या दुष्काळाची याला पार्श्वभूमी होती. योजनेचा उद्देश अत्यंत चांगला होता. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवणे, शाश्वत पाण्याचे स्रोत निर्माण करणे आणि शेतकऱ्यांमध्ये विश्वास तयार करणे, यासाठी सूक्ष्म सिंचन योजना राज्याच्या दुष्काळी पट्ट्यात राबविण्याचे हे धोरण होते. त्या दृष्टीने मराठवाडा, विदर्भात खूप कामे काढली गेली. वास्तविक पाहता पूर्वीच्या सरकारच्या 'पाणी अडवा, पाणी जिरवा' योजनेतीलच नदी रुंदीकरण, खोलीकरण, नाला बंडिंग, शेततळे, पाझर तलाव अशी ही कामे होती. मात्र, कंत्राटदार ही जमात प्रत्येक योजनेला वाटाण्याच्या अक्षता लावून स्वतःचे खिसे गरम करते. भ्रष्टाचाराच्या विरोधात ओरड करून सत्तेवर आलेल्या फडणवीस सरकारच्या चांगले उद्दिष्ट असलेल्या 'जलयुक्त शिवार'सारख्या योजनेवरही याच कंत्राटदारांची वक्रदृष्टी वळली होती. त्यातूनच योजनेचे बारा वाजायला सुरुवात झाली. ज्या कामांचे २०१५च्या उन्हाळ्यात उद्घाटन झाले, ती कामे पुढच्याच पावसात वाहून गेली. जलतज्ज्ञ, शेतकरी या कामातील फोलपणा दाखवू लागले. मात्र, चकाचक जाहिराती आणि प्रसारमाध्यमांवरील पकड यामुळे याकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नव्हता. सरकारच्या 'लोकराज्य'मध्ये 'मी लाभार्थी' या शीर्षकाखाली मग ज्याच्या शेतात शेततळेच नाही, त्या शेतकऱ्याचा शेततळ्यासोबत फोटो येऊ लागला. हळदीच्या बागेला केळीची बाग म्हणत 'जलयुक्त'च्या कौतुकाचे पाट वाहू लागले. आता अखेर 'कॅग'ने या योजनत झालेली ९० टक्क्यांपेक्षा अधिक कामे निकृष्ट असून यात कंत्राटदारांचे भले झाल्याचा ठपका ठेवला. जवळपास दहा हजार कोटी रुपयांच्या योजनेवर बसलेल्या या ठपक्याचे डाग लवकर पुसले जाणारे नाहीत. सध्याचे सरकार ही चौकशी किती गंभीरपणे करते व त्यातील चुका लक्षात घेऊन अशा चुका पुन्हा होणार नाहीत, याकडे किती लक्ष देते यावर शेतकऱ्यांचे भविष्य उज्ज्वल होणार की नाही, ते ठरेल.
चौकशी करा आणि धडेही शिका
जलयुक्त शिवार योजनेची चौकशी महाविकास आघाडीने जाहीर केल्यामुळे आता पुढील काही काळ महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या आरोप-प्रत्यारोपांची राळ उडणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स 16 Oct 2020, 5:33 am